Wednesday 1 August 2018

मुखपृष्ठ


अनुक्रमणिका




फोटो - शैलेश
संपादकीय मंडळ
  • अमृत बंग
  • प्रफुल्ल शशिकांत
  • प्रणाली सिसोदिया
  • शैलेश जाधव

संपर्क
प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश  ९५०३०६०६९८
इमेल : contact.knirman@gmail.com


 अंक चौथा| ऑगस्ट २०१८
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/
(खाजगी वितरणासाठी)


संवादकीय


नमस्कार मित्र मैत्रिणींनो,
तुम्ही सर्व कसे आहात? आम्ही इकडे मजेत आहोत.
महाराष्ट्रात समाधानकारक नसला तरी थोड्या फार प्रमाणात का होईना सगळीकडे पाऊस पडत आहे. त्यामुळे वातावरण कसं हिरवं-हिरवं झालं आहे! सगळीकडे पसरलेली हिरवळ मनाला ताजं-तवानं करते. सगळीकडे काळ्या शेतातून चिमुकली चिमुकली हिरवी पाती डोकावताना दिसतायेत. शेतकरी शेतातील मशागतीच्या कामात मग्न झालेले दिसतायेत. आभाळातले काळे ढग फक्त पाण्याचीच नाही तर त्यासोबत आनंदाची आणि उत्साहाची देखील बरसात करतायेत असं वाटतं. सगळीकडे लगबग आणि उत्साहाचे वातावरण आहे.
आमची सुद्धा लगबग सुरु आहे बरं! काय म्हणता कशासाठी ??? तर ज्या संघांना आम्ही अजूनपर्यंत भेट देऊ शकलेलो नाही त्या संघाना भेट देण्यासाठीच आमची लगबग सुरु आहे. या वर्षी संघांची संख्या बरीच वाढल्याने सर्व संघाना भेट देणं अजून शक्य नाही झालेलं नाही आणि त्यासाठीच आमची बरीच फिरफिर सुरु आहे. तुम्ही देखील शाळा, अभ्यास, खेळ यात बरेच बिझी (व्यस्त) झाला असाल, नाही?
अशा व्यस्त वेळापत्रकात बरेचदा आपल्या आजू बाजूला काय घडतंय याची माहिती घ्यायला आपल्याला वेळच नसतो. तर काय असं सुरु आहे बरं आपल्या आजू बाजूला. राईनपाडा नावाच्या एका लहानशा गावात काय घडलं? सगळ्या गावाने मिळून पाच अनोळखी लोकांना इतकं मारलं की त्यांचे जीव गेले. ते लोक कोण आहेत हे देखील त्यांना विचारलं नाही की ते कशासाठी आले ते देखील विचारलं नाही. का मारलं असेल बर लोकांनी त्या पाच जणांना? तर ‘मुलं पळवणारी टोळी आली आहे’ या अफवेमुळे. या एका अफवेमुळे मागील दोन महिन्यांत भारत भरात जवळपास २० पेक्षा अधिक लोकांचा जीव गेलाय आणि दुर्दैव म्हणजे त्यातील सगळ्यात जास्त लोक महाराष्ट्रात मारल्या गेलेत. ज्या अनोळखी व्यक्तीला आपण मरेपर्यंत मारत असतो तो कोण आहे? कुठून आला आहे ? त्याचा गुन्हा काय ? आणि असलाच गुन्हा तर त्याला शिक्षा देणारे आपण कोण ? मरेपर्यंत मारणे ही कुठली शिक्षा ? याचा आपण आत्ताच विचार करून ठेवायला हवा. म्हणजे पुढे आपल्या समोर अशी घटना घडत असताना आपण कसे वागणार हे आपल्याला ठरवता येईल.
गर्दीचे शहाणपण असा एक शब्द प्रयोग आहे. त्याचा थोडक्यात अर्थ, अनेक सामान्य लोक मिळून जेव्हा एक समस्या सोडवतात तेव्हा ते एका विद्वान व्यक्तीपेक्षा अधिक सरस उपाय शोधू शकतात असा होतो. पण मागच्या काही महिन्यांमधील या आणि अशा काही घटना बघून गर्दीला खरच शहाणपण असतं का हा प्रश्न निर्माण झालाय.

आपल्याला या गर्दीचा भाग व्हायचंय का? याचा मात्र पक्का विचार आपल्याला आत्ताच करून ठेवायला हवा. गर्दीत असताना ऐनवेळी आपण कदाचित चुकीचा निर्णय घेऊ याची भीती वाटते!
भरारी वाचून तुमच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत नक्की पोहचवा. तुम्हाला काय आवडलं काय आवडलं नाही हे देखील बिनदिक्कत कळवा.
तुमचे
प्रणाली, शैलेश

‘सांकव संघ’ बैठक



सुरज आज खूप आनंदात होता कारण त्यांच्या संघाने आयोजित केलेले गेटटुगेदर खूपच छान झाले होते. त्यांचा ‘सांकव’ संघ जवळच्या गावातील ‘आनंदाचे शिलेदार’ संघ आणि टेकडी पलीकडील पाड्यावरचा ‘अवेंजर’ संघ असे तीन संघ या गेटटुगेदर साठी एकत्र जमले होते. तीनही संघांनी मिळून खूप धमाल केली.
सांकव संघाने गेट टुगेदरसाठी या दोन संघाना बोलावण्यासाठी एक छान निमंत्रण पत्र त्यांना पाठवलं होतं (ही कल्पना त्यांना देगावच्या संघाने लिहिलेलं पत्र बघून सुचली). त्यात त्यांनी या दोन संघांनी काय काय तयारी करून यावी हे देखील नमूद केलं होतं. त्याशिवाय तुमच्या काही कल्पना किंवा सूचना असतील तर त्या देखील नक्की सांगा असं आवाहन देखील केलं होतं. ‘आनंदाचे शिलेदार’ यांनी लगेच आम्ही नक्कीच येऊ व तुम्ही सांगितलेली सर्व तयारी करून येऊ असं उत्तरही पाठवलं. ‘अवेंजर’ संघाने देखील पत्र पाठवून आम्ही येतोय असं कळवलं. त्यासोबतच हे गेटटुगेदर आमच्याकडे घ्यायला आम्हाला आवडलं असतं पण काही हरकत नाही पुढच्यावेळेस आमच्याकडे करू आता तुमच्याकडे करूया असं देखील त्यांनी त्या पत्रात लिहिलं. ‘सांकव’ संघाने लगेच बैठक बोलावून नियोजनाविषयी चर्चा केली. या बैठकीत गेटटुगेदर मध्ये काय काय करायचं याचं नियोजन करून एक वेळापत्रक सांकव संघाने बनवलं (अगदी संस्कृती संघाने बनवलं तसंच) आणि ते देखील या दोन संघाना पाठवलं.
ठरलेल्या दिवशी नियोजित पद्धतीने सर्व कार्यक्रम पार पडला. मुला-मुलींनी गाणी म्हटली, विनोद सांगितले, एकमेकांना कोडी विचारली, सर्व संघांनी मिळून खेळ खेळले, एक सिनेमा बघितला. सोबतच आतापर्यंत झालेले कृतिकार्यक्रम आणि पुढील कृतिकार्यक्रमांचे नियोजन याविषयी देखील सर्वांनी मिळून चर्चा केली. अवेंजर संघाने एक छान नाटक बसवलं होतं ते सादर केलं तर आनंदाचे शिलेदार संघाने सर्वांसाठी भेळ आणली होती ती सर्वांनी खाल्ली. दुपारी सर्वांनी सोबत आणलेले डब्बे मिळून फस्त केले. सगळ्या आठवणी, नवीन मित्र-मैत्रिणी आणि पुन्हा भेटण्याचं प्रॉमिस घेऊन सगळे आपापल्या घरी गेले.

त्यानंतर सांकव संघाची आज आठवड्याची बैठक होती. वृषाली ताईंनी सर्वांचं कौतुक केलं. गेट टुगेदरचे अनुभव ऐकून झाल्यानंतर चर्चा पुढील नियोजनाकडे वळाली.
“ताई या महिन्यात झेंडावंदन आहे.” मोनाली म्हणाली.
“नाही स्वातंत्र्य दिन आहे.” लिसा म्हणाली.
“बरोबर आहे दोघींचंही, स्वातंत्र्यदिन आहे म्हणूनच आपण त्यादिवशी झेंडावंदन करतो.” वृषाली ताईंनी माहिती पुरवली.
“पण ताई झेंडावंदन आणि स्वातंत्र्यदिन वेगवेगळा असतो का ?” फातिमाने विचारलं.
“एवढंही माहिती नाही का ?” मनोज बोलून गेला पण मग त्यालाही आपल्याला यातील फरक माहिती नसल्याची जाणीव झाली आणि त्याने चीभ चावली.
“याचं उत्तर आता तुम्हीच शोधून मला सांगा.” वृषाली ताई म्हणाल्या.
“पण ताई, आपण काय करूया स्वातंत्र्य दिनाला ?” मोनालीने पुन्हा आपला मुद्दा मांडला.
“अरे आपलं काय ठरलंय ? हा संघ तुमचा आहे तेव्हा काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. मी फक्त बघायला आणि तुम्हाला मदत करायला आहे. फक्त हे उपक्रम करताना त्यात नाविन्य आणि उपयुक्तता असेल यासाठी आपण प्रयत्न करूया. बाकी कुमार निर्माण मध्ये कृतिकार्यक्रम किंवा उपक्रम करताना कुठले नियम पाळायचे असतात, हे तुम्हाला माहिती आहेच.” वृषालीताईंनी मुला-मुलींना आपल्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
सगळे विचार करू लागले.
“ताई, आत्ता लगेच काही सुचत नाहीये. आम्ही विचार करून सांगतो आपण पुढच्या बैठकीत ठरवूया काय करायचं ते.” अरबाझ म्हणाला.
“ताई, आता स्वातंत्र्य दिनासोबतच पुढे नागपंचमी, बकरी ईद, पोळा, गणपती असे अनेक सण येत आहेत.” सुरज म्हणाला. “त्या-त्या वेळेस काय करायचं याचं देखील नियोजन आपल्याला केलं पाहिजे.”
“बरोबर सुरज, तर आता पुढील बैठकीसाठी येताना आपण सगळे एक काम करूया का? या दोन महिन्यांत कुठले कुठले सण येत आहेत आणि त्या सणांना आपला कुमार निर्माणचा सांकव संघ काय-काय करू शकतो याविषयी जरा विचार करून या. म्हणजे आपल्याला पुढील दोन महिन्यात करायच्या उपक्रमांचं नियोजन करता येईल.” वृषाली ताई म्हणाल्या.
“येस्स ताई!!!” सगळे मुलं-मुली एका सुरात म्हणाले.
“तत्पूर्वी आपण या भरारी मध्ये आलेलं कुमार गीत ‘आम्ही प्रकाश बीजे .....’ म्हणायचं का?” वृषाली ताईंनी विचारलं.
“पण ताई आम्हाला कुठे त्याची चाल माहिती आहे?” मनोजचा प्रश्न तयार होता.
“अरे भरारी मध्ये त्या कुमार गीताच्या चालीसाठी युट्युब लिंक दिलेली असते. आपण युट्युबवर ते गाणं बघू म्हणजे त्यातून आपल्याला त्याची चाल कळेल” लिसाने समजावलं.
सगळ्यांनी मग वृषाली ताईंच्या लॅपटॉपवर ‘आम्ही प्रकाश बीजे...’ या गीताचा विडीयो बघितला आणि ते गीत म्हटले. 
तुम्ही देखील तुमच्या संघाचे असे पुढील दोन महिन्यासाठी नियोजन करू शकाल का? प्रयत्न तर करून बघा!



 

उल्लेखनीय कृतीकार्यक्रम


लहान मुलांचे शिबीर
आम्ही लहान मुलांचे शिबीर घ्यायचं ठरवलं. पण आमच्या परिसरात लहान मुलं नव्हती आणि आम्ही सगळे पण एका परिसारत राहत नाही मग शिबीर कुठे घ्यायचं याचा विचार केल्यानंतर महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांसाठी शिबीर घ्यायचं असं ठरलं. त्यासाठी परवानगी मिळवण्यासाठी आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना एक विनंती अर्ज लिहिला आणि तो घेऊन त्यांच्या कार्यालयात गेलो. पण तेव्हा नेमके ते अधिकारी कामानिमित्त बाहेर गेलेले होते. मग आम्ही काही वेळ वाट बघून परत आलो. जेव्हा ते अधिकारी परत आले तेव्हा त्यांनी आमचे पत्र वाचून आम्हाला परवानगी दिली व तसे फोन करून कळवले.


आम्ही शिबिराचे नियोजन करण्यासाठी बैठक घेतली. त्यात कोण-कोण काय-काय करणार याविषयी चर्चा केली. शिबिरासाठी कामात येतील अशा काय काय वस्तू घरी आहेत हे देखील बघायचं ठरलं. ठरल्यानुसार आम्ही महानगरपालिकेच्या शाळा क्रमांक ७१३३ मध्ये गेलो. तेथील तिसरीच्या वर्गावर आम्ही शिबीर घेणार होतो. तिथे मुलं आणि मुलींचे वर्ग वेगळे होते. मग आम्ही आमच्यात देखील दोन गट केले. एक गट मुलांच्या वर्गावर गेला तर दुसरा मुलींच्या वर्गावर.
मुला-मुलीना बोअर नाही झालं पाहिजे याची आम्ही काळजी घेत होतो. त्यासाठी खेळ, क्राफ्ट, जोक्स असे आलटून पालटून सांगत होतो. आम्ही त्यांच्यासोबत विविध क्राफ्ट तयार केले. श्लोक ने सर्वांना जोक सांगून हसवलं. चित्र काढली. आम्ही मुलांना कागाची टोपी बनवायला शिकवली. तर बाकीच्या वर्गातील मुलंही ‘आम्हाला पण टोपी शिकवा’ म्हणत होती. मग आम्ही त्यांना पण टोपी बनवायला शिकवली. कागाचे फटाके देखील बनवले. चित्र काढतानी मुला-मुलींनी खूप मजा केली. त्यांनी रंगत हात बुडवले. नंतर आम्ही हत्तीला शेपूट लावायचा खेळ घेतला. तेव्हा देखील मुलांना खूप मज्जा आली. सुरुवातीला त्यांच्या टीचर पण वर्गात होत्या तेव्हा मुलं जास्त खुलत नव्हती. पण टीचर काही कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर मुलं चांगली मिक्स झाली.
सगळे कार्यक्रम घेताना आम्हाला वेळ जरा कमीच पडला. अजून व्यवस्थित नियोजन करायला पाहिजे होतं. आम्हाला वाटलेलं की एक-एक उपक्रमाला कमी वेळ लागेल पण प्रत्यक्षात जास्त वेळ लागला.
वेळ संपल्यावर सगळे मुलं-मुली विचारत होते, ‘तुम्ही परत कधी येणार?’ ‘तुम्ही रोज येणार का?’ मुलांना देखील खूप मजा आली आणि आम्हाला देखील खूप मजा आली.
मी माणूस संघ नाशिक
 मुलांनी केली शेती

बावधन येथील कुमार निर्माणच्या ‘ग्लोरिया किड्स’ या संघाने एक भन्नाट उपक्रम केला. शेती कशी करतात हे बघण्यासाठी त्यांनी आपल्याकडे येणाऱ्या माळी दादाच्या मदतीने पालक लावला व त्याची काळजी घेतली. जेव्हा पालक भाजी मोठी झाली तेव्हा मुलांनी तो काढून आपापल्या घरी नेला व पालकचा उपयोग करून वेगवेगळे पदार्थ बनवले. हे सगळे पदार्थ घेऊन मुलांनी मस्त पैकी डब्बा पार्टी केली. तुम्हालाही ऐकायचंय का पालकचे नेमके कुठले कुठले पदार्थ या मुलांच्या डबा पार्टीला होते ते? तर पालक पनीर, पालक पकोडा, पालक कचोरी, पालक पिझ्झा, पालक इडली, पालक सॅंडविच, दाल पालक, आणि पालक भाजी. बापरे बापरे... एवढे पदार्थ! स्वतः उगवलेल्या पालकचे एवढे पदार्थ मुलांना नक्कीच खूप चविष्ट लागले असणार.


आता आम्ही आनंदाने खेळू शकू
आमची कुमार निर्माणची बैठक होती. मॅडम आल्यानंतर मुले जमा झाली. सर्वांत आधी आम्ही गाणी म्हटली. ‘लांबी दाढी वाले बाबा, गाडी आली गाडी आली आणि मग आम्ही सर्वांनी मिळून भरारीचं वाचन केलं. त्यावर विचार घेतले. नंतर काहीतरी करावं म्हणून विचार करू लागले. आमच्यातील एक जण म्हणाला, “आपण परिसरात वृक्षारोपण करूया.” मात्र मॅडम म्हणाल्या आपल्या परिसरात खूपच झाडे आहेत. त्यामुळे दुसरे काही विचार करण्यास सुरुवात केली. त्यावेळी दोन - तीन जण मल्लखांब खेळत असणाऱ्या मुलांकडे गेले. त्यातील काही मुलं पुश-अप्स काढण्यासाठी त्याकडे गेली पण त्याठिकाणी पाणी साचले होते व त्यावर मच्छर उडत होती. त्यावर काही करता येईल का? आम्ही मॅडमला विचारलं. आपण हे खड्डे बुजवावेत. त्यावर त्यांनी होकार दिला. मग आम्ही सर्वांनी वेगवेगळा विचार करण्यास सुरुवात केली. कुणी म्हणालं ‘आपण आधी दगड टाकू.’ मात्र ते शक्य नव्हते; कारण त्या ठिकाणी लहान मुले सुद्धा खेळतात. मग त्यावर चढताच आले नसते. मग कुणी म्हणालं ‘आपण खडी टाकू, मात्र ते सुद्धा चालणार नव्हतं. मग आम्ही मॅडमला विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं; ‘ आपल्या परिसरात असे काय आहे, की रिकामे पडले आहे, आणि आपण त्याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो. त्यावर होस्टेलची मुलांनी सांगितलं की आपण माती टाकू शकतो. मात्र माती टाकल्याने गाराच झाला असता. त्यावर एकाने सांगितले की हॉस्टेलच्या बाजूला रेती भरलेल्या पिशव्या पडल्या आहेत. आपण रेती टाकू शकतो. मग आमचं ठरलं. मात्र ती रेती आणायची कशी हा विचार सुरु झाला.


मग हॉस्टेलची मुले म्हणाली आपण लोटगाडी आणून त्यावर आणू शकतो. मग आम्ही लोटगाडी आणली. त्यावर काही मुलांनी रेतीच्या पिशव्या ठेवल्या. त्या आणल्या आणि ज्या ठिकाणी खड्डे होते पाणी साचले होते त्या ठिकाणी ते टाकले. दुसऱ्या मुलांनी ती रेती पसरवण्यास सुरुवात केली. अशा पद्धतीने आम्ही जाड-बारीक रेती टाकून त्या ठिकाणची जागा व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला. त्यावर सर्वांनी आम्हाला शाबासकी देखील दिली. आम्हाला त्यामुळे अधिक विचार करण्याची प्रेरणा मिळाली.
आम्ही अशाच पद्धतीने अजून वेगवेगळे विचार करण्याचा प्रयत्न करावा असे सर्वांचे म्हणणे पडले आणि आम्ही ते सर्वांनी मनाने स्वीकारले सुद्धा! 
धमालमस्ती संघ
सावदा, जळगाव
 आम्ही पाणी मोजलं!
आता आम्ही आपण रोज किती पाणी वापरतो याचं मोजमाप करण्याचा उपक्रम करत आहोत. मागील वर्षी आम्ही आपल्याकडे पावसाचं किती पाणी पडतं हे मोजलं होतं. आपण कमीत कमी पाणी वापरलं पाहिजे म्हणून आम्ही हा उपक्रम करत आहोत. आम्ही आठवडाभर रोज आपण किती आणि वापरतो याचे मोजमाप करतो आहोत. आम्ही सगळ्या कामांसाठी लागणारं पाणी मोजतो. पिण्याचे पाणी मोजण्यासाठी आम्ही एक तांब्यात किती पाणी मावतं तसंच एक पेल्यात किती पाणी मावतं हे मोजलं आहे. त्यानुसार आपण दिवसात किती पाणी पितो हे मोजता येतं. तर आई-वडील शेतात जाताना पिण्याच्या पाण्याचा हंडा घेऊन जातात त्या हंड्यात किती पाणी मावतं ते पण आम्ही मोजलं आहे. बादली मध्ये किती पाणी आहे हे पाहण्यासाठी बादलीवर खुणा असतात. त्यामुळे आम्ही धुनी, भांडी, आंघोळ, फरशी पुसणे या कामांसाठी किती पाणी लागले हे देखील मोजता येतं.
अशाप्रकारे दिवसाला किती पाणी लागलं हे मोजून आम्ही पाण्याचा वापर कुठे कमी करता येईल हे बघणार आहोत.
प्रगती संघ
बेडूकवाडी, बीड

 ग्रहणाची चर्चा !
देगावच्या स्पंदन गटाच्या बैठकीत ग्रहणाचा विषय मुलांनीच काढला. त्यावर भरपूर चर्चा ‘झाली अंधश्रद्धेची वावटळ’ या पुस्तकातील ग्रहणाबद्दलचं लिखाण वाचूया असं देखील मुला-मुलींनीच सुचवलं. मग ते वाचून त्यावर पुन्हा चर्चा झाली. ‘ग्रहणाविषयी अंधश्रद्धा बाळगणार नाही व ग्रहण बघणारच’ अशी प्रतिज्ञा सर्वांनी केली. त्यासोबच घरच्यांनाही ग्रहण दाखवायचं असं देखील मुला-मुलींनी ठरवलं.
ग्रहण बघितल्या नंतरचे काही अनुभव पुढे देत आहोत.
मी शाळेतून येत होती तेव्हा शेजारच्या आज्या गप्पा मारत होत्या आणि बोलत होत्या की ‘आता चंद्रग्रहण लागणार आहे. आता कोणी बाहेर नका पडू. आपल्याला काहीतरी व्हायचं.’ असं बोलत होत्या. ते मी ऐकलं आणि मी त्यांना तिथे जाऊन सांगितलं, “आजी असं काही नसतं. चंद्रग्रहण ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. चंद्रग्रहण बघितल्यामुळे आपल्याला विविध तारे दिसतात. तुमच्या मनात काही आहे तसं काहीच नसतं. मी त्यांना सांगितले की तुम्ही चंद्रग्रहण पहा. त्यांनी चंद्रग्रहण लागायला सुरुवात झाल्यावर दरवाजा बंद करून घरात बसले.’

——————————————————————————————-
‘मी ग्रहण रात्री ११ वाजता पाहिलं पण त्याच्या अगोदर माझी आजी, मम्मी मला पाठवत नव्हत्या. माझी मम्मी म्हणाली ‘तुला काही समजतं का? ग्रहण पहायचं नसतं. आपल्या डोळ्यांना फार त्रास होतो. पण मी तिला बोलले की ग्रहणामुळे आपल्याला काहीच त्रास होत नाही. ग्रहण म्हणजे एकप्रकारे पृथ्वीचा उपग्रह चंद्र लाल होतो. नंतर तिला मी विचारलं आता मी जाऊ का ग्रहण बघायला? तरीही माझी मम्मी मला ग्रहण बघायला पाठवत नव्हती. मग मी आम्हाला बाईनी दिलेले ‘अंधश्रद्धेची वावटळ’ पुस्तक दिले व त्यातील ‘ग्रहण व करणी’ हा भाग वाचण्यास सांगितला. पण तिने त्यातला कोणताच भाग वाचून काढला नाही. दादा आणि मी मम्मी जेव्हा स्वयंपाक घरात काम करत होती तेव्हा बाबा झोपले होते तेव्हा आम्ही दोघांनी ग्रहण पाहिले. तेव्हा चंद्र लाल झालेला. पण दादा थोडं घाबरत होता. तेव्हा मी त्याला विचारलं तुला बाईंनी सांगितलं नाही. तेव्हा आम्ही ग्रहण पाहून झाल्यावर आम्ही घरी गेलो.’
 ——————————————————————————————-
‘मी घरी गेले व चहा पीत होती. माझ्या आईला मी बोलली की “आई मी आज ग्रहण पाहणार आहे.” तर माझी आई म्हणाली, “ग्रहण बघायचा नसतो. दुसऱ्या दिवसापासून माणसाला आजार होण्याची सुरुवात होते.” मी मझ्या दप्तरातील अंधश्रद्धेचं पुस्तक आणलं व तिला मी म्हणाली; “या पुस्तकामध्ये काही अंधश्रद्धेबद्दल लिहिलेलं आहे ते मी वाचून दाखवते.” मी ग्रहण हा भाग काढला व त्यावरचं वाचून दाखवलं. आणि काही भूत, साप, अंगात येणे असे काही पुस्तकातील भाग तीला वाचून दाखवले. तर मी तिला बोलली; “आता तरी मी ग्रहण पाहू शकते का?” तर ती बोलली “नको.” मी जेव्हा रात्री साडे सातला काकांकडे गेली. जेव्हा मी ११.३०ला माझ्या काकांबरोबर घरी येत होती तेव्हा मी आणि काकांनी दोघांनीपण ग्रहण पाहिलं. चंद्राचा पूर्ण भाग लाल रंगाचा झाला होता. पण मी अंधश्रद्धेच्या पुस्तकातील ग्रहण, भूत, अंगात येणे हे सगळं वाचून दाखवलं तरी तिने ग्रहण पाहिलंच नाही.’

निमंत्रकांच्या लेखणीतून


श्रीदेवीचा मृत्यू आणि मुलं
“सर तुम्हाला माहिती आहे का की एक हिरोईन (श्रीदेवी) मरण पावली?” या प्रश्नाने मुलांनी आजच्या बैठकीची सुरुवात केली. ती हार्ट अॅटॅकने दुबई इथे मेली असं टीव्हीवर दाखवत आहेत. “सर हार्ट अॅटॅक म्हणजे काय? तो का येतो?” अशा अनेक प्रश्नांचा भडीमार आज आमच्यावर मुलांनी केला.
यावर आम्ही चर्चा करत असताना शरीर यंत्रणा कशी चालते, कुठला अवयव कसे कार्य करतो यासंदर्भात विडीयो बघुन शरीराची कार्य करण्याची पद्धती, तसेच शरीरातील घटक, त्याचे प्रमाण किती इत्यादी समजून घेतलं. सोबतच हार्ट अॅटॅक कसा येतो, कुठल्या कारणांनी येतो, बी.पी. म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्यामागची कारणे तसेच मधुमेह इत्यादींच्या बाबतीत चर्चा झाली.
विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान सोबतीला आणखी विषय होता. कालच त्याच्या शेजारच्या वस्तीतील एका मनुष्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाला होता. मुलांनी स्वतः त्यांच्या पालकांसोबत घटनास्थळी जाऊन हे दृश्य बघितले होते त्यामुळे काहींना रात्री भीतीमुळे झोप नाही आली व काहींना अनेक शंका होत्या. यातून त्यांना अनेक प्रश्न पडले. जसे की,
आता त्या माणसाचा आत्मा भटकत राहील का?
त्याच्या मालकाने लक्ष दिलं नाही तर तो त्यांना त्रास देईल का?
त्याचं भूत बनेल का?
त्याच्या आत्म्याला यम घ्यायला आला असेल का?
आत्मा असतो की नसतो?
माणूस का मारतो? मेल्यावर कुठे जातो? यम त्याला नेतो का?
वरती तर आभाळ आहे, माती नाही मग तो वर कसा राहणार, खाली पडून जाणार नाही का?
जाळून टाकले की माती होते मग आपलं शरीर मातीचं बनलेलं असतं का?
आत्मा कसा असतो? तो कोणते कपडे घालतो?
असे अनेक प्रश्न विचारून मुलांनी आम्हाला भंडावून सोडले. मग त्यावर आम्ही त्यांना काही प्रतिप्रश्न केले. जसे की, भूत असतं का?, तुम्ही त्याला बघितलं आहे का? कसं दिसतं?, कुठे राहतो? आम्हाला दाखवाल का?, आपण भुताला भेटायला जायचं का?, इ.

याबाबत चर्चा करत असताना ७ मुले भूत – आत्मा असतात याला सहमती दर्शवित होते तर ५ जण या विरोधात होते. यापैकी विरोधात असणारे अंधश्रद्धा असते म्हणून मोकळे झाले तर सहमती दर्शविणारे वेगवेगळे उदाहरण देऊन विशेष सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
या प्रकारची चर्चा आजच्या बैठकीदरम्यान झाली. आमच्या परीने आम्ही मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला.
निमंत्रक: नितीन कायरकर, सचिन भोगे,
बाल शिवाजी संघ, नागपूर
 सुषमा व सुलक्षणाची ज्ञानदीप संघाला भेट

 आज (१५ जुलै, २०१८) सुषमा व सुलक्षणा कोलगावहून आमच्या गटाला भेटायला आल्या होत्या. खूप पाऊस असूनही त्या दोघी ठरल्याप्रमाणे आल्या.
मुलांना आधीच सांगितले होते. दोन मुलांनी स्वतःहून दिदींसाठी पुष्पगुच्छ बनवून आणला.
त्यांनी मुलांशी गप्पा मारल्या. एक प्रार्थना शिकवली. मुलांकडून एक गोष्ट तयार करून घेतली. कोडी घेतली. गाणी, कानगोष्टी खेळ घेतला. मुलांना खाऊ आणला होता - खजूर. मुलांनी एक शाळेतील गाणं त्यांना म्हणून दाखवलं.
Get-together निरामयला - जिथे सुषमा व सुलक्षणा गट घेतात तिथे आहे. त्याविषयी मुलांनी त्यांना प्रश्न विचारले. कुठे आहे, काय आहे इ. त्या दिवशी काय करायचं यावर चर्चा झाली. जेवण काय हेही ठरलं.
मुलांनी खूप मज्जा आणि धमाल केली. कोणीतरी नवीन आपल्या गटाला भेट द्यायला, खास आपल्यासाठी आलंय या भावनेने मुलं खूपच खुश होतात. त्यांचा उत्साह पाहून ते जाणवत होतं.
निमंत्रक: अश्विनी जोशी
ज्ञानदीप संघ, झोळंबे, सिंधुदुर्ग