Thursday 31 March 2016

मुखपृष्ठ


या अंकात



_________________________________________________________________________________________________
संपादकीय मंडळ








नरेंद्र खोत

प्रफुल्ल शशिकांत

प्रणाली सिसोदिया

शैलेश जाधव

इमेल : contact.knirman@gmail.com

वेबसाईट : www.mkf.org.in/mso

फेसबुक : www.facebook.com/socialolympiad
संपर्क: ९४२०६५०४८४, ९५०३०६०६९८


भेट वृत्तांत

कोकणातील कुमार निर्माणच्या गटांना भेटायला म्हणून मी पुण्यावरून रात्री ८:३० ला एस. टी. बसने निघालो. वळणा-वळणाच्या रस्त्यावरून रात्रीची गार हवा खात मस्त प्रवास सुरु झाला. पण लवकरच थंडी वाजू लागली आणि मग वारा कोणत्या फटीतून आत येतोय हे शोधता-शोधता तसाच अर्धवट झोपेत शिरगावला पोहचलो. डॉक्टर काकांकडे पहाटेच पोहोचल्यामुळे पहिले अंथरून टाकून छानपैकी झोप काढली. झोप झाल्यावर काका-काकुंशी छान गप्पा मारत बसलो. गप्पा मारून जेवण करून मग आम्ही गटाला भेटायला मुलांच्या वसतिगृहात गेलो.


शिरगाव गट

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, देवगड तालुक्यातील, शिरगाव येथील हा गट. शिरगावला परिसरातील बऱ्यापैकी मोठे महाविद्यालय आहे. त्यामुळे बऱ्याच लांबून शिकायला म्हणून विद्यार्थी येथे येतात.


शिरगावला बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृह आहे. या वसतिगृहात साधारण २०-२५ विद्यार्थी राहतात. हे सगळेच विद्यार्थी कुमार निर्माणच्या गटात आहेत. यात सहावी ते बारावीचे विद्यार्थी आहेत. त्यामुळे यांचा वेगळा असा एक गट न बनवता सगळ्याच विद्यर्थ्यांचा मिळून एक गट आहे.

इतर वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे या मुलांचीही आपापसात घट्ट मैत्री आहे. कुमार निर्माणचे गट निमंत्रक डॉ. चव्हान काका आणि निवृत्त मुख्याद्यापक कदम सर या मुलांशी गपा मारायला म्हणून नियमित वसतिगृहाला भेट देत असतात. मुलांसाठी नवीन नवीन उपक्रमही राबवत असतात. मुलांसाठी निबंध स्पर्धा, कवितावाचन, नाटक असे अनेक उपक्रम चालतात.

मुलांमध्ये नवीन जिद्द, उत्साह निर्माण करण्याचे काम हे करतात. मुलांनी क्रिकेटच्या स्पर्धा जिंकल्यात. निबंध स्पर्धा, कविता वाचन आणि अभ्यासातही ही मुलं आता शाळेमध्ये चमकू लागली आहेत. गटातील मुलांपैकी एका मुलाचा चित्रकला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला. एका मुलाचे लेख बऱ्याचवेळेस स्थानिक वर्तमान पत्रातून छापून आलेत. याशिवाय निबंध स्पर्धा आणि नाटकांमधुनही ही मुलं आपला ठसा उमटवतात.

गटातील मुलांनी गावकऱ्यांसमोर कविता वाचन केले. मुलांच्या नाटकांमधून सामजिक विषय जसे की पाणी, व्यसन, कचरा ई. हाताळलेले असतात.  गावातील लोकांसमोर ही नाटकं साजरी करून गावकऱ्यांमध्ये या सामाजिक प्रश्नांबाबत बाबत जागरूकता पसरवण्याचे काम ही मुलं करतात. मुलांनी त्यांनी केलेलं एक नाटकं सदर केलं आणि काही कवितांचं वाचनही केलं. या मुलांकडून त्यांच्या वसतिगृहातील गमती जमती ऐकून आणि मुलांसोबत खेळून मी निघालो.

आम्ही बालदूत गट, जावडे, ता. 
लांजा या तालुक्याच्या गावापासून १५ मिनिटांच्या अंतरावर जावडे हे गाव आहे. कोकणातील बहुतांश गावांसारखेच हे गाव वाड्यांमध्ये विखुरलेले आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या गावातील शाळेत कुमार निर्माणचा गट आहे. ही शाळा पाचवीपर्यंत आहे. चौथी आणि पाचवीचे एकूण सगळेच मुलं-मुली कुमार निर्माणच्या गटात आहेत. गटातील मुले जवळपासच्या वाड्यांवरून शाळेत येतात.

गटातील मुले, मी आणि त्यांच्या शिक्षिका आम्ही एका वर्गात गप्पा मारायला बसलो. मुले खूपच उत्सुक होती. एकमेकांची ओळख खेळाद्वारे करून घेवून आम्ही गप्पा मारायला सुरवात केली. मुलांनी त्यांचे गटात कृती करतानाचे अनुभव सांगितले.
गटातील सगळे पक्षी छायाचित्र प्रदर्शन बघायला लांजा येथे गेले होते. तिथे मुलांनी नव-नवीन पक्षांची छयाचित्रे बघितली आणि त्यांची माहिती घेतली. तेथील फोटोंमधील बरेच पक्षी मुलांसाठी नवीन होते. या गटाची एक सहल त्यांच्या निमंत्रकांनी स्मशानात आयोजित केली होती. मुलांसाठी हा खरच एक भन्नाट अनुभव होता. मुलांची भीती कमी होण्यासाठी हा अनुभव कामी आला. या भेटीत कोण कसं घाबरलं होतं, आणि काय गम्मत आली होती हे ही या मुलांनी सांगितलं आणि त्याबरोबरच थोडं विज्ञानही समजून घेतलं. या सोबतच मुलं वनभोजनासाठी गेली होती. महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमात जंगलात मुलांनीच स्वतः स्वयंपाक बनवला होता.

मुलांनी शाळेत सरस्वती पूजनाचा कार्यक्रमही आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन मुलांकडेच होते. मुलांसाठी हा पहिलाच अनुभव असल्याने मुलं चांगलीच वैतागली होती. पण शेवटी मुलांनी छानपैकी आयोजन केलं. संध्याकाळी मुलांनी देवीच्या मंदिरासमोर दंगा केला आणि खेळ खेळले.

गटातील मुलांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये काही प्रयोग मांडले होते. मुलांनी ते प्रयोग सादर करून दाखवले.

या भेटीत मुलांनी मला आणि मी मुलांना अनेक कोडी विचारली, विनोद सांगितले आणि खेळ खेळलो.

गटातील मुलांना भेटून परत लांजाला आल्यावर गट निमंत्रक सुहास यांच्याशी भेट झाली. ही भेट धावतीच झाली कारण पुढे मला पनवेलला जाणारी रेल्वे पकडायची होती. कोकण रेल्वेतून प्रवास करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यामुळे कोकणातील निसर्ग सौंदर्याची मजा घेत हा प्रवास मस्त झाला. रात्री पनवेलला मुक्काम करून सकाळी मी अलिबागमधील कुरूळ येथे गेलो.

सृजन गट, कुरूळ, अलिबाग
अलिबाग पासून जवळच कुरूळ हे गाव आहे. खाडीच्या किनाऱ्यावर हे गाव वसलेलं आहे. या गावात एक छोटसं तळं देखील आहे. गावातील हायस्कूल या खाडीच्या किनाऱ्यावरच आहे. शाळेसमोरच ग्रामपंचायतचं मैदान आहे. शाळा आणि परिसर  सुंदर आहे.

गटासोबत गप्पा मारायला आणि चर्चा करण्यासाठी आम्ही मैदानातील एका झाडाखाली बसलो. गटात पाचवी ते आठवीची मुलं-मुली आहेत.

गटासोबत खेळातून ओळख करून घेतल्यानंतर आम्ही चर्चेला सुरवात केली. मुलांनी त्यांचे आजपर्यंतचे कुमार निर्माण संदर्भातील अनुभव सांगितले. या गटाने गावातील व परिसरातील कचऱ्याचा प्रश्न लावून धरून या प्रश्नाचा पाठपुरावा ते मगील दोन वर्षांपासून करीत आहेत. या शाळेसमोरच एक मोठ्ठा खड्डा आहे आणि परिसरातील लोक त्या खड्ड्यात कचरा टाकतात. त्यामुळे दुर्गंधी  पसरते आणि शाळेतील मुलांना आणि परिसरातील लोकांना त्याचा त्रास होतो. त्यासाठी ही मुलं जनजागृती करत आहेत. गावातील तळ्यात देखील लोक कचरा टाकतात तेथेही मुलं जनजागृती करतायेत. दोन्हीकडील नागरिकांना या मुलांनी कापडी पिशव्या बनवून वाटल्या आणि बाजारात किंवा खरेदीला जाताना या पिशव्या वापरा असे सांगितले.

यासंबंधी जागृती करण्यासाठी या मुलांनी त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनात एक नाटिका सादर केली होती. विशेष म्हणजे ही नाटिका कुमार निर्माणच्याच गटातील एका मुलीनी लिहिली होती. गटातील मुलांनी हीच नाटिका आमच्या चर्चे दरम्यान सादर केली.

दिवाळीत या मुलांनी फक्त किल्ले न बांधता त्या किल्ल्यांविषयी माहिती मिळवून ती सगळ्यांना सांगितली. अशा इतरही अनेक विषयांवर आम्ही या भेटीत चर्चा केली.

मुलांशी चर्चा झाल्या नंतर आम्ही खेळ खेळलो. गटातील आणि शाळेतील इतर मुलेही दुपारून अलिबागला सर्कस बघण्यासाठी जाणार होती म्हणून मग आम्ही बैठक आटोपती घेतली.

गट निमंत्रक सुनील पाटील सर काही कामानिमित्त भेटू शकले नाही पण शाळेच्या मुखाध्यापिका आणि इतर शिक्षकांशी चर्चा करून मी तेथून निघालो.
रात्री अलिबागला नयनरम्य  सूर्यास्त बघून पुढील दिवशी समुद्रमार्गे मी मुंबईला आलो. त्या दिवशी मुंबईला मुक्काम करून मग दुसऱ्या दिवशी वाडा येथील गटाला भेटण्यासाठी म्हणून वाडा येथे गेलो.

बालीवली, वाडा गट
वाडा येथील गटाला भेटायला त्यांच्या गावातील शाळेत पोहचलो. इथे कुमार निर्माणचे दोन गट आहेत. तेथे एका मोकळ्या हॉल मध्ये आम्ही बसलो. मुलांशी आणि इतर शिक्षकांशी ओळख करून घेऊन मग आमची चर्चा पुढे छानपैकी रंगली.

मुलांनी त्यांनी केलेल्या कृतीकार्यक्रमांचे शेअरिंग केले. या मुलांनी आतापर्यंत चार ते पाच वेळेस गावातील कचरा उचलला. कचरा उचलल्यानंतर ही मुले हा कचरा जाळून टाकत. कचऱ्यात असलेले प्लास्टिकही त्यात जाळले जात आणि पर्यायाने पुन्हा प्रदूषण होई.  यावर काय करता येयील याबद्दल मुलांचा विचार चालू होता. गटातील मुले नेमकी तेव्हाच वाड्यातील QUEST या संस्थेत सहलीला गेली होती. तिथे या मुलांनी बघितलं की प्लास्टिकसाठी वेगळ्या अशा कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत. आणि त्या भरल्यानंतर त्यातील प्लास्टिक ते भंगारवाल्यांना देतात. हीच कल्पना शाळेत राबवायची हे मुलांनी ठरवले आणि अशा दोन वेगळ्या कचरा कुंड्या त्यांनी शाळेत ठेवल्या आहेत. गटातील मुलांसोबत शाळेतील इतरही मुले वेगळ्या कुंडीत प्लास्टिकचा कचरा टाकतात. यातील प्लास्टिक ते भंगार वाल्यांना विकणार आहेत.

अशीच गटाची एक सहल जवळच्या धबधब्यावर गेली होती तेथे या मुलांनी खूप मजा-मस्ती केली. तिथे या मुलांना शेती विषयात पदवी करणारे काही मोठी मुले भेटली. त्यांच्याशी चर्चा केल्यावर गटाने शाळेजवळ मेथी लावून मातीची सुपीकता तपासून बघायची असे ठरवले. त्यानुसार त्यांनी शाळेच्या आवारात पाच वाफे तयार करून त्यात मेथी लावली परंतु त्यातील फक्त ३ वाफ्यात मेथी उगवली आणि उरलेल्या २ वाफ्यात नाही उगवली. मुलांनी निरीक्षण केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाकीच्या २ वाफ्यांमध्ये रेतीचं प्रमाण जास्त होतं म्हणून त्यात मेथी नाही उगवली. आणि नंतर आलेली मेथी मुलांनी आपापसांत वाटून घेतली.

जवळच एका डोंगरावर महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते. यात्रा संपल्यानंतर तिथे प्रचंड कचरा पडलेला असतो. गटातील मुलांनी निमंत्रकाच्या मदतीने तेथे जाऊन साफ-सफाई केली.

गटातील चर्चेमधून आणि मुलांनी विचारलेल्या प्रश्नांमधून मुलांनी कुमार निर्माणविषयी अधिक समजून घेतले. ‘भरारी’विषयी गप्पा मारल्या आणि बाकी धमाल केली. मुलांसोबत रणरणत्या उन्हात एक खेळही खेळलो.

एकूणच बाकी ठिकाणांपेक्षा पेक्षा वाड्याची भेट थोडी छोटी झाली पण धमाल मात्र सगळीकडेच सारखीच आली. खुप काही शिकायलाही मिळालं.



जगातील सर्वात लहान मुख्याध्यापकाची गोष्ट!

पश्चिम बंगाल मधील एका १६ वर्षाच्या मुलाला बीबीसीने (जगातील सर्वात मोठी माहिती प्रसारण संस्था) २००९ साली ‘जगातील सर्वात लहान मुख्याध्यापक’ म्हणून घोषित केले. या मुलाचे नाव आहे बाबर अली! तर ही गोष्ट आहे पश्चिम बंगाल मधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील भाबटा नावाच्या खेडेगावातील बाबर अलीची. बाबरचा जन्म १८ मार्च १९९३ चा.

बाबरचं कुटुंब हे भाबटा गावातील काही निवडक कुटुंबांपैकी एक होतं जे आपल्या मुलांच्या शिक्षणाची सोय करू शकत होतं. बाबरचे वडील जूटचा व्यवसाय करीत. त्यांच्या गावात शाळा नव्हती म्हणून बाबरला त्याच्या वडिलांनी १०किमी लांबच्या शाळेत टाकले. बाबरला शिक्षणाची खूप आवड होती.

शाळेत जाण्यासाठी बाबरला रोज रिक्षाने १० किमी व पुढे चालत २ किमी असा प्रवास करावा लागायचा. नियमाप्रमाणे जरी  सर्वांना शिक्षण मोफत मिळत असलं तरी गावापासून शाळेत जाईपर्यंतचा खर्च गावातील इतर  मुलामुलींना परवडत नव्हता. परंतु बाबरला शाळेत जाताना पाहून त्यांना त्याचे खूप कौतुक वाटायचे. “बाबर शाळेत जाऊन काय बरे करत असेल?”, असे ते नेहमीच एकमेकांना उत्सुकतेने विचारायचे. बाबर शाळेतून आला की ही मुले त्याच्या भोवती जमा होत आणि विचारत की  शाळेत तू नेमकं काय शिकतोस. मग बाबर त्यांना समोर बसवून शाळेतील गोष्टी सांगायचा. आणि हे सांगताना ती सर्व मुलं एक खेळ खेळायची; ज्यात ९ वर्षांचा ५वीत शिकणारा छोटासा बाबर शिक्षक होत असे आणि इतर मुले त्याचे विद्यार्थी! आणि असा हा मजेशीर खेळ बाबरच्या अंगणात ही मुले रोज संध्याकाळी खेळू लागली. परंतु यातील काही मुलं नियमित बाबर कडे येऊ लागली आणि बाबरही खेळातून तो जे काही शाळेत शिकत असे ते या मुलांना शिकवू लागला. हळूहळू मुलांची संख्या वाढत गेली आणि बाबरनेही त्या खेळाला गांभीर्याने घ्यायला सुरवात केली. हे सगळं करताना बाबरचं वय होतं अवघं ९ वर्ष!

सुरवातीला बाबरच्या या शाळेत ८ मुले-मुली येत असत ज्यात बाबरची एक बहिणदेखील होती. बाबर शाळेतून घरी येयीपर्यंत ही मुले त्यांची कामं संपवून तयार असायची. घरी आलं की बाबर ला हात पाय धुवायलाही ही मुले वेळ मिळू देत नसत. बाबर फक्त शाळेचा गणवेश बदलून लगेच यांना शिकवायला बसायचा.


बाबर म्हणतो, “मी विचार केला की ही मुले माझ्यासारखी शाळेत जाऊन कधीच नाही शिकू शकणार, मग मीच जर त्यांना रोज शिकवले तर?” आणि अवघ्या ३ वर्षांत अंगणातल्या या खेळाचे रुपांतर बाबरच्या अथक प्रयत्नानंतर एका छानश्या शाळेत झाले.

बघता बघता छोटया बाबरच्या शाळेची गोष्ट पंचक्रोशीत पसरू लागली आणि या शाळेतील मुलांची संख्या वाढू लागली. भाबटा गावात अशी बरीच कुटुंबे होती ज्यांना मुलांना बाहेरगावी शिकायला पाठवणे शक्य नव्हते. हे सगळं सुरु असताना एका बाजूला बाबरचं शिक्षणही नेटाने सुरु होतं. त्याच्या शाळेतही तो हुशार अन मेहनती म्हणून ओळखला जात असे. हे सर्व बघून बाबरच्या वडिलांना मात्र बाबरची काळजी वाटू लागली. त्यांना असे वाटत असे की बाबरच्या या खटाटोपामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. कारण त्यांना बाबरला एक मोठा पोलीस अधिकारी बनलेला बघायचं होतं. म्हणून काही काळानंतर बाबरच्या वडिलांनी त्याला ती शाळा बंद करायला सांगितले. परंतु तोपर्यंत गावातील गरजू मुलांना शिकवणे ही बाबरची आवड बनली होती आणि त्या मुलांचीही ती गरज होती. शेवटी त्याने आपले वडील दुपारी घरी नसतात हे बघून दुपारचे वर्ग सुरु केले. परंतु एक दिवस वडिलांना हे कळलं. मग ते बाबरला म्हणाले की या सगळ्याचा तुझ्या अभ्यासावर काहीही परिणाम व्हायला नको आणि त्याने वडिलांना तसे वचन दिले.

वडिलांना वचन दिल्याप्रमाणे बाबर पहाटे ४ वाजता उठून आधी स्वतःचा अभ्यास करत असे, नंतर शाळा आणि संध्याकाळी घरी आल्यावर स्वतः शिक्षक बनून गावातील मुलांना शिकवत असे. मुलांना शिकविण्यासोबत बाबरचा अभ्यासदेखील चांगला चालू आहे हे पाहून बाबरचे वडील निर्धास्त झाले आणि मग अगदी मोकळेपणाने बाबरच्या अंगणात मुलांचे शिकणे सुरु राहिले.


या सगळ्याचा खर्च बाबर त्याच्या खाऊच्या पैशातून करत असे तसेच त्याचे वडीलही त्याला शक्य तशी मदत करत. मुलांना वह्या-पुस्तके मिळावी यासाठी बाबरने त्याच्या शाळेत येणाऱ्या मुलांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना तांदूळ मागून ते विकले आणि मुलांसाठी वह्या-पुस्तके घेतली. दरम्यान आजूबाजूच्या गावांत बाबरच्या अनोख्या शाळेची माहिती पसरली आणि बाबरच्या कामात इतर लोकं जोडल्या जाऊ लागली. त्यातल्या काहींनीत्याला आर्थिक मदत करायला सुरवात केली. तर इतर लोक त्याच्या शाळेत शिकवू लागली. बाबरच्या शिक्षकांनाही बाबरचे हे काम खूप आवडत असे, त्यामुळे तेही बाबरला मदत करत.

बघता बघता छोटया बाबरने खेळातून सुरु केलेल्या शाळेचा वटवृक्ष झाला आणि त्याच्याकडे येणाऱ्या मुलांची संख्या प्रचंड वाढली. बाबरही ७ वीची परीक्षा पास होऊन ८ व्या इयत्तेत दाखल झाला. सर्व ‘गरीब मुला-मुलींसाठी शिक्षण’ हेच बाबरचे ध्येय बनले. त्याने शेवटी या शाळेला औपचारिक स्वरूप देण्याचे ठरवले आणि आपल्या शिक्षकांच्या मदतीने बाबरने खूप संकटाना तोंड देऊन शाळेची नोंदणी करून घेतली. अशाप्रकारे इयत्ता ८ वीत शिकणारा १३ वर्षांचा बाबर त्या शाळेचा मुख्याधापक झाला! शाळेच्या उद्घाटनासाठी बाबरने आपल्या आईच्या साडीने परिसर सजवून त्याच्या शिक्षकांच्या हस्ते शाळेचे उद्घाटन केले आणि नाव ठेवले – ‘आनंद शिक्षा निकेतन!’

हा सर्व खटाटोप करताना बाबरला खूप अडचणींना तोंड द्यावे लागले. शाळेत येणाऱ्या मुलांची संख्या वाढली होती मात्र अजूनही सर्व वर्ग त्याच्या अंगणातच भरत होते. पावसाळ्यात शाळेतील विद्यार्थ्यांना याचा खूप त्रास होत असे, शिकवणे अवघड होऊन बसे. यासाठी स्वतःचा अभ्यास सांभाळून बाबर तालुक्यातील, जिल्ह्यातील सरकारी कार्यालयात मदतीसाठी चकरा मारत असे. शाळेच्या आर्थिक मदतीसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना जाऊन भेटत असे, त्यांच्याशी बोलत असे. परंतु बऱ्याच लोकांना बाबरच्या कामाची असूया वाटू लागली, त्यांनी अनेक प्रकारे त्याला त्रास दिला परंतु तरीही बाबरने शिकवण्याचे काम नेटाने चालूच ठेवले.

दरम्यान बाबर १० वीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला व त्याने ११ वीला प्रवेश मिळवला पण तरीही शिकवण्याचे काम मात्र सुरूच ठेवले. आता त्याचा दिनक्रम काहीसा असा झाला होता – ‘सकाळी उठून आधी स्वतःचा अभ्यास करणे, कॉलेजला जाणे मग संध्याकाळी शाळेत शिकवणे आणि रात्री शाळेसंदर्भातली कार्यालयीन कामे करणे.’ अशा प्रकारे मुख्याधापक बाबर खूप मन लाऊन, झोकून देऊन काम करू लागला.
आज बाबर इंग्रजी विषयाचा पदवीधर असून उच्चशिक्षण घेत आहे. सगळ्यात सुरवातीला येणाऱ्या ८ मुलांचेही आता महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे. आता ही ८ मुले-मुलीही या शाळेला जोडल्या गेली आणि आता तेही आनंद शिक्षा निकेतनमध्ये शिक्षक म्हणून काम करतात. ८ मुलांना घेऊन सुरु केलेल्याया शाळेत आज ३००च्या वर मुले-मुली शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. आज ‘आनंद शिक्षा निकेतन’ ही नोंदणीकृत शाळा आहे. इथे आठवी पर्यंत चे वर्ग चालतात. त्यात मुलांना शालेय साहित्यासोबतच एक वेळचे जेवणही दिले जाते. बाबरला मिळालेल्या आर्थिक मदतीतून त्याने शाळेसाठी इमारत बांधायला सुरवात केली आहे, ज्यात ५०० मुलांचा प्रवेश झाला आहे.

शाळेच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाल्याबरोबर बाबरच्या या अनोख्या कामाची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि प्रसारमाध्यमांनी बाबरच्या कामाची दखल घेतली. बाबर राज्यात नाही, संपूर्ण देशात नाही तर जगभर प्रसिध्द झाला.

कर्नाटक सरकारने इंग्रजी पुस्तकाच्या अभ्यासक्रमात ‘बाबरचे चरित्र’ समाविष्ट केले आहे. बीबीसीने बाबरला १६ वर्षांचा असताना ‘जगातील सर्वात लहान मुख्याधापक’ म्हणून घोषित केले. सीएनएन – आयबीएन ने २००९ साली त्याला ‘रियल हिरो’ चा पुरस्कार दिला. तसेच भारताबाहेरून काही देशांनी त्याला आपल्या कामाविषयीची माहिती देण्यासाठी आमंत्रित केले होते.

आजही बाबरने अनेक अडचणींना तोंड देत आपले काम सुरु ठेवले आहे. गावातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळावं यासाठी तो प्रयत्नशील आहे. त्याच्यासोबत अजून १० शिक्षक आहेत. त्यातही गावातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये याकडे त्याचं कटाक्षाने लक्ष असतं. आजही त्याच्या शाळेत  ६०% प्रमाण मुलींचे आहे. या शाळेत महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचं त्याचं स्वप्न आहे.
  

उल्लेखनीय कृती कार्यक्रम

सृजन गट कुरूळ, अलिबाग


कुरूळ अलिबाग येथील गटाने परिसरातील कचऱ्याचा प्रश्न दोन वर्षांपासून उचलून धरला आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचे प्रयत्न चालले आहेत. या गटाने हा प्रश्न कसा निवडला आणि तो सोडवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केले, त्यांना कोणी मदत केली आणि कोणी नाही केली ऐकुया त्यांच्याच शब्दांत.

आम्हाला सरांनी कुमार निर्माण विषयी सांगितले आणि त्यात आपण आपला परिसर ज्यात आपण स्वतः पण येतो अजून चांगला सुंदर आणि आहे त्या पेक्षा एक पाऊल पुढे कसा नेऊ शकतो या साठी प्रयत्न करतो असे सांगितले. कुमार निर्माणच्या गटात काम करण्याची कोणाची इच्छा आहे असे विचारताच आम्ही हात उंचावले आम्हाला गटात उपक्रम  राबवायला आवडतील असे सांगितले. अशा प्रकारे आम्ही कुमार निर्माणच्या गटात सामील झालो.

गटात काय कृती करायची जेणे करून परिसरात काही तरी चांगला बदल घडेल याचा आम्ही विचार करू लागलो. आमच्या शाळेसमोरच एक खड्डा आहे आणि परिसरातील लोक त्या खड्ड्यात कचरा टाकतात त्यामुळे घाण वास येतो आणि त्याचा त्रास शाळेतील मुलांना होतो. म्हणून आम्ही या खड्ड्यातील कचरा साफ करायचे असे ठरवले. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंती निमित्त आम्ही या खड्डातील कचरा साफ केला. परिसरातील लोकांनी परत खड्ड्यात कचरा टाकू नये म्हणून आम्ही घरोघरी  जाऊन लोकांना सागितले की या खड्ड्यात कचरा टाकू नका. तुम्ही कचरा टाकला नाही तर तुम्हालाही त्रास होणार नाही आणि आम्हालाही त्रास होणार नाही. घरातील कचरा घंटा गाडीत टाका असेही सांगितले. त्यावेळेस सगळे लोक आम्हाला हो म्हणाले. पण नंतर परत खड्ड्यात कचरा टाकू लागले आणि पुन्हा परिस्थिती पहिल्या सारखी झाली.

खड्ड्यातील कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मग ही मुले ग्रामपंचायत कडे गेली आणि त्यांना या विषयी निवेदन दिले. ग्रामपंचायत चे अधिकारी म्हणाले की तुम्ही मुले लहान असूनही जर एवढे प्रयत्न करताय तर आम्ही पण नक्की मदत करू. ग्रामपंचायतने तीथे दोन कचराकुंड्या बसवल्या. तरही काही लोक कचरा कचरा कुंडीच्या बाहेरच टाकत. मग आम्ही परत त्या लोकांना सांगायला गेलो की कचरा बाहेर टाकता कचरा कुंडीतच टाका. या वेळेसही घरोघर जाऊन आम्ही सगळ्यांना समजून सांगितले. परिसरातील लोकांना आम्ही कागदाच्या कापडी पिशाया घरी बनवून वाटल्या. त्यांना सांगितले की प्लास्टिक च्या पिशव्या न वापरता बाजाराला किंवा खरेदीला जाताना या कापडी पिशवा वापरा. गावातील तळ्याजवळील लोकांनाही मुलांनी या पिशव्या दिल्या आणि महत्व समजावून सांगितले. त्यांनाही तळ्यात कचरा टाकण्याची विनंती मुलांनी केली.

गटाच्या या प्रयत्नांनी खड्ड्यातील कचरा कमी होण्यास चांगलीच मदत झाली. पण तरीही काही लोक खड्ड्यात कचरा टाकतातच. त्यावर मुलांनी मग त्यांच्या वार्षिक स्नेह संमेलनात एक नाटिका सादर करायचे ठरवले. गटातीलच एका मुलीने या साठी नाटक लिहले आणि त्यांनी ते वार्षिक स्नेहसंमेलनात सर्व गावकर्यांसमोर सादर केले.
शब्दांकन -  कुमार निर्माण  टीम

खड्ड्यातील कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता जरी आता कमी झाली असली तरी अजून प्रश्न पूर्णपणे संपलेला नाहीये. यावर अजून काय उपाय करता येयील या विषयी गटाचा विचार सुरु आहे. पुढील प्रयत्नांसाठी कुमार निर्माण तर्फे गटाला शुभेच्छा.  


जागृती गट, डोमरी

जागृती गटाच्या प्रसाद आणि प्रतिक यांनी शाळेतील मुलांना  ग्रह तारे टेलिस्कोप च्या मदतीने दाखवून त्या विषयीची अधिक माहिती द्यायची ठरवले. एक महिना तयारी करून पुस्तके, इंटरनेट इतर साहित्याची मदत घेऊन  त्यांनी स्वतः पूर्ण अभ्यास केला. स्वतः टेलिस्कोप  मधून निरीक्षण केले. अशा प्रकारे पूर्व तयारी  पूर्ण झाल्या नंतर त्यांनी ४० मुलांना टेलिस्कोप च्या मदतीने चंद्र इतर तारे दाखवले आणि त्या विषयी माहिती समजावून सांगितली. त्यांनी मुलांना या वेळेस चंद्र आणि गुरु ग्रहाबद्दल माहिती सांगितली. मुलांना चंद्र आणि गुरु ग्रहाबद्दल अधिक माहिती तर या उपक्रमातून मिळालीच पण त्या सोबतच मुलांना टेलिस्कोप हाताळायलाही मिळाला. रात्रीच्या शांत वातावरणात निरभ्र आकाशातील ग्रह तारे टेलिस्कोप मधून पाहायला मिळणे ही मुलांसाठी एक आनंदाची पर्वणीच ठरली.


बालीवली गट, वाडा

कोहोज नावाचा एक गड बालीवली येथून जवळपास ५० किमी  अंतरावर  आहे. या गडावर  उंचावर एक महादेवाचे मंदिर आहे. येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा भरते.  त्या यात्रेस जवळपास पाच हजार लोक येतात. यात्रेनंतर तेथे भरपूर कचरा आणि प्लास्टिक पडलेले असते. हा कचरा उचलण्यासाठी गटातील मुले आणि गट निमंत्रक या गडावर  गेले होते. सकाळी  लवकर निघून हे लोक गडावर पोहोचले. पहिले ते गड चढून वरती गेले. तिथे त्यांनी डब्बे खाल्ले. नंतर गटाने मिळून  कचरा प्लास्टिक उचलले. सगळे प्लास्टिक गोळा करून ते त्यांनी गोण्यांमध्ये भरले. अशा त्यांनी आठ गोण्या भरल्या. हा कचरा प्लास्टिक चा असल्याने त्यांनी तो जाळला नाही तर त्यांनी त्या गोण्या तिथेच मोठ्या दगडांखाली दाबून ठेवल्या जेणे करून हा कचरा इतरत्र पसरणार नाही. विशेष म्हणजे या कृती मध्ये आताच्या कुमार निर्माणच्या गटातील मुले तर होतीच, पण त्याच सोबत मागील वर्षी गटात असणारी आणि आता गटात नसणारी अशी आठ मुले पण होती. या सगळ्यांनी मिळून तो परिसर प्लास्टिक मुक्त केला


सारथी गट, पवनी

पवनीच्या ‘सारथी गटा’च्या ३ महिन्यांपूर्वीच्या बैठकीत काही मुलांनी असे मत मांडले की, ‘बसमधून प्रवास करणारे प्रवासी काहीही खाल्लं की सरळ खिडकीतून बाहेर फेकतात, तिकिटे सुद्धा प्रवास झाला की रस्त्यावर फेकतात’. मग यावर चर्चा झाली आणि गटाने ठरवले की पवनीतून सुटणाऱ्या सगळ्या बसेसमध्ये कचऱ्याच्या पेटया ठेवायच्या आणि तिथे जाऊन लोकांना सांगायचं की कचरा या पेट्यांमध्येच टाका. परंतु जेव्हा मुलांनी कंडक्टरना भेटून विचारले तेव्हा त्यांनी मुलांना उडवून लावले. ‘सगळ्या बसेसमध्ये आपण कचरापेट्या ठेवणं शक्य नाही’, असा विचार करून मुलांनी तो विषय डोक्यातून काढला. परंतु जेव्हा गटाच्या बैठकीत पुन्हा त्याच विषयावर चर्चा झाली तेव्हा मात्र मुलांनी ठरवलं की ‘जरी आपण सर्व बसेसमध्ये कचरापेट्या नाही ठेवू शकलो तरीही काही ठराविक ठिकाणी आपण त्या पेटया नक्कीच ठेवू शकतो.’

मागील महिन्यात मुलांनी खोक्यांना सजवून, त्यावर ‘कुमार निर्माण’चे नाव टाकून त्याच्या कचरापेटया बनवल्या. शाळा ते बस स्थानकापर्यंत रॅली काढून गावातील लोकांना साठलेल्या कचऱ्यामुळे होणाऱ्या दुष्परिनांमाविषयी सांगून स्वच्छतेचा संदेश दिला. यासोबतच काही ठराविक दुकानांच्या समोर (जिथे मोठया प्रमाणावर कचरा असतो), बस स्थानक तसेच पवनी-नागपूर बसेसमध्ये मुलांनी बनवलेल्या कचरापेट्या ठेवल्या व तेथील लोकांना त्यातच कचरा टाकण्याची विनंती केली.

एका ठिकाणी कचरापेटी ठेवताना मुलांना एक गृहस्त खर्रा खाताना दिसले. त्याबद्दल मुलांनी लिहिलेले त्यांच्याच शब्दात,

“कचरापेटी ठेवण्यासाठी आम्ही एका दुकानात गेलो. तेथे एक काका व्यसन करत होते. त्यांना आम्ही सांगितले की कृपया तुम्ही व्यसन करू नका कारण त्यामुळे कर्करोग होतो. त्यामुळे तुमच्या मूला-बाळांवरही वाईट परिणाम होतील. असं सांगितल्याबरोबर त्यांनी आपल्या तोंडातून सगळा खर्रा थुंकला व मी आजपासून कधीच व्यसन करणार नाही असे सांगितले. हे ऐकून आम्हाला खूप आनंद वाटला. आणि आजच्या कचरापेट्या ठेवण्याच्या व त्याचे दुष्परिणाम लोकांना समजावण्याच्या कामात आम्हाला यश मिळालं. आमचा हा अनुभव खूप चांगला होता व यातून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले.”

सारथी गट, पवनी
गट निमंत्रक: वृंदन बावनकर (९७६६३७०९५९)