मा. डॉ.अभय बंग व मा. विवेक सावंत यांच्या प्रेरणेतून कुमार निर्माण हा शैक्षणिक कार्यक्रम सुरु झाला. “प्रत्यक्ष कृतींमधून शालेय मुला-मुलींमध्ये वैश्विक मानवी मुल्ये व सामाजिक बुद्धिमत्ता रुजवणे, व त्यांचा विकास करून उत्तम माणूस घडवणे हे कुमार निर्माण चे मुख्य उद्धिष्ट आहे.” सदर ब्लॉगचे उद्दिष्ट कुमार निर्माणचे द्वैमासिक भरारी प्रकाशित करणे आहे.
Monday 29 February 2016
या अंकात
संपादकीय मंडळ
नरेंद्र खोत
प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव
संपर्क: ९४२०६५०४८४, ९५०३०६०६९८
संपादकीय
नमस्कार बालमित्रांनो,
एव्हाना तुमची परीक्षेची तयारी जोरात सुरु झाली असेल. दहावीची तर परीक्षाही सुरु झाली आहे. अभ्यास करताना आता तुम्हाला बाकी गोष्टींसाठी वेळही कमी पडत असेल. तुमच्या शालेय परीक्षेसाठी कुमार निर्माण तर्फे ऑल द बेस्ट! तुम्हा सर्वांना परीक्षेत अपेक्षित यश मिळावे यासाठी खूप शुभेच्छा!
शाळेतील परीक्षेसोबतच तुम्ही समाजातील आणि जीवनातील प्रश्नपत्रिकाही कुमार निर्माणच्या माध्यमातून सोडवू लागला आहात त्याबद्दल तुमचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. मोठ्यानाही जमणार नाही आणि सुचनारही नाहीत अशा विलक्षण कृती तुम्ही मुलं करतायत. तुमच्या या कृतींकडे आणि तुम्ही केलेल्या चांगल्या बदलांकडे बघून आम्हा मोठ्यानाही चांगलं काम करण्यासाठी हुरूप येतो.
मात्र समाजातील विविध प्रश्न बघण्याची आणि त्यावर आपल्या परीने उत्तरं शोधून त्यावर प्रत्यक्ष कृती करण्याची जी सुरवात तुम्ही केलीय तिच्यात या परीक्षेनंतर येणाऱ्या सुट्टीत खंड पडता कामा नये.
शाळेत असताना किंवा शाळा सुरु असताना तुमच्या गटानी मिळून खूप सारे कृती कार्यक्रम केले आहेत. पण आता सुट्ट्यात तुम्ही मामाच्या किंवा स्वतःच्या गावाकडे सुट्ट्यांत जाल, तेव्हा तुमचा गट कदाचित तुमच्या सोबत नसेल. पण तुमच्या पैकी बहुतेक मुलांनी जसे दिवाळीत छोटे छोटे उपक्रम आपल्या घरी व आजूबाजूला केले तसेच उपक्रम तुम्ही या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये करू शकता. हे उपक्रम तुम्ही एकट्याने तर करूच शकतात पण मामाच्या गावातील व आपल्या गावातील आपल्या इतर मित्रांना सोबत घेऊनही असे उपक्रम तुम्ही करू शकता. मग ते मित्र आपल्या कुमार निर्माणच्या गटातील नसले तरी चालेल.
प्रत्येक नवीन प्रश्न आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येत असतो. तर मग अशाच नवीन समस्या, प्रश्न आणि नवीन संधी या सुट्ट्यांमध्ये शोधूया. त्या प्रश्नांवर आपापल्या परीने उपाय शोधून परिसरात चांगला बदल घडवून आणून आपण या सुट्ट्यांचा सदुपयोग करूया. सुट्ट्या लागून तुम्ही सर्व गावी जाण्याआधी आपल्या गटाची एक बैठक नक्की घ्या व त्यामध्ये सर्वांनी मिळून सुट्टीचा कार्यक्रम ठरवा.
तुमच्या माहिती साठी कुमार निर्माणच्या गटातील काही मुलांनी सुट्टीत एकेकट्याने केलेले काही उपक्रम खाली देत आहोत. अशा प्रकारचे उपक्रम तुम्हीदेखील करू शकता.
· पाण्यासाठी तडफडणाऱ्या चिमणीला देविसाठीचा नारळ फोडून पाणी पाजले. – किशोर ढाळे.
· अनोळखी माणसाला खायला दिले. – विशाल बादाडे.
· मी आणि मित्रांनी मिळून गल्ली साफ केली. – आकाश रांजवन.
· एका गरीब नग्न व्यक्तीला वडिलांची पॅन्ट दिली. – नारायण तांगडे.
· जवळपास सगळ्याच मुलांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. इतरांनाही फटाके फोडू नका असे सांगितले.
· परिसरातील आजी आजोबांशी संवाद साधला व त्यांना पाठ असलेली लोकगीते, गोष्टी, अनुभव याचे संकलन करून हस्तलिखित काढले.
· परिसरातील रुग्णालय, ग्रामपंचायत, पोलीस स्टेशन, बाजार यांना भेट देऊन तेथील लोकांशी संवाद साधला.
असे अनेक उपक्रम तुम्ही मुलांनीच दिवाळीच्या सुट्टीत केले आहेत. हे उपक्रम आपण वेळोवेळी भरारी मधून वाचतोच. हे व यापेक्षा वेगळे अनेक उपक्रम तुम्हाला सुचू शकतात. उदा. उन्हाळा म्हटलं की सगळीकडेच पाणी टंचाई असणार, मग तुम्ही पक्ष्यांसाठी पाणी ठेवू शकतात, स्वतः पाणी जपून वापरू शकता आणि इतरांनाही पाणी जपून वापरण्याचे महत्व पटवून देऊ शकतात. आजूबाजूच्या लहान मुलांना छान छान गोष्टी सांगू शकतात. तुम्हाला माहित असलेले नवीन खेळ त्यांना शिकवू शकतात. एखादा विज्ञानाचा प्रयोग करून बघू शकतात. गावातील इतर समस्या शोधून त्यावर काही उपाय म्हणून कृती कार्यक्रम करू शकतात ई.
इथे दिलेल्या कृती आम्ही फक्त उदाहरण म्हणून दिल्या आहेत. शक्यतो नेहमी प्रमाणे तुमच्या डोक्यातून एखादी वेगळीच सुपीक आयडिया तुम्ही काढालच!
इथे दिलेल्या कृती आम्ही फक्त उदाहरण म्हणून दिल्या आहेत. शक्यतो नेहमी प्रमाणे तुमच्या डोक्यातून एखादी वेगळीच सुपीक आयडिया तुम्ही काढालच!
बाकी या सुट्ट्यांमध्ये भरपूर खेळ खेळा, मस्ती करा, नवीन मित्र बनवा, नव-नवीन गोष्टी शिका, निरीक्षण करा आणि परिसरातील छोटमोठ्या प्रश्नरूपी आव्हानांनाही सामोरे जा. ही आव्हानच तुमच्या समोरील संधी आहेत. आणि शेवटी तुम्ही सुट्टीत काय काय मज्जा केली त्याचे अनुभव आम्हाला लिहून पाठवा किंवा फोन करून नक्की कळवा.
सुट्ट्यानंतर परत शाळा सुरु झाल्या की पूर्ण वर्षभरातील व सुट्ट्यामधील तुमचे कृती कार्यक्रम समजून घेण्यासाठी आपण सर्व विभागीय स्तरावरील गटांच्या एकत्र सादरीकरण कार्यशाळा घेऊ, तेव्हा भेटूच!
— टिम कुमार निर्माण
गोष्ट एका बालयोद्ध्याची!
१९८३ साली पाकिस्तान मधील मुर्दिक्त नावाच्या गावी एका गरीब कुटुंबात ‘इकबाल मसिह’ या मुलाचा जन्म झाला. त्याच्या कुटुंबात आपल्यासारखेच आई-बाबा होते, त्याच्या बहिण-भावंडांचा गोंधळ चाललेला असायचा. त्याची आई गावातील लोकांकडे घरकाम करून कुटुंब चालवायची. परंतु इतक्या कमी पैशात घर चालवताना तिची खूप दमछाक होत असे. आई कामामुळे बाहेर असल्याने इकबालची मोठी बहिण त्याचा सांभाळ करत असे, त्याची काळजी घेत असे.
इकबाल चार वर्षांचा असतना त्याच्या मोठया दादाचे लग्न ठरले, परंतु लग्न-समारंभ पार पडण्यासाठी त्याच्या घरच्यांकडे पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्यांच्यासमोर एकच पर्याय होता तो म्हणजे गावातील स्थानिक सावकार! इकबालच्या गावातील या स्थानिक सावकाराचा स्वतःचा चटया-गालिचे बनवण्याचा कारखाना होता. इकबालच्या दादाच्या लग्नासाठी त्या स्थानिक सावकाराने ६०० रुपये इकबालच्या कुटुंबाला कर्ज म्हणून दिले. पण ते देताना स्थानिक सावकाराने अशी अट घातली की कर्ज संपेपर्यंत त्यांच्या लहान मुलाला म्हणजे इकबालला सावकाराच्या कारखान्यामध्ये कामाला ठेवावे लागेल. नाईलाजाने इकबालच्या कुटुंबाने या गोष्टीला होकार दिला आणि इकबाल त्या सावकाराला अवघ्या ६०० रुपयांत विकल्या गेला. हुंदडण्याच्या - खेळण्याच्या वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी इकबालच्या आयुष्यातील दुष्ट्चक्राला सुरवात झाली.
चार वर्षांचा इकबालचे कोवळे हात कारखान्यातल्या यंत्रांवरून फिरायला लागले. त्याच्यासोबत त्याच्या आधी आलेली बरीच लहान मुले तिथे काम करत होती. पहिलं एक वर्ष इकबालला बिनपगारी काम करावं लागलं आणि या एका वर्षात त्याच्या जेवणाचा सगळा खर्च त्याच्या कुटुंबावर असलेल्या कर्जाच्या रकमेत मिळवल्या गेला. व यासोबतच कर्जावरील व्याजाची रक्कमही कर्जात मिळविली जात असे. हे कमी की काय म्हणून या वर्षात काम करताना इकबालकडून झालेल्या चुकांचा दंडही त्याच कर्जात मिळवल्या गेला आणि एकूण कर्ज कमी न होता उलट वाढीला लागलं. पुढील वर्षात इकबालच्या कामावर त्याचं कुटुंबाने सावकाराकडून अजून एकदा कर्ज घेतलं आणि हे दुष्टचक्र संपण्याच्या ऐवजी अधिकच वाढलं.
या काळात इकबाल १० वर्षांचा झाला आणि कर्जाची रक्कम वाढून १३,००० रुपये झाली. इकबाल आणि त्याच्यासारख्या अनेक मुलांना खूप भयानक परिस्थितीत काम करावं लागत होतं. त्यांना दिवसभर एका लाकडी फळीवर पायाच्या तळव्यांवर बसून, पुढे वाकून चटयांमध्ये लाखो गाठी माराव्या लागत असत. प्रत्येक धागा निवडून त्याची काळजीपूर्वक गाठ बांधण्यासाठी या मुलांना दिवसभर अशाच पद्धतीने बसून राहावे लागत असे. त्यांना एकमेकांशी बोलायची परवानगी नसायची. जर चुकून एखाद्या मुलाने दिवसा स्वप्न पाहण्याचा प्रयत्न केलाच तर तिथला शिपाई यंत्राच्या समोर बसलेल्या मुलाला मारायचा आणि बऱ्याचदा अवाढव्य यंत्रात धागा कापल्या जाण्याच्या ऐवजी मुलांची बोटे अडकून तुटत असत.
इकबालने इतक्या भयानक वातावरणात दररोज १४ तास आणि आठवडयातले ६ दिवस काम केले. तो ज्या खोलीत काम करत असे ती खोली प्रचंड तापलेली असायची आणि धाग्याची गुणवत्ता घसरू नये म्हणून त्या खोलीच्या खिडक्याही उघडल्या जायच्या नाहीत. आणि दिवसभर या मुलांच्या डोक्यावर दिवे लोंबकळत असायचे.
या सगळ्यात जर मुलांना घरची आठवण आली, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, ते आजारी पडले तर त्यांना शिक्षा दिली जायची. खूप निर्दयी अशा शिक्षा असायच्या ज्यात प्रचंड शारीरिक मारझोड, बांधून ठेवणे, एकट्या मुलाला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवणे, दोरीला उलटं टांगणे अशा गोष्टींचा समावेश होता. इकबालला बऱ्याचदा वरील काही कारणांमुळे अशा शिक्षा झाल्या होत्या. आणि या सगळ्या कामासाठी त्याला खूप कमी पैसे देण्यात आले.
सहा वर्ष गालिचे-चटया बनवण्याचे काम केल्यानंतर इकबालला एके दिवशी Bonded Labor Liberation Front (BLLF) (असा गट जो इक़बालसारख्या लहान मुलांची वेठबिगारीतून सुटका करण्यासाठी काम करतो) विषयी कळलं. इकबाल त्याचं काम संपवून कसातरी त्या गटाच्या बैठकीत जाऊन बसला. त्या बैठकीत त्याला कळलं की पाकिस्तान सरकारने १९९२ मध्येच पेशगी बंद केली आणि सरकारने या स्थानिक सावकारांचं लोकांवरचं कर्जही रद्द केलंय.
तेव्हा इकबालला लक्षात आलं की त्याची आत्तापर्यंत तिथून सुटका व्हायला हवी होती. मग तो बी.एल.एल.एफ चे अध्यक्ष ईशान उल्लाह खान यांना भेटला आणि त्याची कहाणी त्यांना सांगितली. अध्यक्षांनी इकबालला कागदपत्रांची पूर्तता करायला मदत केली आणि त्याच्या कारखानदाराच्या लक्षात आणून दिले की आत्तापर्यंत त्याची सुटका व्हायला हवी होती. आणि इकबालने फक्त त्याच्याच नाही तर त्याच्यासोबत काम करणाऱ्या इतर मुलांच्याही सुटकेची मागणी केली.
शेवटी इकबालची सुटका झाली आणि तो बी.एल.एल.एफ च्या शाळेत शिकू लागला. त्याला शिकण्याची खूप आवड होती. चार वर्षांचा अभ्यासक्रम त्याने अवघ्या दोन वर्षांत पूर्ण केला. आणि तिथून त्याने बी.एल.एल.एफ च्या चळवळीत भाग घेऊन वेठबिगारीत अडकलेल्या मुलांच्या बाजूने लढण्यास सुरवात केली. खरंतर ही मोहीम बरीच धोकादायक होती परंतु तरीही इकबालने तो काम करत असलेल्या कारखान्यातून अशी माहिती गोळा केली की तो कारखाना बंद पाडल्या गेला आणि हजारो लहान मुलांची त्यातून सुटका झाली.
हळूहळू इकबालने बी.एल.एल.एफ च्या बैठकींत तसेच आंतरराष्ट्रीय ठिकाणी या विषयावर बोलण्याची सुरवात केली. तो त्याच्या अनुभवांविषयी बोलायचा. त्याला एक वेठबिगारी कामगार म्हणून झालेल्या त्रासाविषयी तो बोलायचा. या ६ वर्षांच्या कामामुळे लहानग्या इकबालचे शारीरिक तसेच मानसिक पातळीवर प्रचंड नुकसान झाले होते. या सर्व गोष्टी तो त्याच्या भाषणांतून प्रकर्षाने मांडायचा. अशी त्याची बालमजुरांचे प्रश्न मांडणारी भाषणे जगभर झाली.
१० वर्षांचा असूनही त्यांची उंची आणि वजन खूप कमी होतं. या कारणामुळे लहानश्या इकबालला बऱ्याच व्याधींनी ग्रासलं. त्याला मूत्राशयाचा त्रास, संधिवात, पाठदुखी यासोबतच श्वास घ्यायलाही त्रास होत होता. या सगळ्या कामात इकबालचं बालपण संपूर्णपणे हरवल्या गेलं. मात्र त्याचं तरुणपण त्याला हरवू द्यायचं नव्हत. त्याच्या बी.एल.एल.एफ मधील कामाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतल्या गेली आणि १९९४ मध्ये त्याला अमेरिका सरकारकडून Reebok Human Rights Award मिळाले.
एवढं जोखमीचं काम करत असल्याने इकबालला बऱ्याचदा धमकीची पत्र देखील यायची परंतु त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
१६ एप्रिल १९९५ रोजी, रविवारी इकबाल आपल्या कुटुंबासोबत इस्टर साजरा करण्यासाठी त्याच्या गावी आलेला होता. त्या दिवशी त्याने त्याच्या कुटुंबासोबत खूप मजा केली. आणि जरा वेळाने त्याच्या दोन भावंडासोबत तो त्याच्या काकांना भेटायला घराबाहेर पडला. अचानक समोरून कुणीतरी इसम गाडीवर आला आणि त्याने इकबालवर गोळ्या झाडल्या. यातच इकबालचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्वतःला जे सहन करावं लागलं ते इतर मुलांना सहन करावं लागू नये, इतर मुलाचं लहानपण हरवू नये म्हणून प्रयत्न करणाऱ्या या बालयोध्याचा वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी खून करण्यात आला.
इकबाल अजरामर झाला. परंतु आजही वेठबिगारी करणाऱ्या मुलांच्या समस्या कमी झाल्या नाहीयेत. खासकरून पाकिस्तान आणि भारतातील लाखो मुले कारखान्यांत काम करतात. जिथे गालिचे, चटया, विटा, बिड्या, फटाके आणि कपडे बनवले जातात. इकबालच्या जाण्यानंतर त्याच्या नावाने बऱ्याचश्या सकारात्मक गोष्टींची सुरवात झाली. इकबाल बऱ्याच संस्था सुरु करण्यामागील प्रेरणा ठरला. कॅनडा युथ मुव्हमेंटने सुरु केलेली ‘फ्री द चिल्ड्रन’ नावाची संस्था, ‘इकबाल मसिह शहीद चिल्ड्रन फौंडेशन’ ज्यांनी पाकिस्तानात २० शाळा सुरु केल्या. १९९४ मध्ये इकबालने ब्रॉड मिडोज मिडल स्कूलला भेट देऊन ७ वीच्या मुलांसोबत संवाद साधला होता. ज्यावेळी त्या मुलांनी इकबालच्या खुनाबद्दल ऐकलं तेव्हा त्यांनी त्याच्या स्मरणार्थ पाकिस्तानमध्ये शाळा बांधण्यासाठी पैसे जमवले. सन २००० मध्ये इकबालच्या नावाने ‘द वर्ल्डज चिल्ड्रन्स प्राईज फॉर द राईटस ऑफ द चाइल्ड’ चे उद्घाटन जिनेवामध्ये झाले. २००९ मध्ये युनायटेड स्टेटस् कॉंग्रेसने वार्षिक ‘इकबाल मसिह अवार्ड फॉर द एलीमीनेशन ऑफ चाइल्ड लेबर’ ची स्थापना केली. २०१४ साली कैलाश सत्यार्थीनी त्यांना मिळालेला नोबेल सन्मान इकबाल आणि त्याच्यासारख्या अनेक योद्ध्यांना समर्पित केला आहे.
कुमार गीत - त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं..
त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं..
त्या कुंपणाच्या पल्याड गं
मला खात्री हाय.. माझी मैत्रीण हाय
त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं....
तुम्ही म्हणाल मला तिचं नाव काय
म्या खरच सांगते ठाव नाय
असल झहिरा झिनत सलमा
वहिदा नाहीतर असेल जरीना
काय असल कुणाला दखल म्या म्हनते
नावात एवढं असतंय काय.. असतंय काय, माझी मैत्रीण हाय.
त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं....
तुम्ही म्हणाल मला तिचं गाव काय
म्या खरचं सांगते ठाव नाय
असल पेशावर रावळपिंडी
लाहोर नाहीतर असल कराची
काय असल कुणाला दखल म्या म्हनते
गावाबिगर काय अडतंय काय
अडतंय काय, माझी मैत्रीण हाय.
त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं...
तुम्ही म्हणाल मला ती करते काय
नाय ठाव परी अंदेसा हाय
असल रांधत दळत कांडत
रानाला नाहीतर तान्ह्याला पाजत
काय असल कुणाला दखल म्या म्हनते
बाई दुसरं करणार काय करणार काय, माझी मैत्रीण हाय.
त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं......
तुम्ही म्हणाल मला मग वळख कशी
आमच्या दोघींचं बाप हाय बार्डर पाशी
असल तिच्याबी उरात धडकी
माझ्यावानी झोप उडाली
काय होईल कवा काय घडल ही भीती
ह्योच वळखीचा धागा हाय धागा हाय, माझी मैत्रीण हाय.
त्या तिथं.. पलीकडं.. तिकडं......
सौजन्य – श्री.विनायक कदम
हे गीत ऐकण्यासाठी खालील विडीयो बघा
भेट वृत्तांत
कुमार निर्माण टीमतर्फे प्रणाली व शैलेश
यांनी कुमार निर्माणच्या काही गटांना भेटी दिल्या. सर्व गटांनी खूप छान प्रतिसाद
दिला. त्याबद्दलचा हा वृत्तांत.
पवनी, भंडारा
गडचिरोलीला येथून ‘निर्माण’ चे शिबीर
करून आम्ही पवनीच्या गटाला भेट द्यायला गेलो. हा एका शाळेतील गट आहे. परिपाठाच्या
वेळी आम्ही शाळेत पोचलो आणि परिपाठ झाल्यानंतर मुलांसोबत संवाद साधायला सुरवात
केली. २० मुलांच्या या गटात मुले-मुली समप्रमाणात आहेत. सुरवातीला आम्ही छानश्या
खेळाच्या मदतीने मुलांशी ओळख करून घेतली. आम्ही येणार म्हणून या गटाने आमच्यासाठी
दोन नाटुकले बसवले होते. आमची ओळख झाल्यानंतर मुलांनी दोन्ही नाटुकले सादर केले.
खूप संवेदनशील असे विषय मुलांनी निवडले होते. त्यात एका गटाचा विषय होता ‘स्त्री-भ्रूणहत्या’ तर दुसऱ्या गटाचा ‘स्वच्छतेचं महत्व’. खूप साध्या आणि सोप्या संवादातून
मुलांनी हे विषय हाताळले. सादरीकरणाच्या वेळी मुलांमधला आत्मविश्वास खूप
प्रकर्षाने जाणवला. यानंतर मग आम्ही पुन्हा गटात चर्चा करायला बसलो आणि मुलांनीच
विचारलेल्या प्रश्नांवर चर्चा करता करता मुलांनी कुमार निर्माण पुन्हा एकदा नीट
समजून घेतले. नंतर मग मुलांनी आत्तापर्यंत केलेल्या कृतिकार्यक्रमांबद्दल
सांगितले. मुलांनी गटात एक सुई-दोऱ्याची बरणी ठेवलीये आणि त्यात नेलकटर पण ठेवलंय.
लहान मुलांच्या शर्टला बटने लावणे आणि त्यांची नखे कापणे या उद्देशाने ती बरणी
मुलांनी ठेवलीये. स्नेहसंमेलनासाठी मुलांनी प्लास्टिकचा नवीन फलक न बनवता
परिसरातील प्लास्टिक वेचून त्यापासून सुंदर असे शाळेचे नाव बनवून कापडावर लावले
होते.
यापुढे कुठले कृतिकार्यक्रम करावे यावर मुलांनी आमच्याशी चर्चा केली आणि ठरवले
देखील. त्यानंतर एक मजेदार गेम घेऊन पुन्हा लवकरच भेटू असे ठरवून आम्ही तेथून
निघालो.
मी माणूस’ गट आणि ‘मैत्र’
गट नाशिक
‘मी माणूस’ गट आणि ‘मैत्र’
गटाला भेटायला आम्ही नाशिकच्या महाराष्ट्र विज्ञान परिषदेच्या
प्रयोगशाळेत पोहचलो. तेथील मुलांचे प्रयोग आणि त्यावरील चर्चा प्रथम आम्ही ऐकली.
मुले खेळाच्या माध्यमातून विज्ञान शिकत होते. अजित टक्के सरांसोबत गप्पा मारून मग
आम्ही मुलांशी गप्पा मारायला खाली मैदानात आलो. मुलांसोबत गटातील काही मुलांचे
पालक पण उपस्थित होते. मग आम्ही गटात बसून सगळ्यांशी खेळाच्या माध्यमातून ओळख करून
घेतली. गटातील मुलांशी, कुमार निर्माण आणि त्यात मुलांनी
केलेले कृती कार्यक्रम या विषयी चर्चा झाली.
मुलांनी त्यांनी केलेले उपक्रम आम्हाला सविस्तर सांगितले. गटातील मुलांनी
प्लास्टिकच्या वापराचे दुष्परिणाम परिसरातील दुकानांमध्ये जाऊन समजावून सांगितले.
जीवनशैली मेळाव्यात जावून तेथील स्टॉलवर जाऊन माहीती घेतली आणि त्यांना मदत केली.
मुलांनी कंपोस्ट खत बनवले. असे अजूनही अनेक उपक्रम आणि त्या दरम्यान त्यांना आलेले
अनुभव मुलांनी सांगितले. ही चर्चा सुरु असतानाच धीरज दादा आणि नशिकच्याच ‘मैत्र’ गटातील तेजस हे दोघेही तेथे आले. आम्ही त्या दोघांचं स्वागत केलं आणि मग
तेही चर्चेत सहभागी झाले.
दोन्ही गटातील मुलं अतिशय उत्साही आहेत. या गटातील मुलांना कब्बडी खेळायची
होती पण वेळ कमी पडल्याने आम्ही त्याऐवजी दुसरा एक खेळ खेळलो.
‘मी माणूस’ गटातील मुलांनी त्यांच्या गटाचे नाव ‘मी माणूस’
असं का निवडलं आहे हे देखील सांगितलं. ‘आपली
ओळख संगतानी आपण आपले नाव, पत्ता, शिक्षण,
व्यवसाय हे सगळं सांगतो पण आपण सगळ्यात पहिले माणूस आहोत हे मात्र
विसरतो म्हणून आम्ही आमच्या गटाचं नाव ‘मी माणूस’ असं ठेवलंय असं ही मुलं म्हणाली’. नंतर अजित सरांशी
आणि धीरज दादाशी गप्पा मारून आम्ही पुढे निघालो.
नगाव, धुळे.
नगाव च्या गटाला भेट द्यायला पोहचायला आम्हाला खरं तर उशीर झाला होता पण तरीही
मुलं आमची वाट बघत होती. आम्ही या मुलांसोबत रात्री अंधारात मोकळ्या गच्चीवर मस्त
गार हवेत बसून गप्पा मारल्या. मुलांशी ओळख झाल्यानंतर गटाने केलेल्या कृती
कार्यक्रमांची माहिती आम्ही घेतली.
कुमार निर्माणच्या या गटाने विविध विषयांवर माहिती मिळवून त्यावर बैठकीत चर्चा
केली. एकाने माहिती मिळवून ती गटाला सांगायची असं त्यांनी ठरवले होते. या अंतर्गत
त्यांनी बर्मुडा ट्रेंगल, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तीविसर्जनानंतर काय होतं अशा अनेक
विषयांवर माहिती मिळवली. ही माहिती मुलांनी पुस्तकं, वर्तमानपत्र, T.V., शिक्षक किंवा ताई-दादाकडून मिळवली होती.
गटातील मुले नियमित बैठक घेऊन त्यामध्ये ही माहिती एकमेकांना सांगत असतात.
मुलांनी पुन्हा एकदा कुमार निर्माण आणि
त्याअंतर्गत करायचे उपक्रम या विषयी चर्चेतून समजून घेतले. नंतर आम्ही गटासोबत
गावातील समस्या आणि त्यावर काय चांगले उपक्रम करता येतील या विषयी चर्चा केली.
मुलांनी अनेक करता येण्याजोगे उपक्रम सुचवले. गटातील मुलांना आम्ही एक कोडे
विचारले आणि कोड्यावर विचार करयला मुलांना वेळ मिळावा म्हणून मुलांसोबत खेळ खेळलो.
बराच वेळ विचार केल्यानंतर मग मुलांना कोड्याचं योग्य उत्तर सापडलं आणि गटातल्या
एकाने त्यासाठी बक्षीसही मिळवलं.
चाळीसगाव गट
चाळीसगावला कुमार निर्माणचे दोन गट आहेत, ‘हिरवळ सृष्टी’ गट
आणि ‘ज्योतिबा गट’. दोन्ही गटातील मुलं
एकत्रच बैठका घेतात त्यामुळे आम्ही दोन्ही गटातील मुलांना एकत्रच भेटलो. शाळा करून
आल्यानंतरही मुलं अगदी टवटवीत होती. पाखले सर आणि नानकर मॅडम यांच्या घरी आम्ही
मुलांशी बोलायला जमलो होतो. गटाशी ओळख करून मग आम्ही त्यांचे कृती कार्यक्रम आणि
अनुभव ऐकले.
या गटाने निवडणूक घेऊन गट प्रमुख ठरवलाय. हे गट नातू काकांच्या शेतात भेट
द्यायला गेले होते. तिथे त्यांनी नातू काकांकडून शेतीविषयीची माहितीही घेतली.
विशेष म्हणजे या भेटीची जाण्या-येण्याची पूर्ण व्यवस्था मुलांनीच बघितली. गटाने
शाडू मातीचे गणपती बनवले आणि आपापल्या घरी बसवले. गटातील बहुतांश मुलांनी
फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली. मुलांनी गरजू व्यक्तींना मदत केली. अजूनही अनेक
उपक्रम गटातील मुलांनी केले. मुले सेवादलाच्या कार्यालयाला भेट द्यायला गेले होते
तिथे त्यांना अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कट्यारे सर भेटले होते. त्यांनी या
मुलांना अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग दाखवले. यातून मुलांमधील अंधश्रद्धा कमी
व्हायला मदत झाली.
चाळीसगावला या मोठ्या मुलांच्या गटासोबतच एक लहान मुलांचा गट देखील आहे. या
लहानग्यांच्या ‘गांधीजी
गटा’ सोबत देखील आम्ही खूप दंगा केला. या गटाने दिवाळी मध्ये
‘साधना’ मासिकाचा दिवाळी बालकुमार अंक
घरोघरी जावून विकला. हा उपक्रम कसा सुचला हे संगताना श्रुष्टी म्हणते, “मी एलिझाबेथ एकादशी हा सिनेमा बघितला. मग मला वाटलं की आपणही बांगड्या
विकूया पण मग आई म्हणाली, तुम्ही बांगड्या नको पुस्तकं विका
म्हणून मग आम्ही पुस्तकं विकली”. शाळेत त्यांना कागद्याच्या
लगद्यापासून टोकरी बनवायला शिकवलं होतं. तोही प्रयोग त्यांनी घरी केला आणि
इतरांनाही शिकवला. या मुलांचे अनुभव त्यांच्या शब्दात ऐकून खूपच छान वाटलं. या
लहानग्यांच्या कृती आणि उत्साह बघून आम्हालाही उत्साही वाटलं.
कळमडु गट
कळमडुला गेल्यानंतर शाळेच्या मैदानात कोवळ्या उन्हात बसून आम्ही मुलांशी संवाद
साधला. या गावात क्रांतीज्योती सावित्री बाई फुले आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
असे दोन गट आहेत. दोन्ही गटांतील मुले सोबतच कृती करतात. आम्ही या गटांशी एकत्रच
गप्पा मारल्या. सकाळी मुलं अगदी उत्साहात होती. मुलं बोलकी होती आणि मोकळेपणाने
बोलत होती. सुरवातीला आम्ही गटाशी मेमरी गेमच्या माध्यमातून ओळख करून घेतली.
कुमार निर्माण म्हणजे काय याबद्दल आम्ही मुलांशी चर्चा केली. कुमार निर्माण, कुमार निर्माण मधील
उपक्रम, इतर गट करीत असलेले उपक्रम या बद्दल मुलांशी गप्पा
मारल्या. गावात मुलांना दिसणारे प्रश्न किंवा सुचणारे कृती कार्यक्रम या विषयी
मुलांशी चर्चा केली. मुलांनी अनेक कृती कायक्रम सुचवले. गावातील पाण्याची समस्या,
कचरा, झाडे नाहीत अशा अनेक समस्या आणि
त्यावरील उपायही मुलांनीच आम्हाला सुचवले. या मुद्द्यांवर चर्चा करून लवकरच कृती
करणार असल्याचे मुलांनी आम्हाला सांगितले. नियमित बैठका कशा घ्यायच्या, बैठकीत काय काय करायचे आणि बैठक झाल्यावर बैठकीचा वृतांत कसा लिहायचा हेही
मुलांनी चर्चेतून समजून घेतले. गटातील मुलींनी त्यांच्या स्नेहसंमेलनात गायलेले
स्वागत गीत आम्हाला म्हणून दाखवले. मुलांनीही एक विनोदी गीत म्हणून दाखवलं.
लवकरच पुन्हा भेटू असं सांगून आम्ही गटाचा निरोप घेतला.
एरंडोल गट
सकाळी साधारण ९.३० च्या सुमारास आम्ही ‘नेचर गटा’ला भेटलो.
तिथे गेल्यावर निमंत्रकाकडून आम्हाला कळले की आठवड्याभरापासून गटातील सर्व मुले
आमची खूप वाट पाहत होते. वेळ न दवडता आम्ही मुलांसोबत गप्पा करायला बसलो.
नेहमीप्रमाणे सुरवातीला आम्ही एका खेळाच्या मदतीने एकमेकांची ओळख करून घेतली.
मुलांसोबत निमंत्रकानेही या खेळाचा आनंद घेतला. त्यानंतर मुलांनी आत्तापर्यंत
केलेल्या कृतीकार्यक्रमांचं शेअरिंग केलं. त्यांनी केलेली सगळी कामं मुलं अगदी
उत्साहाने आणि आनंदाने आम्हाला सांगत होती. त्यात मुलांनी डोअर स्टेप स्कूल या
गटाकडून प्रेरणा घेऊन स्वतःच्या गटासाठी एक ‘कुमार निर्माण
बॉक्स’ बनवला असून त्यात प्रश्न टाकले आहेत. लवकरच मुले त्या
प्रश्नांवर बैठकीत चर्चा करणार आहेत. याआधी मुलांनी एरंडोलपासून जवळच सहल काढली
होती. गटातील मेहुलने अंगणात आलेल्या चिमणीला तांदळाचे दाणे खायला दिले व त्या
चिमणीविषयी खूप छान निरीक्षण लिहिले. गटातील ओमचा हात मोडला होता आणि त्यामुळे तो
बैठकीला येत नव्हता, म्हणून त्याला भेटायला गटातील सर्व मुले ओमच्या घरी भेटायला गेली, त्याच्याशी खेळली. हे सांगतांना ओमला खूप आनंद होत होता. यासोबतच गटातील
काही मुलांनी स्वतः फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली आणि इतरानाही समजावले. हे करताना
सर्वच मुलांना खूप वेगवेगळे अनुभव आले होते.
गटातील तीन मुले दररोज रोजनिशी लिहितात. त्यात दिवसभरात काय
घडलं, त्याविषयी मला काय
वाटलं अशा बऱ्याच गोष्टी ते लिहितात. यासोबतच मुलांनी आपापल्या घरचा मासिक खर्च
काढून त्त्याला आवश्यक आणि अनावश्यक यात विभागून शक्य तेवढा अनावश्यक खर्च कमी
करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. गटासोबत गप्पा करताना ‘एखादी
व्यक्ती गरीब आहे हे कसे ठरवायचे’ यावर खूप चर्चा झाली. यावर
मुलांनी खूप विचार करून मुद्दे मांडले. यावरून गटाची संवेदनशीलता दिसून आली. शेवटी
एक छानसा खेळ घेऊन पुन्हा लवकर भेटण्याचे ठरवून आम्ही गटाची रजा घेतली.
सोनाळे
सोनाळे गावातील कुमार निर्माण च्या गटाला भेट द्यायला आम्ही सकाळी पोहचलो
तेव्हा नुकतीच मुले जमू लागली होती म्हणून आम्ही गटाने लावलेला भाजीपाला बघत
सुरवात केली. मुलांनी शाळेमागच्या परिसरात वांगे, गिलके, भेंडी असा
भाजीपाला लावलाय आणि त्याची वाढ ते सेंद्रिय पद्धतीने करीत आहेत. मुले खूप
उत्साहाने आम्हाला प्रत्येक भाजीपाल्याच्या झाडाविषयी सांगत होती. मुलांनी
त्यासाठी खूप कष्ट घेतलेत हे ती बाग पाहिल्यावर दिसून आलं.
मुले जमल्यावर आम्ही वर्गात बसून मुलांसोबत गप्पा मारल्या. मुलांशी ओळख करून
घेतली आणि मग मुलांनी त्यांनी केलेल्या कामाविषयी आम्हाला सविस्तर सांगितलं.
भाजीपाला लावताना काम कसे वाटून घेतले, भाजीपाला शिक्षकांना व बाजारात कसा विकला,
एक भाजी आल्यानंतर मग ती विकून तिच्या पैशातून दुसऱ्या भाजीसाठीचे
बियाणे आणले, नंतर आणखी भाजीपाला विकून त्यांनी त्या पैशातून
शाळेतील त्यांच्याच गरजू मित्र-मैत्रिणींना पेन, पेन्सिल इ.
वस्तू भेट म्हणून दिल्या, इ. तसेच
मुलांनी होळी मध्ये गावातील कचरा जमा करून जाळला आणि गाव स्वच्छ ठेवण्याचा संदेश
दिला. हे सगळं करताना काय अनुभव आले, गावातील इतर लोक काय
म्हणाले, पालक काय म्हणाले हे मुलांनी सांगितलं. या सोबतच
पुढे काय कृती करणार याविषयीही चर्चा झाली.
आमची भेट झाल्यानंतर गटातील मुले लगेच
अजिंठा येथील लेणी बघायला जाणार होते म्हणून मग आम्ही भेट आवरती घेतली. मुलांसोबत
एक खेळ खेळून आम्ही निघालो.
वर्धिष्णू गट, जळगाव.
वर्धिष्णू गटाला भेटायला आम्ही संध्याकाळी सेंटर वर गेलो तिथे गटातील मुले
लगेच जमा झाली. या गटासोबत पाहिलेही एकदा धावती भेट झाल्याने थोडी ओळख होतीच, तरीही पुन्हा एकदा
मुलांशी ओळख करून घेतली.
या मुलांशी गप्पा मारत त्यांनी केलेल्या कृतीकार्यक्रमांविषयी माहिती घेतली.
ही मुलं औरंगाबादला फिरायला गेली होती तेव्हा ‘बीबी का मकबरा’ परिसरात
त्यांना काही लोक कचरा करताना दिसले. या मुलांनी तो कचरा उचलला. तेथील सुरक्षा
रक्षकांना वाटलं की या मुलांनीच हा कचरा केला म्हणून ते या मुलांना रागवायला लागले.
पण अद्वैत दादाने त्यांना झाला प्रकार सांगितल्यावर ते त्या कचरा करणाऱ्यांना
ओरडले. मुलांनी औरंगाबादला असताना स्वतः खिचडी बनवली आणि गटातल्या सगळ्यांनी
खाल्ली. गटातील मुलं अतिशय उत्साही आहेत. ही मुलं स्वतः काहिही कचरा करत नाहीत.
सेंटरवर प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळावा हे मुलांनीच ठरवलेलं असल्याने हा गुण
आपोआपच मुलांमध्ये रुजला आहे. गटातील मुलांच्या सोबतच तेथील इतर लहान मुलेही तेथे
होती त्यांच्या सोबतही आम्ही धमाल गप्पा मारल्या आणि मज्जा केली..
अद्वैत दादा कामानिमित्त मुंबईला गेला
असल्याने त्याच्याशी भेट होवू शकली नाही. सेंटरवर गटासोबत शैलेश दादा आणि अक्षय
दादा होते. त्यांच्याशी गप्पा मारून आम्ही तिथून निघालो.
बुलढाणा
बुलढाणा येथील गटाला भेटायला म्हणून आम्ही छत्रछाया फौंडेशनच्या सेंटर वर गेलो
तेव्हा गटातील मुले जेवण करण्यासाठी बाहेर गेलेली होती. त्यांच्याच खोली मध्ये
बसून आम्ही त्यांच्याशी गप्पा मारल्या. ह्या गटाची छान गोष्ट म्हणजे ही सगळी मुले
एकाच घरात एक कुटुंब म्हणून खूप प्रेमाने राहतात. मोठा ऋषी लहानांची छान काळजी
घेतो.
आम्ही या गटाला भेटायला गेलो त्या दिवशी शिव जयंती होती. गटातील मुलांना
अद्वैत आणि प्रणाली यांनी मागे गोविंद पानसरे यांचं ‘शिवाजी कोण होता?’
हे पुस्तक भेट म्हणून दिलं होतं. मग आम्ही या पुस्तकाविषयी चर्चा
घेतली. साधारण वर्षभरापूर्वी वाचलेल्या पुस्तकातील आशय अजूनही मुलांना व्यवस्थित
आठवत होता. आणि मुलांनी आम्हाला सांगितले की आज साजरा होत असलेल्या शिव जयंतीची
पद्धत आम्हाला पटत नाहीये. हे ऐकून मुलांची विचार करण्याची वृत्ती प्रकर्षाने
जाणवली. गटातील मुलांनी त्यांच्या राहत्या घरात मध्ये मच्छरांचा त्रास होत होता
म्हणून पहिले घर आणि आजूबाजूचा परिसर साफ केला. पण तरीही हा त्रास कमी झाला नाही
म्हणून मग त्यांनी नवीन युक्ती शोधून काढली. लिंबाचा पाला जाळून त्याचा धूर करून
त्यांनी मच्छर पळवले. त्या विषयी आणि अजूनही बरीच चर्चा या मुलांसोबत झाली.
कुमार निर्माण म्हणजे काय आणि त्यात आपण
कोणत्या कृती करू शकतो याबद्दल मुलांनी चर्चेतून समजून घेतले. आपल्या आसपासच्या
परिसरात अजून काय काय चांगलं आपल्याला करता येईल या विषयी मुलांनी बरेच मुद्दे
मांडले. त्यांच्या घरासमोर रस्त्यावरील आणि इतरत्र जाणवणाऱ्या अनेक समस्या मुलांनी
मांडल्या. त्यावर लवकरच ही मुलं उपाय शोधून कृती करणार आहेत. या मुलांनी अभ्यासात
एकमेकांना मदत करायची ठरवली आहे. या मुलांना आम्ही आणि मुलांनी आम्हाला अनेक कोडी
घातली आणि विनोदही सांगितले. एकूणच मुलांशी गप्पा मारायला खूप मज्जा आली.
सेवाग्राम
सेवाग्राम मधील नयी तालीम परिसरातील हा गट आहे. या गटाला
भेटायला आम्ही गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमामध्ये मध्ये गेलो. सेवाग्राम मध्ये
आल्यावर आम्हाला खूप प्रसन्न वाटलं. मुले जमेपर्यंत आम्ही नयी तालीमचे अध्यक्ष
बरंठ काकांसोबत गप्पा मारल्या. नयी तालीम आणि सेवाग्राम मधील सगळ्याच
कार्यकर्त्यांना कुमार निर्माण बद्दल खूपच उत्सुकता होती.
मुले जमल्यावर आम्ही रिंगण करून मुलांशी गप्पा मारायला बसलो. या मुलांमध्ये
घट्ट मैत्री आहे. गटातील मुले नियमित एकत्र येतात. या गटासोबत चर्चा करताना गटातील
मुलांसोबतच इतरही कार्यकते उपस्थित होते. आनंद निकेतनच्या मुख्याध्यापिका सुषमा
ताई देखील तेथे उपस्थित होत्या. या सगळ्यांसोबत आम्ही सेवाग्रामच्या परिसरात बसून
गप्पा मारल्या. गटातील मुलांनी कुमार निर्माणची संकल्पना पुन्हा एकदा चर्चेतून
समजून घेतली. इतर गटांनी केलेले कृती कार्यक्रम मुलांना सांगितले. या मुलांनी
परिसरातील अनेक समस्या आणि त्यावर आपल्याला काय करता येईल या विषयी अनेक कल्पक
उपाय सुचवले. गटातील मुले ही वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्याने त्यांचे वेगवेगळे
असे अनेक प्रश्न होते त्यावर एकत्रितपने कृती करायला मुले खूपच उत्सुक होती. यासाठी
त्यांना सहकार्य करण्याची तयारी सुषमा ताईंनी दाखवली आणि अनेक सूचनाही त्यांनी
केल्या. गटातील मुलांनी आम्हाला अनेक प्रश्न विचारले. या मुलांसोबत आम्ही श्रमदान
केले आणि श्रमदान करतानी गाणे देखील म्हटली. या भेटी दरम्यान आम्हालाही खूप काही
शिकायला मिळाले.
मन्याळी
सकाळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळेपर्यंत आम्ही गाडीवरून मन्याळीला पोहचलो.
मुलांची प्रार्थनेची तयारी सुरु होती. मुलांनी प्रार्थना, गोष्ट, सुविचार इत्यादी सगळं म्हटलं. शैलेशने मुलांना एक छानशी गोष्ट तेथे
सांगितली.
मुलांचा परिपाठ संपल्यानंतर आम्ही गटातील मुलांशी गप्पा मारण्यासाठी एका
वर्गात बसलो. प्रणालीने गटातील मुलांसोबत एक गाणे घेतले. नंतर आम्ही गटाच्या
मुलांसोबत गप्पा मारल्या. इथे दोन गट आहेत. एक गट गावातील आहे आणि दुसरा गट गावा
जवळील तांड्यावरून येणाऱ्या मुलांचा आहे. गटात मुले आणि मुली दोन्ही आहेत. मुलांनी
त्यांनी केलेल्या कृतींविषयी आम्हाला सांगितलं. मुलांनी केलेल्या कृती आणि त्यांना
आलेले अनुभव ऐकून खूपच छान वाटलं. मुलांनी गावातील दुकानांसमोर कचरा पेट्या
ठेवल्या आहेत. त्या मध्येच कचरा टाकावा असे मुलांनी गावात सगळ्यांना सांगितलंय.
मुलांनी उन्हाळ्यात पक्षांसाठी पाणी ठेवलंय. गटातील एका मुलीच्या घराकडे जाताना
रस्त्यात असलेला खड्डा या मुलांनी बुजवला. असे इतरही अनेक उपक्रम मुलांनी केलेत.
ही मुले नुकतीच गावाजवळील यात्रेला जाऊन आलीत तिथे त्यांना आलेले अनुभव आणि
त्यांनी केलेली मज्जा गटातील मुलांनी आम्हाला सांगितली.
गटातील मुले नियमित बैठका घेतात आणि काय कृती करायची यावर चर्चा करतात.
बैठकीचा वृत्तांतही मुलांनी सविस्तर लिहून ठेवलंय. या मुलांसोबत एक मस्त खेळ आम्ही
खेळलो आणि गटाची रजा घेतली.
एकूण आमची संपूर्ण ट्रीप खूप मस्त झाली. प्रत्येक गटभेटीतून आम्हाला काही ना
काही शिकायला मिळाले. मुलांचा उत्साह आणि प्रश्न विचारणं कधीकधी थक्क करणारं होतं.
मुलांसोबत खूप दंगा करून पुन्हा नवीन गटांना भेटी देण्याचा उत्साह या मुलांकडून
घेऊन आम्ही परतीला निघालो.
थोडक्यात पण महत्वाचे
-
‘भरारी’ हे आपणा सर्वांचे असून तुम्हीही त्यात सहभाग घेऊ
शकतात.
-
भरारी अंकातील विविध गोष्टी उदा. चित्र चर्चा, गोष्ट,
कुमार गीत, बोलकी पुस्तके ई. यावर गटात काय चर्चा झाली व त्यावरून पुढे काय कृती
जन्माला आली याची गोष्ट आम्हाला नक्की पाठवा.
-
मुलांकडून वा निमंत्रकांकडून आलेले साहित्य उदा. चित्र,
लेख, गोष्ट, कविता, अनुभव, फोटो ई. जे भरारी मध्ये समाविष्ट केले जाऊ शकेल ते
देखील आपल्या निमंत्रकाच्या मदतीने आम्हाला नक्की पाठवा
|
Subscribe to:
Posts (Atom)