Sunday 31 January 2016

बनगरवाडी – व्यंकटेश माडगूळकर


बनगरवाडी नावाच्या एका संस्थानांच्या काळातील वाडीवर मास्तर म्हणून एका तरुण मुलाची नेमणूक होते. बनगरवाडी इनमिन ३०-३५ खोपट्याची वस्ती, वाडीतील बहुतांश लोक हे मेंढ्या पाळणारे धनगर. वाडीतील शाळेची दुर्दशाच झालेली. शाळेत मुले येत नसत. सगळी मुलं मेंढ्यांच्या मागे दिवसभर हिंडत. अशा या वाडीवर नवीनच आलेल्या या मास्तराला गावात शाळा चालवायची असते आणि वाडीत स्वतःच एक स्थान निर्माण करायचं असतं.

वाडीत आल्या आल्या मास्तरला दादू बालट्या भेटतो. दादू बालट्या मास्तरला दम देतो, वाडीत ढवळाढवळ न करण्याचा सल्ला देतो. मागच्या मास्तरला कसं वाडीतील लोकांनी मारलं होतं ते सांगतो. गावात आल्या आल्याच तरुण मास्तरचा धीर यामुळे खचतो. त्याला वाटतं की आपल्याला काही हे जमणार नाही, सरळ राजीनामा द्यावा आणि या गावातून पळून जावं.

पण तो थांबतो, नंतर त्याला वाडीतील इतर लोक भेटतात. वाडीचा कारभारी त्याला शाळा सुरु करण्यासठी मदत करतो. वाडीतील इतर लोकही जमेल तशी मदत करतात. लवकरच मास्तर वाडीशी एकरूप होऊन जातो. मास्तरशिवाय वाडीचे पानही हलत नाही. मास्तर म्हणजे गावचा जज्ज, पोलीस अधिकारी, पाटील-कुलकर्णी, आणि स्टँपव्हेंडर असं सगळं काही बनून जातो. वाडीतील लोक मास्तरांचा शब्द प्रमाण माणू लागतात. वाडीची सुखः दुखः मास्तरला आपले वाटू लागतात.

अशातच मास्तरकडे गावातील रामा नावाचा धनगर, जुने चलनातून बंद झालेले रुपये मोड करून आणायला देतो. मोड करून आणल्यावर मास्तरच्या खोलीतून हे पैसे चोरीला जातात. मास्तरचा जीव यामुळे खूप घाबरा होतो. आता आपल्यावर पैसे खाल्ल्याचा आळ येणार अशी मास्तरला भीती वाटते. इकडे मास्तर गावाशी एवढा एकरूप झाल्याने दादू बालट्याचं गावातील महत्व कमी होतं. दादू बालट्या मग मास्तर आणि वाडीचा कारभारी यांच्या मध्ये भांडण लावतो. त्यामुळे कारभारी मास्तरशी बोलणं बंद करतो. समोर उभ्या राहिलेल्या या संकटातून मास्तर मार्ग काढतो आणि आपलं शिकवण्याचं काम सुरु ठेवतो.

मास्तरच्या व वाडीच्या इतर लोकांच्या प्रयत्नांनी वाडीत एक तालमीची इमारत बांधायची असे ठरते. त्यासाठी मग वाडीत लगबग सुरु होते. वाडीतील लोकांकडून वर्गणी गोळा केली जाते. लाकूड, दगड, बाकी सामान जमा करायला मास्तर आणि वाडीतील जाणत्या लोकांची धावपळ सुरु होते. इमारतीचं उद्घाटन राजाच्या हस्ते करायचं असं ठरतं. राजा वाडीत येण्याचा दिवस येतो तरी इमारतीवर छप्पर पडलेलं नसतं. मग सगळी वाडी रात्रभर जागून बांधकाम पूर्ण करते. राजा येतो आणि मास्तरला, वाडीच्या कारभाऱ्याला आणि बाकीच्यांना शाबासकी देऊन जातो.


अशी या बनगरवाडीची आणि मास्तरच्या प्रयत्नांनी वाडीने एकत्र होऊन केलेल्या कामाची गोष्ट या पुस्तकात आहे. पुस्तकाचे लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या शब्द सामर्थ्याने पुस्तक वाचताना अक्षरशः बनगरवाडी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.

No comments:

Post a Comment