Saturday 31 October 2015

मुखपृष्ठ


या अंकात...


संपादकीय मंडळ
नरेंद्र खोत
प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव
वेबसाईट : www.mkf.org.in/mso

संपर्क :  ९४२०६५०४८४

अंक तिसरा | ऑक्टोबर २०१५

हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/


(खाजगी वितरणासाठी)

रचनावादाची भूमिका

जीवन आणि शिक्षण यांचा घनिष्ठ संबंध आहे. शिक्षण जीवनानुसार असावे, असे म्हटले जाते. कारण, जीवन चांगले घडविणे हेच मुळी शिक्षणाचे अंतिम उद्दिष्ट असते.

मानवी जीवन हे प्रवाही असते. ते दर पिढीगणिक बदलत जाते. आत्ताच्या २१व्या शतकात तर ते वेगाने बदलत जात आहे. शिक्षणाने जीवनाचा हा वेग पकडावा अशी शिक्षणाकडून अपेक्षा केली जाते, असे झाले तरच शिक्षण जीवनाला उपयोगी पडू शकेल. शिक्षणाने पुढील पिढीला नुसती जगण्याची दीक्षा द्यायची नसते तर जगताना, वेळोवेळी उगवत जाणाऱ्या समस्यांच्या त्वरित निवारणाची ताकदही द्यायची असते. शिक्षणाकडून या गोष्टी घेत असतानाच, जीवनाकडून शिक्षणाकडे जाण्याची वाट प्रत्येक पिढीसाठी मोकळी ठेवायची असते.

आज गरज निर्माण झाली आहे ती, गेल्या सात पिढ्या कुंठीत राहिलेल्या शिक्षणात अमुलाग्र बदल करण्याची. असे बदल करण्यासाठी, कधी नव्हे एवढी शास्त्रज्ञानाची नि तंत्रज्ञानाची मदत उपलब्ध झाली आहे. विविध शास्त्रांतील संशोधनांनी, मूल निसर्गतः असते कसे, वाढते कसे, शिकते कसे, याची अधिक नेमकी समज आपल्याला दिली आहे. त्यामुळे या नव्या माहितीचा वापर करून, शिक्षणात, आजवरच्या प्रथेप्रमाणे ‘शिकविण्याच्या’ नव्हे तर, मुलांच्या ‘शिकण्या’च्या अंगाने विचार व्हावा ही नवी भूमिका शिक्षणशास्त्रज्ञ घेऊ लागले आहेत. शिक्षणात हा जो विचार प्रवाह आला आहे त्याला शिक्षणविषयक रचनात्मक दृष्टीकोण (Constructive Approach) असे म्हटले जाते. हा नवा ज्ञानरचनावाद समजावून घेताना, शिक्षणाच्या एका मुलभूत उद्दिष्टाचे उदाहरण घेऊन सुरवात करणे इष्ट ठरेल असे वाटते.

समस्या निवारणाची ताकद
शिक्षणाचे एक महत्वाचे उद्दिष्ट आहे, ते विद्यार्थ्यांमध्ये समस्या निवारण्याची चिरंतन अशी ताकद निर्माण करणे. समस्या निवारण्याची ही ताकद, ही क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होईल, अशी शक्ती शिक्षणाच्या आशयात व पद्धतीत असावी लागते. अशी शक्ती रचनात्मक शिक्षणात असते, असे आढळून आल्यामुळे, रचनात्मक शिक्षणाला आज सार्वत्रिक मान्यता मिळताना दिसून येते.

समस्या निवारण्याची प्रक्रिया ही तशी गुंतागुंतीची प्रक्रिया असते. तिच्या प्रत्येक पायरीला वेगवेगळ्या मानवी क्षमतांची गरज असते. अशी विविध क्षमतांची तयारी करून देण्याचे काम शिक्षणाला – विशेषतः शालेय शिक्षणाला करून दयायचे असते.
समस्या निवारण्याच्या संभावित पायऱ्या व त्यासाठी लागणाऱ्या क्षमता पुढीलप्रमाणे असतात.
१.       प्रथमतः समस्या, प्रश्न जाणवणे. (संवेदनशीलता)
२.       ‘अशी समस्या आहे’ हे मानसिक स्तरावर स्वीकारणे. (धिटाई)
३.       समस्येचे नेमके स्वरूप आकळणे. (आकलनक्षमता)
४.       समस्येचे प्राधान्य, महत्व कळण्यासाठी त्याचे मूल्यमापन करता येणे. (मूल्यमापन)
५.       समस्या सोडवणुकीच्या पर्यायी मार्गांचा शोध घेता येणे. (शोधक्षमता)
६.       विशिष्ट परिस्थितीत योग्य पर्यायाची निवड करता येणे. (निवडक्षमता)
७.       निवडलेला पर्याय वापरण्याचे कौशल्य अंगी असणे. (कुशलता)
८.       समस्या सोडवण्यासाठी निर्णय घेता येणे. (निर्णयक्षमता)
९.       निर्णयानुसार कृती करता येणे. (कृतीक्षमता)
१०.   समस्या सुटल्याची खात्री करता येणे. (विवेचकदृष्टी)

यांपैकी प्रत्येक पायरीसाठी काही ना काही क्षमता, ज्ञान, कौशल्य अशा गोष्टींची आवश्यकता असते. उदाहरणार्थ, समस्या जाणविण्याची संवेदनशीलता, समस्येचा स्वीकार करण्याची धिटाई, समस्येचे स्वरूप सर्वांगाने कळण्यासाठी लागणारी आकलनक्षमता, सारासार विचाराने समस्येचे मूल्यमापन करता येणे, समस्या सोडविण्यासाठी असणाऱ्या पर्यायी मार्गांचे ज्ञान, व त्यांचा शोध घेण्यासाठी लागणारी शोधक्षमता, पर्यायांची तुलनात्मक योग्यायोग्यता ठरविण्याची विश्लेषणक्षमता, प्रत्यक्षात विशिष्ट समस्या सोडविण्यासाठी लागणारी कौशल्ये, निवड व कृतीसाठी लागणारी निर्णयक्षमता, प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा व पात्रता आणि शेवटी, सुटलेल्या समस्येचीसुद्धा शहानिशा करण्याची विवेचक दृष्टी. या साऱ्या गोष्टी, प्रत्येक विद्यार्थी – विद्यार्थिनीस मिळतील याची मोठी जबाबदारी शिक्षणाला घ्यायची असते.

यातील कोणत्याच गोष्टी, शिक्षकाने द्यायच्या आणि विद्यार्थ्याने घ्यायच्या या स्वरूपाच्या नाहीत. शिक्षक विद्यार्थ्यांना फक्त माहिती देऊ शकतो, उदाहरणे देऊ शकतो, फार तर समस्येपर्यंत नेऊही शकतो पोहोचण्यासाठी तलावाची खोली, पोहण्यासाठी हातपाय मारण्याची पद्धती शिक्षक सांगू शकतो. थेट तलावापर्यंत नेउही शकतो. पण प्रत्यक्ष भीती, दडपण दूर करून आपली आपण उडी टाकण्याचे, हातपाय हलविण्याचे, नाका-तोंडात पाणी जाऊन जाणवणाऱ्या अस्वस्थेचे आणि असे करत करत पोहायला शिकण्याचे काम हे ज्याचे त्यालाच करावे लागते.  पोहण्याची ही सारी प्रक्रिया स्वानुभवाने पार करतच पोहायला शिकावे लागते. अशाप्रकारे पोहायला शिकण्याची ही सारी शिक्षणप्रक्रिया जशी मुळातच रचनात्मक शिक्षणप्रक्रिया असते, त्याचप्रमाणे कोणतीही शिकण्याची प्रक्रिया ही अशी मुळातच करून शिकण्याची प्रक्रिया असते, असं ‘रचनावादी’ शिक्षणपद्धतीचा दावा आहे.

समस्या निवारण्याच्या एखाद्या घटनेत, स्वतःच्या प्रयत्नांनी, विविध पायऱ्याना काय काय, कसे कसे घडते याची शहानिशा करीत जाऊन, विद्यार्थी यशस्वीरीत्या ही कामगिरी करू शकला तर त्याचे, यातूनच अर्थपूर्ण शिक्षण झाले असे म्हणता येईल. येथे विद्यार्थ्याने आपल्या उपलब्ध क्षमतांचा वापर करून समस्या निवारण केले आहे असे रचनात्मक दृष्टीकोण मानतो.

आपल्या असलेल्या पूर्वज्ञानाचा नि आत्मसात केलेल्या कौशल्यांचा वापर करून जेव्हा व्यक्ती आपल्या चालू प्रश्नांना भिडत असते, तेव्हा ती आपल्या परीने, आपल्या दृष्टीकोणातून समोर येणाऱ्या घटनांचा, कल्पनांचा अर्थ लावीत असते. वेगवेगळ्या घटकांत आणि आपल्या अगोदरच्या अनुभवांत परस्परसंबंध बांधीत जाते, म्हणजेच आपल्या ज्ञानाची नवी रचना करीत जाते, असे रचनावादी विचारसरणीचे प्रतिपादन आहे.
मा. रमेश पानसे

‘रचनावादी शिक्षण’ या पुस्तकातून साभार

उल्लेखनीय कृती कार्यक्रम व अनुभव

कुमार निर्माणच्या सक्षम गटाची नियमित बैठक होते. गांशी जयंतीला २ ऑक्टोबर रोजी गटातील काही मुलांनी स्वच्छता करायची असे ठरवले. ठरल्याप्रमाणे मुले जमली, स्वच्छता करू लागली. त्यावेळी तिथे इतर दोन मोठी माणसे आली. त्यांनी मुलांना विचारले की तुम्ही काय करत आहात? मुलांनी सांगितल्यानंतर त्य दोन्ही माणसांनी मुलांसोबत स्वच्छता केली. अचानक गटातील काही मुलांच्या मनात विचार आला की आपण एक दिवस स्वच्छता केली तर इतका कंटाळा आला तर जी माणसं दररोज स्वच्छता करतात त्याचं काय होत असेल. मग यावर मुलांनी 

काय करता येईल असा विचार केला आणि त्यातून त्यांना एक भन्नाट कल्पना सुचली.
मुलांनी ठरविले की या सर्व कामगारांच्या घरी जाऊन त्यांचे आभार मानूया. ठरल्यानंतर मुलांनी पुष्पगुच्छ विकत न घेता तिथल्याच बागेतील फुलांचा उपयोग करून पुष्पगुच्छ बनवले आणि ते घेऊन मुले वस्तीत गेली. मुलांना सुरवातीला असा अनुभव आला की त्या कामगार कुटुंबांनी ते पुष्पगुच्छ घेण्यास नकार दिला. परंतु गटातील मुलांनी कामगारांच्या मुलांशी ओळख केली व त्यांच्या आई-वडिलांना सांगितले की तुम्ही वर्षभर संपूर्ण शहर स्वच्छ ठेवतात म्हणून आम्हाला खरंच तुमच्या कुटुंबाचे आभार मानायचे आहेत. नंतर मात्र तेथील सर्व कुटुंबांनी गटातील मुलांकडून पुष्पगुच्छ स्वीकारले आणि मुलांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली.
गटातील काही मुलांनी स्वच्छता कर्मचार्यांच्या घराचे निरीक्षण केले. मुलांचे निरीक्षण असे होते की ही सर्व कुटुंबे दिवसभर कचऱ्यात काम करूनही त्यांची घरे मात्र स्वच्छ होती.
मुलांना या कृतीनंतर फार आनंद झाला तसेच कर्मचार्यांच्या मुलांशी त्यांची ओळखही झाली.
सक्षम गट, इंदापूर

निमंत्रक – तुषार रंजणकर (७०५७६३३५५५)

मुलांच्या लेखणीतून

१. Indian Knowledge Group ने साजरा केला ‘मैत्रीदिन’!
आज आम्ही Indian Knowledge Group च्या वतीने Friendship Day साजरा करण्याचे ठरवले, त्या निमित्ताने आम्ही गटात वादविवाद स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेचा विषय असा होता की, मैत्रीदिन फक्त एकाच दिवशी साजरा करावा की ३६५ दिवस? या स्पर्धेमध्ये २ गट पाडण्यात आले व त्यांच्यामध्ये वादविवाद स्पर्धा सुरु झाली. दोन्ही गटांमधील मुलांनी आपापले विचार मांडले. तसेच त्या मैत्रीदिनाच्या दिवशी काही विद्यार्थ्यांनी त्या दिवशीचे त्यांचे अनुभव सांगितले. त्यातला एक अनुभव म्हणजे, त्या दिवशी तनय, तुषार आणि अजिंक्य या तिघांनी एका मुकबधीर मुलाला मदत करून खरा मैत्रीदिन साजरा केला. तो मुकबधीर मुलगा अजिंक्यच्या घराच्या सावलीत थकून पडला होता. आम्ही तेथून चाललो होतो तेवढ्यात आमची नजर त्याच्याकडे गेली. आम्ही त्याच्या जवळ जाऊन त्याला बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याला बोलता येत नव्हते.
मग आम्ही त्याच्या हातात मैत्रीधागा बांधण्याचा प्रयत्न केला पण त्यानी तो मैत्रीधागा बांधू दिला नाही. त्याला वाटलं की हे मला काहीतरी इजा पोचवत आहेत. तो आम्हाला हातवारे करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्याला सांगायचे होते की माझे पाय खूप दुखत आहेत, मला खूप भूक लागली आहे. तो दमला होता. त्याच्या हातात एक भंगार गोळा करण्याची पिशवी होती.
नंतर आम्ही त्याला थोडी भाजी-भाकर दिली, तसेच त्याला जाण्यासाठी थोडेसे पैसे दिले. नंतर त्या मुलाच्या चेहऱ्यावर समाधान पाहून आम्हाला खूप आनंद झाला. नंतर तो मुलगा तेथून निघून गेला.
हा प्रसंग आम्ही वादविवाद स्पर्धा संपल्यानंतर सर्वांना सांगितला. सर्व जणांनी खूप टाळ्या वाजवल्या. तसेच आमच्या गटाचे निमंत्रक बाबा आहेत त्यांनीपण आमचे खूप कौतुक केले. अशा प्रकारे आमच्या मैत्रीदिन व वादविवाद स्पर्धा अगदी आनंदात पडली व नंतर आम्ही सर्वजण घरी गेलो.
Indian - Knowledge Group, अंबेजोगाई
गट निमंत्रक: चंद्रकांत वडमारे (९४२३३५२६४१)
२. जाणीव गटाला झाली जाणीव!
काल साजरा करण्यात आलेल्या विजयादशमीच्या सणानंतर आज आम्ही शाळेत आल्यावर सर्वजण एकमेकांना आपट्याची पाने देऊन शुभेच्छा देत होतो. आमच्या शाळेजवळच आपट्याचे झाड आहे. शाळेत सर्व मुलांनी भरपूर पाने आणली होती. ते एकमेकांना वाटल्यानंतर काही वेळातच ही पाने इकडे-तिकडे पहावयास मिळाली. मग सरांनी विचारले की, “या पानांचं आता करायचं? त्या झाडावर तर आता एकपण पण नाही राहिलंय?” यानंतर आम्ही सर्वांनी विचार केला की शुभेच्छा सोबत दिलेल्या पानांचा नंतर काहीही उपयोग झाला नाही पण तीच पाने झाडाला राहिली असती तर त्यांचा झाडाला उपयोग झाला असता. पर्यायाने आम्ही सर्वांनी त्या झाडाच्या अन्न प्रक्रियेमध्ये अडथळा आणून त्याचे मोठे नुकसान केले. 
याचा विचार करता आम्ही ठरवले की कोणत्याही झाडांची पाने तोडायची नाही आणि इतरांना तोडू देणार नाही. मग आम्ही सर्व वर्गातली पाने जमा केली. शेवटी आम्ही विचार केला की आता ही तोडलेली पाने तर आपण परत झाडाला चिकटवू शकत नाही मग शेवटी आम्ही ठरवले की या जमा झालेल्या पानांचा उपयोग पुन्हा त्या झाडाला व्हावा म्हणून त्या झाडाखाली खड्डा करून त्यात ती पाने पुरून टाकली, जेणे करून त्या झाडाला त्याचे खत म्हणून उपयोग होईल.
जाणीव संघ, बीड
गट निमंत्रक: सचिन महामुनी (८२७५२६८५२४)

३. हिरवळ सृष्टी गटाची क्षेत्रभेट
बोरसला नातू काकांच्या शेतात जायचे असे बरेच दिवस ठरवून जायचे, पण काही ना कारणांनी तो बेत रद्द होत होता. थोड्या दिवसांपासून तीव्रतेने यावर बोलणे चालू होते. त्यात आमच्यातीलच एक स्नेहल स्वतः नातू काकांच्या घरी जाऊन त्यांची परवानगी घेऊन आली. त्यानंतर तिथे कधी जायचे?, कसे जायचे? किती वेळ थांबायचे? असे अनेक प्रश्न आमच्या समोर आले. त्यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही सभा घेतल्या. त्यात असे मत मांडण्यात आले की रेल्वेने बोरस स्टेशनपर्यंत जायचे, त्याने पैसे आणि वेळ दोघेही वाचतील. पण रेल्वेने गेल्याने तिथे थांबायचा वेळ रेल्वेवर होता आणि रेल्वेस्टेशनवर जायचा आणि तिथून यायचा खर्च वेगळा होता म्हणून रिक्षाने जायचे असे ठरवले गेले. त्यानंतर तिथे किती वेळ थांबायचे? हा देखील एक महत्वाचा विषय होता. तिथे नुसता फेरफटका न मारता जास्तीत जास्त माहिती मिळवून मजा करून यावी, एवढा पुरेसा वेळ हवा म्हणून ३ ते ४ तास हा वेळ निश्चित करण्यात आला. डबाही सोबत घ्यावा असे सर्वांचे मत पडले. सर्वात महत्वाचे म्हणजे कधी जायचे? कोणाची न कोणाची काही न काही अडचण होती. शेवटी सर्वानुमते २ ऑक्टोबर ही तारीख ठरवण्यात आली. आमच्यातीलच एकाने रिक्षाचा तपास करून ती अडचण सोडवली. एकदाचा दिवस उजाडला.

आम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे सरांच्या घरी जमलो. रिक्षात बसलो. जाताना उत्साहाने भरून आतुरतेने बोरसची वाट पाहत होतो. तेथे पोचल्यावर शेतापर्यंत आम्ही चालत गेलो. नातू काका तेथे आले. त्यांनी प्रथम आम्हाला एका वनस्पतीचे नाव विचारले. आमच्यापैकी कुणालाही त्याचे नाव माहित नव्हते. ती तरोट्याची वनस्पती होती. तेथे अंकुश काकांनी आम्हाला बेहडा, शतावरी ई. झाडे दाखवली. नंतर आम्ही सर्वांनी तिथे झाडाच्या सावलीत डबा खाल्ला.
नंतर आम्ही पुढच्या शेतात चालू असणारी बाजरी कणसापासून वेगळी करण्याची क्रिया पहिली. नंतर परत शेतात जाऊन काहीतरी खेळायचे असे ठरवले. तेव्हा कोणीतरी झाडावर चढले मग आम्ही सर्वांनी तसा प्रयत्न केला व आम्ही चढलो. तेथे एक मोठा खड्डा होता, त्यात आम्ही पकडापकडी खेळलो. सरही आमच्या बरोबर होते. एवढेच नव्हे तर तेथील ३ मुलेही आमच्यात खेळली. मग घरी येण्याची वेळ झाली, आम्हाला घरी यायला १ वाजला. आम्हाला खूप मज्जा आली.
मृणाल शिंपी
हिरवळ श्रुष्टी गट, चाळीसगाव
गट निमंत्रक: सचिन पाखले, (९२७०१६१३५२)

४. आधुनिक  रावण
दि. २२/१०/१५ रोजी दसऱ्यानिमित्त वेगळा उपक्रम करायचे असे जागृती गटाच्या १६ तारखेच्या बैठकीत निर्णय झाला. दसरा साजरा करायचा पण तो कसा? हा प्रश्न सर्वांना पडला. प्रत्येक मुलाकडे जबाबदारी देऊन काम करायचे हे ठरले. जबाबदाऱ्या अशा की, रावण बनवणे, राम-लक्ष्मण, सीता, हनुमान यांची सजावट करणे, गदा बनवणे, स्वरचित घोषणांचे चार्ट बनवणे, इ. जबाबदाऱ्या गटातील मुलांकडे गट करून देण्यात आल्या. दसऱ्याच्या आदल्या दिवशी गटातील सर्व मुले उद्याच्या शोभायात्रेचे आमंत्रण देण्यासाठी डोमरी गावात गेली. सर्व लोकांनी मुलांना चांगला प्रतिसाद दिला.

शोभायात्रेचा आमचा खरा उद्देश हाच की, लोकांमधील रावणाचं प्रतिबिंब त्यांना लक्षात आणून देणं, लोकांमधील दुर्गुण त्यांना लक्षात आणून देणं. दुर्गुण म्हणजे इच्छा, आळस, भ्रष्टाचार, स्त्रीभ्रूणहत्या असे हे दहा दुर्गुण रावणाच्या दहा तोंडाला लावण्यात आले. या कार्यक्रमाची तयारी आम्ही दहा दिवस आधीच सुरू केली होती. हा कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरा न करता आधुनिक पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न केला. रावणाची प्रतिकृती गटातील दोघांनी हाताने चित्ररुपात बनवली होती. रावणाच्या हातात बंदूक दाखवली होती, रावणाला सिक्स पॅक दाखवले होते, डोक्याला गुंडासारखी टोपी दाखवली होती, अशा प्रकारे हा आधुनिक रावण होता. संपूर्ण रॅलीत गुरुकुलातील सर्व विद्यार्थी व कार्यकर्त्यांचा सहभाग होता. निसर्गाची हानी थांबवण्यासाठी हा एक प्रयोग केला की, कोणीही पारंपारिक आपट्याचा सोनं म्हणून वापर केला नाही. गटातील विद्यार्थ्यांनी स्वरचित घोषणांचे चार्ट बनवले होते. त्या चार्टमुळे शोभायात्रेची आणखी शोभा वाढली. रावण जाळल्यानंतर राहिलेला कचरा सुद्धा गटातील विद्यार्थ्यांनी अपेक्षित जागी टाकला. कार्यक्रम संपल्यानंतर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसत होता. या उपक्रमात भरपूर अनुभव व आनंद मिळाला.
जागृती गट, डोमरी
गट निमंत्रक: रज्जाक पठाण (९४२२७१२४४६)
५. पक्षी आपले मित्र
एके दिवशी मी आमच्या अंगणात जवळ बसलो होतो. मला एक चिमणी दिसली. तिच्याकडे बघून मग माझ्या मनात एक विचार आला. तो विचार असा की मी त्या चिमणीला काही जेवायला दयावं असं मला वाटलं. तर मी घरातले काही तांदूळ अंगणात टाकले तर त्या चिमणीला वाटले की मी जर जवळ गेली तर हा मुलगा मला पकडून घेईल पण मी त्या चिमणीला पकडणार नव्हता. तर  मी आमच्या घरात गेलो तर ती चिमणी आरोळ्या मारायला लागली तर तिच्याजवळ खूप साऱ्या तिच्या मैत्रिणी आल्या.
तिने सगळ्यांना बोलवून सांगितले की तिथे तांदूळ आहेत तर आपण ते तांदूळ आपल्या पिल्लांना देऊ व आपल्या पिल्लांचे पोट भरू. तर मी घरात गेलो नव्हतो, मी आमच्या खिडकीमधून पहातच होतो. तर ती चिमणी व तिच्या मैत्रिणी एक किंवा एक - दोन दाणे तोंडात पकडून त्यांच्या घरट्यात नेत जायचे. असे तर ते सगळे तांदूळ संपत होते त्यामुळे मी काही अजून तांदूळ घेतले व तिथे टाकले. पण काय? जवळ जाताच सगळे भुर्रकन उडून जायचे आणि मी लगेच घरात निघायचो. आमच्या खिडकीतून त्यांना बघायचो तर ते थोड्या वेळात परत यायचे व दाणे आपल्या घरट्यात ठेवायचे तर असे मी त्या चिमण्यांना खायला दयायचो.
मेहुल प्रमोद पाटील, एरंडोल

निमंत्रक: मल्लिका शेख (८८५७९६१६२८)