Sunday 31 January 2016

भेट वृत्तांत

कुमार निर्माण टीमने (प्रफुल्ल, प्रणाली व शैलेश) मराठवाडयातील गटांना भेटी दिल्या. सर्व गटांनी खूप छान प्रतिसाद दिला. मुलांसोबत खूप मज्जा आली.

डोमरी गट
सगळ्यात पहिली भेट आम्ही डोमरीतील ‘गुरुकुल’ येथील ‘जागृती’ गटाला भेट दिली. गुरुकुलाचा निसर्गरम्य परिसर हेच तेथील मुलांसाठी प्रेरणा आहे. गट निवासी शाळेत राहतो. मुले खूप स्मार्ट आहेत. खूप छान गट आहे. गटातील मुलांनी दिवाळीत बरेच कृतिकार्यक्रम केलेत. दुपारी गटातील सर्व मुले आम्हाला घेऊन शाळेच्या बाजूच्या डोंगरावर गेली. तिकडे पण आम्ही खूप मज्जा केली. थोड्याच दिवसात मुलांची पालकसभा असल्याने त्यासाठी मुले नाच, गाणी, नाटक यांच्या सरावात गुंग होती. आम्हालापण मुलांनी त्यांची नाटकं करून दाखवली.
गुरुकुलातील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे सर्व मुले तिथे शिक्षकांना भैय्या, काका, ताई असं म्हणतात. आम्हालाही सर्व मुले ताई-दादा म्हणून आवाज देत होती. सकाळ – संध्याकाळ मुले आमच्यासोबतच जेवायला बसत होती. मुले खूप लाघवी आहेत. दोन दिवसांत त्यांच्याशी छान attachment झाली.

आमची शाळा, खरपुडी

खरपुडीचा गटही निवासी शाळेत राहतो. त्यांचा परिसर खूप सुंदर आहे. गटात लहान-मोठी सगळीच मुले एकत्र छान काम करतात. गटातील मुलांनी सांडपाण्यावर खूप सुंदर बाग फुलावालीय. त्या बागेला त्यांनी Oxygen Park नाव दिलंय. गटातील मुलांसोबतच शाळेतील इतर मुले आणि शिक्षकही त्या बागेची खूप काळजी घेतात.
आम्ही शाळेतील मुलांसोबत छान खेळ घेतले, कोडी घातली, गाणं घेतलं. मुलांना खूप मज्जा आली. त्यानंतर गटातील मुलांसोबतही आम्ही memory game घेतला. मुलांनी त्याही खेळाचा खुप आनंद घेतला. आम्हालाही मुलांनी खूप प्रश्न विचारले. तिथे मुलांची एक नमुना बैठक आम्ही घेतली. मुलांनी खूप शांतपणे सगळं काही समजून घेतलं. मुलांसोबत एकूण छान मज्जा करून आम्ही गटाचा निरोप घेतला.
चौसाळा गट, बीड

चौसाळ्यातील गट हा शाळेतील विद्यार्थ्यांचा गट आहे. गट संख्येने लहान असला तरी गटात मुले-मुली दोघेही समप्रमाणात आहेत. शाळेचा परिसर खूप सुंदर आहे. मुले आमची वाट पाहत होती. आम्ही गेलो त्यादिवशी युवकदिन असल्याने गटातील मुलांनी आमचं छोटेखानी स्वागत केलं. मुले खूपच बोलकी आणि active आहेत. याआधी गटातील मुलांनी दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून वापरलेली आपट्याची पाने त्याच झाडाखाली खड्डा करून त्यात परत टाकली. एका मुलांनी घरी rain water harvesting करण्याचा प्रयत्न केला, गटातील काही मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तसेच इतर वर्गांवर जाऊन बाकीच्या विद्यार्थ्यांनाही फटाक्यांचे दुष्परिणाम समजावले आणि फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले. दिवाळीच्या फराळातील थोडंसं नाली साफ करणाऱ्या लोकांनाही दिलं. आणि याबरोबरच बरंच काही केलंय.
गटातील मुलांसोबतच इतरही काय चाललय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत होती. तिथे मुलांसोबतच जेवलो, आणि मुलांनी आम्हाला थोडा खाऊपण दिला. मुलांसोबत खूप छान गप्पा झाल्या. काही मुलांनी आम्हाला भरारी अंकात दिलेले गाणेही म्हणून दाखवले. तिथेही एकूण खूप मज्जा आली.

माजलगाव - सिद्धेश्वर गट

साधारण दुपारच्या सुमारास आम्ही सिद्धेश्वर विद्यालयात पोचलो. लगेचच निलेश राठोड सर आम्हाला भेटले. आम्ही गेलो तर गटातील मुले आमची वाट पाहत एका रुममध्ये बसलेली होती. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे या गटात जास्त प्रमाणात बहिण-भावंडे आहेत. त्यामुळे त्याचं छान जमतं. गटातील मुले खूपच बोलकी आणि चुणचुणीत आहेत. गेल्यानंतर गटाची व आमची एकमेकांशी ओळख व्हाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत memory game खेळलो. मुलांना तो खेळ खूप आवडला. त्यानंतर मुलांशी कुमार निर्माणशी संबंधित बऱ्याच विषयांवर चर्चा झाली. इतरही गप्पा झाल्या. मग मुलांनी हसत खेळत कुमार निर्माण म्हणजे काय हे पुन्हा एकदा समजून घेतलं. हे समजून घेत असताना मुलांनी आम्हाला खूप वेगवेगळे प्रश्न विचारले, त्यावरून त्यांचा संवेदनशीलपणा दिसून आला. कुमार निर्माण समजून घेताना आम्ही मुलांना आपल्या शाळेतील समस्या काही जाणवतात का असे सांगून मुलांना शाळेचे निरीक्षण करायला पाठवले. निरीक्षण करून गटात परत आल्यानंतर असं जाणवलं की मुलांनी खूप विचार करून समस्यांची यादी केलेली आहे. यावर मुलांनी हळूहळू काम करण्याचे ठरवले आहे.
त्यानंतर आम्ही मुलांसोबत ‘इहा...’ नावाचा खेळ खेळलो. त्यातही मुलांना खूप मज्जा वाटत होती. एका मुलाने छान भक्ती गीत म्हणून दाखवले.
आम्ही गेलो त्यादिवशी सिद्धेश्वर विद्यालयात विद्यार्थ्यांचा आनंद मेळावा सुरु होता. त्यात मुलांनी ‘खरी कमाई’ साठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे ठेले लावलेले होते. त्यात मग मुलांनी आम्हाला बरंच काही चविष्ट खायला दिलं.  बऱ्याच खाद्यपदार्थांचा आस्वाद घेऊन आम्ही गटाला पुन्हा लवकरच भेटू असं सांगून मुलांचा निरोप घेतला.
मोहा गट
सकाळच्या सुमारास आम्ही मोह्याला पोचलो. जाताना अंबाजोगाई दर्शन करत आम्ही मोह्याला पोचलो.  मोह्याच्या गटात जवळपास ३२ मुले-मुली आहेत. त्यातही मुले-मुली समप्रमाणात आहे. गटात ५ वी पासून ते १० वी पर्यंतची मुले आहेत. त्यामुळे मोठी मुले लहानांची छान काळजी घेतात. याही गटातील मुलांसोबत आम्ही ओळख करून घेण्यासाठी गमतीदार memory game खेळलो. मुलांनी त्या खेळाचा खूप आनंद घेतला.
आम्ही गेलो होतो त्या दिवशी संक्रांत होती. मुलांनी सांगितलं की आज १२ भाज्या आणि तिळीच्या भाकरीचं जेवण असतं. ते मस्तपैकी खाऊन आम्ही परत गटासोबत बसलो. मग गटाशी कुमार निर्माण संबंधित बरीच चर्चा झाली. विशेष म्हणजे या गटातील काही मुलांना मागील वर्षी माजलगावला झालेल्या कार्यशाळेचा संपूर्ण तपशील आठवत होता. याच तपशिलावरून पुन्हा एकदा आम्ही गटाला कुमार निर्माण म्हणजे काय हे समजून सांगितले.
याआधी गटातील मुलांनी यात्रेत खराब झालेली टेकडी साफ केली होती. गटातील बऱ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली होती आणि त्यातून वाचलेल्या पैशातून त्यांनी काहीतरी उपयोगी वस्तू घेतली होती. आता मुलांनी शाळेचं सुशोभीकरण करण्याचे ठरवले आहे. एकूण मुलांचं खूप छान चालू आहे.

उमरी गट

दुपारी १ च्या सुमारास आम्ही उमरी गावात पोचलो. गाव बरंच मोठं होतं. गावात गेल्यावर थोडावेळ भारतकडे बसून आम्ही शाळेवर गेलो. इथल्याही मुलांचा गट शाळेतील आहे. उमरीला दोन गटात प्रत्येकी १५ जण असून फक्त मुलांचा गट आहे. या गटाचं वैशिष्ट्य म्हणजे गटात १०वीची मुले जास्त प्रमाणात आहेत. एकाच गावात राहत असल्याने दोन्ही गटातील मुलांमध्ये खूपच चांगली ओळख आणि छान attachment होती. याही गटाची आम्ही मजेशीर memory game च्या मदतीने ओळख करून घेतली. मुलांनी छान आनंद घेतला.
यानंतर मुलांनी याआधी केलेल्या कृतिकार्यक्रमांचं sharing केलं. त्यात एक मुलगी शाळेसमोरील खड्ड्यात पडून तिचा हात मोडला होता तो खड्डा मुलांनी बुजवला तसंच शाळेसमोर एसटी बसचा थांबा असूनही तिथे एसटी बस थांबत नव्हती आणि यामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या मुलांची खूप गैरसोय होत होती. यावर उपाय काढण्यासाठी गटातील मुलांनी एकत्र येऊन एक नवीन एसटी बस थांब्याची पाटी बनवून ती शाळेसमोर लावली, यामुळे आज तिथे एसटी बस थांबते. यासोबतच नवरात्रीच्या यात्रेत एका मंदिरावर जाण्यासाठीच्या पायऱ्यांवर पडलेले बारीक खडे गटातील काही मुलांनी जाऊन उचलले आणि काहींनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. हे सगळे कृतिकार्यक्रम सांगतांना मुलांना खूप आनंद होत होता.
यासोबतच पुन्हा एकदा गटातील सर्व मुलांनी कुमार निर्माण म्हणजे काय हे चर्चेच्या माध्यमातून समजून घेतले. या चर्चेनंतर मुलांनी एका कागदावर गावातील त्यांना सोडवता येणाऱ्या प्रश्नांची यादी बनवली आम्हाला वाचून दाखवली. यानंतर मुलांनी यादी केलेल्या प्रश्नांवर काम करण्याचे ठरवले आहे.
छान गप्पागोष्टीच्या स्वरुपात मुलांसोबत बोलून आम्ही गटाचा निरोप घेतला.

औरंगाबाद गट

अगदीच सकाळी ८च्या सुमारास आम्ही साताऱ्याच्या गटाला भेटलो. संक्रांतीचा दुसराच दिवस असल्याने शाळेतील मुले छान रंगीबेरंगी कपडे घालून आली होती. आम्ही गेल्यावर निमंत्रक तसेच गटातील मुलांनी आम्हाला तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. शाळेच्या पटांगणावर मस्तपैकी उन्हात आम्ही गटासोबत गप्पा करायला बसलो. गटात मुलींचं प्रमाण जास्त आहे. गटातील मुलं खूपच active आहेत.
याआधी मुलांनी शाळेमागील टेकडीवर जाऊन प्लास्टिकच्या पिशव्या उचलल्या होत्या. गटातील बऱ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली तसेच फटाकेमुक्त दिवाळी संदर्भात भित्तीपत्रके बनवून ती शाळेच्या भिंतींवर लावली आणि इतर मुलांनाही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन दिले. नुकतंच संक्रांतीच्या निमित्ताने गटातील मुलांनी कागदी पिशव्या बनवून तेथील भाजीवाले तसेच मेडिकलवाल्यांना दिल्या. मुलांनी आम्हालाही आठवण म्हणून एक-एक पिशवी दिली. यापुढे गटाने शाळेजवळील अनाथालयाला भेट देण्याचे ठरवले आहे. गटासोबत कुमार निर्माण संबंधित चर्चा होत असताना मुलांनी बरेच प्रश्न विचारले. आम्ही घातलेल्या कोड्याचा बराच विचार करून गटातील एकीने त्या कोड्याचे उत्तरही दिले. आम्हालाही गटासोबत खूप मज्जा आली. मुलांसोबत ‘इहा...’ हा खेळ खेळून आणि बऱ्याच गप्पा करून आम्ही तिथून परतीच्या प्रवासाला निघालो.


एकूण सर्वच गटांसोबत खूप मज्जा आली. आम्हाला वाटलेली सर्वात छान गोष्ट म्हणजे आम्हाला “तुम्ही पुन्हा आमच्याकडे कधी येणार?, तुम्ही लवकर आमच्याकडे या, आम्हाला पुन्हा भेटायला नक्की या.” हे आम्हाला प्रत्येक गटाने हक्काने सांगून पुन्हा येण्याचे promise आम्हा तिघांकडून घेतले. आणि म्हणून तुम्हा सर्वांना promise केल्याप्रमाणे आपण सर्वजण लवकरच पुन्हा एकदा भेटू आणि अशीच मज्जा करू.

No comments:

Post a Comment