Friday 30 June 2017

मुखपृष्ठ


अनुक्रमणिका




संपादकीय मंडळ





अमृत बंग
प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव

संपर्क
प्रफुल्ल ९४२०६५०४८४
प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश  ९५०३०६०६९८
इमेल : contact.knirman@gmail.com


अंक तिसरा | जून २०१७
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/
(खाजगी वितरणासाठी)



संवादकीय

नमस्कार दोस्तहो !!!
सर्वजण मजेत आहात ना? आम्हीही इकडे मजेत आहोत.
सर्वप्रथम वरच्या वर्गांत गेल्याबद्दल कुमार निर्माण टीम कडून तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक अभिनंदन!
आम्हाला खात्री आहे की सुट्ट्यांमध्ये सगळ्यांनीच खुप धम्माल केली असेल, खुप खेळला असाल आणि आपापल्या आवडीच्या गोष्टी केल्या असतील. तुमच्यापैकी काही जण मामाच्या गावी गेला असाल, काही इतर नातेवाईकांकडे, काही कौटुंबिक सहलीसाठी गेला असाल तर काहींनी घरीच राहून मजा केली असेल.
अर्थातच मोठ्ठ्या सुट्टीमुळे कदाचित आपला गट थोडा विस्कळीत झाला असेल, पण बरेच गट नेहमीप्रमाणे भेटत असतील. एव्हाना तुमच्या शाळा सुरु झाल्या असतील. नवीन वह्या, पुस्तकं यांच्या एका विशिष्ट सुगंधाचा घमघमाट सुटला असेल आणि सुट्टी संपून पुन्हा शाळा, शिकवण्यांमध्ये तुम्ही लवकरच व्यस्त व्हाल.
मित्रांनो, परंतु या व्यस्त वेळापत्रकात आपल्याला सुट्टीत विस्कळीत झालेला कुमार निर्माणचा गट पुन्हा त्याच उत्साहाने, उर्जेने सुरु करायचा आहे. तुम्हीही सुट्टीत केलेली धमाल आपल्या मित्रांना सांगायला उत्सुक असलाच. तुमच्या परीक्षा सुरु होण्याआधी म्हणजेच एप्रिलमध्ये सुट्टीतही तुम्हाला कुमार निर्माणशी जोडून ठेवेल असा धागा म्हणजेच ‘उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम’ आम्ही तुमच्यापर्यंत पोहचवले होते. यासोबतच ‘न्याया’वर आधारित भरारीही आम्ही तुम्हाला पाठवलं होतं. काही गटांना भरारी उशिरा मिळाल्याने तुम्हा मुलांपर्यंत ते पोचू शकले नाही याबद्दल Sorry!

अर्थात तुम्ही शाळेत परत आल्यावर ते भरारी वाचू शकतात. याशिवाय ज्या गटांना वेळेत भरारी व उपक्रम मिळाले आहेत त्यांनी यातील जास्तीत जास्त उपक्रम करण्याचा प्रयत्न नक्की केला असेल. तुम्ही केलेल्या सुट्टीतील उपक्रमांचे तुमचे अनुभव नक्की आमच्यापर्यंत पोचवा म्हणजे इतरांनाही त्यातून प्रेरणा मिळेल.
‘उन्हाळ्याच्या सुट्टीतील उपक्रम’ करताना तुम्हाला वेगवेगळे अनुभव नक्कीच आले असतील. घरात कोण जास्त काम करतं याचं कदाचित उत्तरही निरीक्षणातून मिळालं असेल, प्राण्यांचे वेगवेगळ्या वेळी निरीक्षण करताना कदाचित एखाद्या प्राण्याने तुमच्याशी संवादही साधला असेल, आपल्या परिसरातील व्यवसाय करणाऱ्यांची मुलाखत घेताना तुम्हाला बऱ्याच नवीन गोष्टी कळल्या असतील तसंच कुणालातरी मदत करून तुम्ही शाबासकीही मिळवली असेल. तर हे सगळे अनुभव आमच्याशी नक्की शेअर करा, आमच्यापर्यंत पोचवा. ज्या गटांना भरारी उशिरा मिळाले ते गट सुट्टीत करायला दिलेले उपक्रम आत्ताही करू शकता. याव्यतिरिक्त जरी कुणी काही उपक्रम आपापल्या ठिकाणी केले असतील तर तेही जरूर आमच्याशी शेअर करा. आम्हीही तुमचे भन्नाट अनुभव वाचायला आतुर आहोत.
आधीच्या भरारीचे वाचन करून त्यातील गोष्टीवर, चित्रावर गटात चर्चा घडवून आणा, कोड्याचे उत्तर शोधा यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘न्याया’शी संबंधित दिलेले उपक्रम गटात कसे करता येतील यावरही चर्चा करा. या भारारीचेही वाचन करून त्यावर चर्चा करा.
आता उन्हाळ्यानंतर लवकरच पावसाला सुरुवात होईल. सगळीकडे मातीचा सुगंध दरवळेल. परिसर हिरवागार होईल. शेतांमध्ये पेरणीला सुरुवात होईल. पावसाळा ऋतूशी संबंधित तुम्ही काय उपक्रम करू शकतात यावर गटात नक्की चर्चा करा. कदाचित तुम्ही आपल्या गावातल्या किंवा गावाबाहेरील शेतकऱ्याला पेरणीच्या कामात मदत करू शकाल, त्यात तुम्हाला मजाही येईल, शिकायलाही मिळेल आणि शेतकऱ्यांनाही मदत होईल. यासोबतच तुम्ही गट मिळून आपापल्या परिसरात उपयुक्त अशी फळा-फुलांची, भाज्यांची रोपेही लावू शकता.
तर मित्रांनो, या मोठ्ठ्या सुट्टीनंतर गटाला पुन्हा रिचार्ज करूया आणि तेवढ्याच जोमाने पुन्हा मिटींग्स, विविध कृतिकार्यक्रम यांना सुरुवात करूया.
आणि लवकरच आम्ही तुम्हाला भेटायला येत आहोत...
  

‘स्व’


प्रिय मित्र/मैत्रिणींनो आपल्या भारतीय परंपरेतील बरेच संत आपल्याला एक गोष्ट सतत सांगत आले आहेत. ती म्हणजे ‘स्वतः’ला ओळखा, ‘स्वतः’चा शोध घ्या. पण आपल्याला असं वाटतं की स्वतःला ओळखणं, स्वतःचा शोध घेणं ही कदाचित खुप अवघड गोष्ट असावी. इतक्या लहान वयात ती आपल्याला जमणारही नाही आणि म्हत्त्वाचं म्हणजे ते करणं आपल्याला तेवढं गरजेचंही वाटत नाही. परंतु मित्रांनो, स्वतःशी नीट ओळख झाली तर आपल्या आजूबाजूच्या लोकांना तसेच परिसराला नीटपणे ओळखायला आपल्याला नक्कीच मदत होते. आणि विशेष म्हणजे स्वतःला ओळखणं ही खरंतर एक भन्नाट प्रक्रिया असते.
आणि कुमार निर्माणमध्ये तर आपण सर्वच कृतिकार्यक्रम स्वतःशी आणि आपल्या परिसराशी निगडीत करत असतो. त्यामुळे जर तुम्ही स्वतःला नीट ओळखू शकलात तर काम करायलाही मजा येईल. कुठल्याही मुलाखतीस जर तुम्ही गेला तर तिथे हमखास पहिला प्रश्न असतो “तुमच्या बद्दल सांगा” किंवा “Tell something about yourself” आणि खूप लोकांची इथेच दांडी उडते कारण असा स्वतःबद्दल आपण कधी विचारच केलेला नसतो. आपण स्वतःला ओळखतच नसतो. आपण कसे आहोत, आपला स्वभाव कसा आहे, आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही, काय जमतं, काय जमत नाही असा वेगळा विचार आपण करत नाही. पण स्वतःला ओळखून अजून चागलं बनवायचं असेल तर या गोष्टींचा विचार करणं खूप महत्त्वाचं आहे.

या महिन्यात आपण एक छान उपक्रम करणार आहोत ज्यामुळे आपल्याला स्वतःला ओळखायला मदत होईल.
एक कागद घ्या, त्यावर अनुक्रमे खालील बाबीविषयी माहिती भरा.
· पूर्ण नाव, वय, इयत्ता
· संपूर्ण पत्ता (बघू कुठपर्यंत लिहता येतोय)
· कुटुंबाचं झाड (Family Tree)
· माझा दिनक्रम -
· माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या गोष्टी -

 · मला हे आवडतं -
· मला हे आवडतं नाही -
· मला अशा वेळी छान वाटतं -
· मला अशा गोष्टींचा राग येतो -
· मला आवडणाऱ्या व्यक्ती व त्या कशामुळे आवडतात -
· मला न आवडणाऱ्या व्यक्ती व त्या कशामुळे आवडत नाहीत -
· माझ्या मित्र-मैत्रिणींना मी आवडतो/ आवडते कारण -
· काही लोकांना माझ्या या गोष्टी आवडत नाहीत -

तर ही माहिती भरुया आणि बघूया आपल्याला काही नवं सापडेल का!

गोष्ट

छटाकी आजीची गोष्ट !
 तशी ही गोष्ट माझ्या लहानपणीची आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नावाच्या छोट्या गावात मी वाढले. आमच्या गावातून अमरावती व भोगवती या दोन नद्या वाहतात.
आम्ही कुटुंबात एकत्रितरीत्या सात भावंडे होतो; २ बहिणी आणि ५ भाऊ. एकत्र कुटुंब असल्याने सर्व भावंड हसत, खेळत, भांडत, रडत आणि एकमेकांची काळजी घेत एकमेकांच्या सोबत वाढलो. आणि सोबतीला कॉलनीमधील मित्र-मैत्रीणीही होतेच. कॉलनीमध्ये आम्हा सर्व मित्रांची एक भारीच गँग होती. अर्थात आम्ही गुंडा गर्दी नाही करायचो परंतु खेळणं, रात्री मोकळ्या आकाशाखाली झोपून तारे बघणं, खुप उशिरापर्यंत गप्पा मारणं, शाळेत जाणं, अभ्यास आणि बऱ्याचदा जेवण अशा सर्व गोष्टी एकत्र करायचो, सर्व सण-समारंभ एकत्र साजरे करायचो, खुप मजा करायचो. एकूण आमची  गँग तशी खुप फेमस होती.
आमचं घर रेल्वे लाईनला लागून होतं आणि सर्व ठिकाणी असते तशी आमच्या दोंडाईचामध्येही या रेल्वे लाईनला लागुनच एक मोठी झोपडपट्टी होती. ती अजूनही आहे. या झोपडपट्टीत मुख्यत्त्वेकरून भिल व पावरा समाजाची लोके राहत असत. हे सगळे दोंडाईच्याचा शेजारी असलेल्या नंदुरबार मधील आदिवासी समाजाची लोकं होती. तसा त्यांचा प्रमुख व्यवसाय शेती होता आणि हे आदिवासी लोक जंगलात राहायचे, परंतु झोपडपट्टीत राहायला आल्यावर त्यांना स्वतःचा असा काही मुख्य व्यवसाय उरला नव्हता. मग यांच्यातील महिला वर्ग आसपासच्या कॉलनीमधील घरांत धुणी-भांडी असे घरकाम करायच्या, पुरुष वर्ग मजुरी करायचा आणि वृध्द महिला रेल्वे लाईनच्या आसपासच्या परिसरात भीक मागायच्या.

तर अशीच एक म्हातारी आमच्या कॉलनीत रोज अन्न मागायला यायची. तिची यायची वेळ अन आमची शाळेला निघायची वेळ एकच असायची. त्या म्हातारीला तिचं स्वतःचं असं काही नाव होतं की नाही ते फारसं आता नीट आठवत नाही पण आमच्या कॉलनीतल्या काही आजी तिला ‘ए छटाकीऽऽ...’ अशीच हाक मारायच्या. तिच्या खऱ्या नावाला सोडून आम्हीही तिला छटाकीच म्हणत असू.
ती दिसायला काळी पण चेहऱ्याने आखीवरेखीव होती, थोडी वेडसर होती. तिचे मोठ्ठाले डोळे मला अजूनही आठवतात. ती जवळ आली की तिचा एक विशिष्ट वास यायचा. खुप दिवस तिच्या अंगावर एकच लुगडं दिसायचं. ते फाटायला आलं की त्यावर काही ठिकाणी ठिगळही दिसायची. ती तिच्या झोपडीत एकटीच राहायची. अर्थात आम्ही मुलं कधी तिच्या झोपडीपर्यंत गेलो नाही. तिच्याजवळ नेहमी एक गाठोडं असायचं. त्यात काय असेल याचं आम्हाला नेहमीच कुतूहल असायचं. आणि रोज ते गाठोडं ती सोबत वागवायची. तिच्याजवळ नावाला एक-दोन भांडी दिसायची ज्यात ती घरोघरी मागितलेलं अन्न साठवायची आणि दुपारी एखाद्या झाडाच्या सावलीत बसून खायची. आमच्या कुणाच्या घरी पैसे मात्र तिने कधीच मागितले नाहीत. जेव्हा आम्ही खुप लहान म्हणजे पहिली-दुसरीत होतो तेव्हा ती घरी आली रे आली की आमची आई, काकू, आज्जी आम्हाला दम भरायच्या आणि म्हणायच्या की “आता जर तुम्ही मस्ती केली तर तुम्हाला छटाकीकडे देऊन टाकू. मग ती तुम्हाला कुठेतरी दूर घेऊन जाईल.” घरच्यांच्या अशा धाकामुळे छटाकी आमच्या गँगची दुश्मन होती. ती आली रे आली आम्ही सर्व जण तिला वाकुल्या दाखवत चिडवत असू, तिला दगड मारत असू, हाकलून लावत असू आणि मग ती आमच्यावर धावून येई आणि शेवटी आम्ही तिथून पळ काढत असू. हा आमचा रोजचा उद्योग झाला होता. कधीतरी तिने घरी तक्रार केली तर आम्ही मुलं मारही खात असू. एवढं होऊनही छटाकीला त्रास देणं काही आम्ही सोडलं नव्हतं आणि तिनेही आमच्या कॉलनीत येणं बंद केलं नव्हतं. आमच्या घरी तिला कुणी ‘भिकारी’ म्हणून वाईट वागणूक दिल्याचं मलातरी आठवत नाही. उलट आमच्या आई, काकू छटाकीच्या नावाची एक भाकरी किंवा जास्तीची खिचडी मात्र आठवणीने करून ठेवायच्या.
कधीतरी दुपारी आम्ही शाळेतून घरी यायचो तेव्हा छटाकी आमच्या आज्जीशी तासंतास गप्पा मारतानाही दिसायची. आमच्याकडे येणारे पाहुणे-राउळेही तिला पाठ झाले होते. तिला आम्ही आमची दुश्मन जरी मानत असलो तरी तिची आम्हाला कधी भीती वाटली नाही किंवा तिच्या अशा राहणीची किळसही वाटली नाही.
हळूहळू आम्ही मोठे होत गेलो आणि छटाकी मात्र अधिक म्हातारी होत गेली. ती आधीपेक्षा खुप खंगत गेली. तरी तिचं येणं मात्र चालूच होतं. थोडं मोठं झाल्यानंतर मात्र आमची तिच्याशी असलेली दुश्मनी कमी व्हायला लागली होती. कारण मोठे झाल्यावर आम्ही आमच्या आईला
म्हणायचो की, “छटाकी तर रोजच आपल्याकडे येते. जरी तुम्ही आम्हाला तिच्याकडे देऊन टाकलं तरी आम्ही दुसऱ्यादिवशी तिच्यासोबत घरी परत येऊच शकतो.” मग हळूहळू आम्हीही तिच्याशी गप्पा मारायला लागलो होतो. मला अजूनही आठवतं, एकदा आम्ही भावंडांनी तिला तिच्या मुला-बाळांबद्दल विचारलं होतं. तिने काही सांगितलं नाही पण तिच्या डोळ्यात पाणी मात्र आलं होतं. ते बघुन आम्हाला खुपच वाईट वाटलं होतं. मग त्यादिवसापासून आमच्या गँगने ठरवून टाकलं की इथून पुढे छटाकीला आपण अजिबात त्रास द्यायचा नाही. मग ती आजीशी गप्पा मारताना कधीतरी हळूच आमच्या केसांतून मायेचा हात फिरवायची, तिच्या रखरखलेल्या हातानी आमचे गालगुच्चे घ्यायची, आमचे लाड करायची. नकळत छटाकी आमच्या आयुष्याचा एक भाग बनली होती.
आम्ही साधारण चौथीत असू. झालं असं की खुप दिवस गेले पण छटाकी काही आमच्या कॉलनीत अन्न मागायला आली नाही. आम्ही आजुबाजूच्या घरांतही चौकशी केली पण कुणालाही ती दिसली नव्हती. मला आठवतं आमच्या गँगमध्ये ‘छटाकी कुठे गेली असेल?, ती काय खात असेल?, तिला काही झालं असेल का?’ यावर बोलणं होत असे. ती राहत असलेल्या झोपडपट्टीत त्यावेळी आम्ही का नाही गेलो ते माहित नाही पण रोज छटाकीची आठवण मात्र निघायची.
अन एक दिवस अचानक ती पुन्हा आली. सकाळच्या वेळी आम्ही भावंड घराच्या मागच्या ओट्यावर अभ्यास करत होतो अन अचानक “भाकरी दे वं माऽऽय...” अशी आरोळी आमच्या कानावर पडली. माझी ताई म्हणाली हा आवाज नक्की छटाकीचा आहे. कोण आनंद झाला होता तेव्हा ती आरोळी ऐकुन! मला आठवतं आम्ही सगळे अभ्यास सोडून तिच्याभोवती जमलो आणि आमच्या प्रश्नांनी तिला भंडावून सोडलं. शेवटी आम्हाला कळलं ते असं की छटाकीच्या पायाला जखम झाली असल्याने तिला चालता येत नव्हतं आणि म्हणून ती इतके दिवस आमच्या कॉलनीत फिरकली नव्हती. हे कळल्यावर आम्हाला खूपच वाईट वाटलं होतं. इतके दिवस खायला नीट न मिळाल्याने तीची तब्येत खूपच ढासळली होती. तिच्या हाडांचा अगदी सांगाडा झाला होता. लागलेल्या ठिकाणी पायाला तिने एक कापड गुंडाळलं होतं.
 मग पुन्हा छटाकी सतत आमच्याकडे येत राहिली अन आमच्याकडेही तिच्या नावाची एक भाकरी किंवा जास्तीची खिचडी शिजत राहिली. आता तिच्याबद्दलची भीती गळून पडल्याने आम्हीही तिला भाकरी नेऊन द्यायचो, तिचं खाऊन झालं की प्यायला पाणीही द्यायचो. कधीही आमच्या आई, काकू, आज्जीला तिच्या नावाची भाकरी करण्याचा कंटाळा आला नाही की आम्हालाही कधी तिच्या रोज येण्याचा तिटकारा आला नाही.
पाचवीनंतर वडिलांच्या बदलीमुळे आम्ही दुसऱ्या गावी राहायला गेलो. पण छटाकीचं येणं मात्र बरेच दिवस चालू होतं. नंतर आमचंही दोंडाईच्याला जाणं हळूहळू कमी झालं आणि छटाकीही माझ्या विस्मरणात गेली. कधीतरी पुढे सातवीत असताना मी दोंडाईच्याला गेले होते, त्यावेळी पुन्हा एकदा गप्पांच्या ओघात आमच्यात छटाकीचा विषय निघाला. तेव्हा मी लगेच आज्जीला विचारलं, “छटाकी आज्जी अजूनही येते का गं आपल्याकडे? बरीये का ती?” त्यावेळी आज्जीने सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून अचानक तिचं येणं बंद झालं आणि नंतर काही दिवसांनी असं कळलं की छटाकी आज्जी हे जग सोडून गेली. ते ऐकुन खरंतर खुप वाईट वाटलं होतं. रडूही आलं होतं.
तसं बघायला गेलं तर छटाकी आज्जी ही एक भिकारीण होती पण आमच्यासाठी आमच्या आज्जीसारखीच एक आज्जी होती, जिला आम्ही रोज न चुकता खायला द्यायचो, जिच्याशी प्रेमाने वागायचो आणि जिने आमच्या केसांतून फिरवलेला हात, आमचे घेतलेले गालगुच्चे आम्हाला आमच्या आज्जीइतकेच प्रेमळ वाटायचे!
- प्रणाली सिसोदिया




मुलांच्या लेखणीतून

. भरारी गट – भराडी, जळगाव

नेहमीप्रमाणे ठरलेल्या दिवशी शाळेच्या अंगणात आमची कुमार निर्माणची मिटींग चालू होती. सकाळी कुमार निर्माणच्या मुलांव्यतिरिक्त इतर मुले व पालक यांची ये-जा शाळेत सुरू होती. आम्हाला वाटलं काय आहे? बघण्यासाठी म्हणून आम्ही ज्या ठिकाणी पालक आपल्या मुलांना घेऊन जात होते त्या खोलीकडे गेलो. तेथे आम्हाला दिसले की गावातल्या लहान मुलांना पल्स पोलिओ लस देण्याची मोहीम सुरु आहे. मग त्या ठिकाणी आम्ही आमच्या सरांसोबत आणि अंगणवाडीच्या ताईसोबत चर्चा केली. पल्स पोलिओ म्हणजे काय? ते देण्याचे फायदे काय? याला राष्ट्रीय कार्यक्रम का म्हणतात? हा कार्यक्रम करताना ताईंना येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. ताईंनी सर्वं विषयांवर सविस्तर चर्चा केली. ताईंनी सांगितलं की आज जी मुलं येतील त्यांना इथे औषध द्यायचं आणि जी इथे येणार नाही त्यांना घरी जाऊन औषध द्यायचं. गटातील सर्व सदस्यांनी ठरवलं की आज आपण ताईंच्या कामात हातभार लावून पल्स पोलिओ मोहिमेत सहभागी होऊया. आज हा कृतिकार्यक्रम करायचं ठरलं. त्यात नम्रता व  जगृती म्हणाल्या की गावातील मुले येतील परंतु गावाच्या बाहेर आलेले धनगर लोक जे मेंढपाळ आहेत त्यांच्या मुलांचे काय? तर ऋषिकेश व वैभव म्हणाले आपल्या परिसरात काठेवाड लोकं गायी शेतात बसवतात त्यांच्याकडे देखील छोटी मुले आहेत त्यांच्या साठी काय करता येईल? चर्चा झाली आणि गाव छोटेसे असल्याने आम्ही दोन दोन सदस्यांचे गट तयार केले आणि प्रत्येक गटाने गल्ल्या वाटून घेतल्या. गटातील मोठया सदस्यांनी धनगर वाडा व काठेवाड वस्ती गाठली. त्यांना पल्स पोलिओचे महत्त्व समजावून सांगितले व त्यांच्या पालकांना व बाळांना शाळेत आणले व औषध दिले. तर गावातील कुमार निर्माणच्या सदस्यांनी गावातील सर्व बाळांना व त्यांच्या पालकांना  शाळेत बोलावून औषध दिले त्यामुळे अंगणवाडीच्या ताईंच्या कामात पण मदत झाली व लाभार्थ्यांनाही मदत झाली. आम्ही केलेल्या कामाचे कौतुक गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सुपरवायजर ताई या सर्वांनी केले. आमच्या छोट्या मदतीमुळे गावातील सर्व बाळांना महत्त्वाची लस मिळाली याचा आम्हाला खूप आनंद झाला. नंतर आम्ही सर्व आपापल्या घरी गेलो.
गट निमंत्रक: समाधान ठाकरे
 . किलबिल कट्टा, भुसावळ, जळगाव
२८ मे ला म्हणजेच रविवारी आमच्या किलबिल कट्ट्याने निसर्ग सहल आयोजित केली होती. मी सकाळी लवकरच उठून तयार झाली आणि माझ्या पप्पांनी सकाळी ६ वाजताच मला सहलीच्या ठिकाणी सोडलं. तिथे माझे सर्व मित्र-मैत्रिणी, शैला ताई, व इतर जणही जमले होते. मग आम्ही झाडांच्या बिया उचलायला सुरुवात केली. बिया उचलताना ताईंनी आम्हाला जवळ-जवळ २०-२५ झाडांची माहिती दिली. जसे, बहावा, रिठा, पिंपळ, जांभूळ, वड ई. यासोबतच तातोडा, कोकिळा हे पक्षी सुद्धा आम्ही पाहिले.
हे काम करताना आम्ही खूप धम्माल पण केली. बेलफळे एकमेकांत वाटावाटी करून खाल्ली. आम्हाला खरी मजा आली ती मुंग्यांनी झाडावर बांधलेल्या घरट्यांना पाहून. कुणीतरी अशीच एक घरटं असलेली फांदी तोडली तर क्षणात हज्जारो मुंग्या बाहेर आल्या आणि आम्ही सर्वजण लांब पळालो. नंतर आम्ही बहावाच्या शेंगांचा खुळखुळा म्हणून वाजवून धम्माल केली.
नंतर आम्ही फिरत फिरत जुन्या मार्केटमध्ये जाऊन वडापाव खाल्ला. जावळे सरांनी आम्हाला इंग्रजी चिंचा खायला दिल्या. मग आम्ही चांदणी गार्डनमध्ये जाऊन भंडारी सरांसोबत विविध खेळ खेळलो. नंतर आम्ही सर्वांनी मिळून पोहे खाल्ले आणि खूप गप्पा मारल्या.
आता या जमा केलेल्या बियांचे आम्ही बियांचे लाडू म्हणजेच सीडबॉल बनवणार आहेत आणि ते पावसाळ्यात आजूबाजूला टाकणार आहे. सीडबॉल म्हणजे एक बी घ्यायची आणि तीला मध्ये टाकून आजूबाजूने माती लावून त्याचा बॉल किंवा लाडू सारखा आकार बनवायचा.
आम्ही मस्तपैकी निसर्ग पहिला. मला सकाळची सहल खूप खूप आवडली. आणि परत अशा सहलीला जायला मला नक्की आवडेल.
श्रद्धा रमेश प्रधान
निमंत्रक: शैला सावंत
 . मलजल प्रक्रिया केंद्राला भेट - मी माणूस गट, नाशिक

१९-०३-१७ रोजी आम्ही मलजल प्रक्रिया केंद्राला भेट दिली. १४ मार्च ला वर्तमानपत्रात मलजल प्रक्रिया केंद्राला भेट देण्याची बातमी होती. आमच्या गटातील एकीने ती बातमी वाचून सर्वांना विचारले तर १५ जणांनी होकार दिला मग आम्ही आमची नोंदणी केली. ठरलेल्या दिवशी सगळे आपल्या पालकांसोबत ९.०० वाजता तापोवनला पोचले. तिथे एका सरांनी या कार्यक्रमाची आम्हाला माहिती दिली. त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या काकांनी एक प्रेझेन्टेशन दाखवलं आणि आम्हाला सांगितलं की या कार्यक्रमाचं आयोजन ‘जागतिक जलदिना’निमित्त केलं आहे. मग त्यांनी आम्हाला प्लांटवर नेलं. सगळ्यांत पहिले इनलेट चेंबर दाखवलं. इथून सांडपाणी सोडल्या जातं, मग स्क्रीन चेंबर मध्ये जातं. तिथे एक मशीन आहे जिथे तरंगणाऱ्या वस्तू जसे, प्लस्टिकच्या पिशव्या, भाज्यांचा कचरा ई. वेगळं होतं. मग पुढे ते पाणी सिट चेंबर आणि मग बायपास चेंबरमध्ये जातं. इथे जड पदार्थ तुरटी टाकून खाली बसवतात. नंतर ते १२ पाईप्स द्वारे जातात. इथे त्यातल्या जंतूंची वाढ होते आणि मिथेन वायू तयार होतो. या बायपास चेंबरमधलं पाणी एरिएशन साठी एरिएटर मध्ये पाठवतात. तिथे टरबाईन फिरते ज्याने पाण्यातला कार्बन हवेत मिसळतो आणि हवेतलं ऑक्सिजन पाण्यात मिसळतं. त्यानंतर जे पाण्यातले कण होते त्यांना ड्राईंग बेडवर १५ दिवस ठेवतात, ते वाळवतात आणि त्याचं खत तयार होतं जे शेतीसाठी वापरतात. मग आम्ही पॉलिथीन पाँड पहिला. तिथे गेल्यावर सांडपाण्याचा वास कमी झाला होता. मग पाण्याला क्लोरीनेशन युनिटमध्ये त्यातले बॅक्तेरीया मारायला पाठवतात. आता पाणी भरपूर स्वच्छ झालेलं असतं पण पिण्याइतकं नाही. आता हे पाणी नदीत सोडतात. मग आम्हाला बायो-इंजिन रूम दाखवली. गॅस चेंबरमध्ये मिथेन वायू साठवलेला असतो ज्याची इथे वीजनिर्मिती होते. त्यानंतर तिथल्या सगळ्या तज्ञांनी आम्हाला माहिती दिली. आणि आम्ही त्यांना आमच्या शंका विचारल्या. मग आम्ही थोडावेळ खेळलो आणि घरी गेलो. तिथून आल्यावर आम्हाला वाटलं की आपण किती पाणी वाया घालवतो आणि मग आम्ही ठरवलं की पाणी वाया नाही घालवणार. नुकताच होळीचा सण झाला होता आणि ते रंगाचं पाणी त्यातील केमिकलमुळे अजूनही तसंच होतं. मग आम्ही केमिकलचे रंग वापरायचे नाहीत असंही ठरवलं. शेवटी त्या काकांनी आम्हाला एक-एक तुळशीचं रोपटं भेट दिलं.
- इंद्राणी
निमंत्रक: अजित टक्के
 . आम्ही पाहिलेला सूर्यास्त: उडान गट, भोटा, जळगाव
बुधवारी मी असाच रिकामा बसलो होतो. मोकळा वेळ होता. मला एकदम पश्चिमेकडे झुकलेला सूर्य दिसला आणि मनात एक भन्नाट आयडिया आली. मी घराजवळ राहणाऱ्या महेश, वैभव, मयूर व ज्ञानेश्वर यांना एकत्र केलं व आम्ही गावाबाहेरच्या मोकळ्या पटांगणाकडे फिरायला गेलो. सूर्य आता मावळत होता.

तिथे गेल्यावर बघतो तर काय? सूर्य एकदम लालबुंद दिसत होता. जणू सोन्याचा गोळा क्षितिजाच्या मागे लपत होता. आमच्यातल्या एकाला तर असं वाटलं की हे आकाश म्हणजे एखाद्या स्त्रीचा चेहरा आणि हा सूर्य म्हणजे त्या स्त्रीने लावलेली टिकली.
पण त्या सूर्याला पाहिल्यावर मनात असं आलं की सूर्यासारखी विशाल व अविश्वसनीय गोष्ट जर अस्ताला जाऊ शकते, तर आपण काय चीज आहोत? असं पण वाटलं की या सूर्याला  नेऊन शोकेसमध्ये ठेवावा.
थोड्यावेळाने आमच्या शाळेतील अजून काही मुंला-मुलींचा गट तिथे आला. त्यांनापण कळालं की आम्ही सूर्यास्त पाहायला आलोय. आमच्यासोबत त्यांनीपण मनभरून सूर्य पहिला आणि कोणाकोणाला तो सूर्य कसा वाटतोय ते सांगितलं. मग काही वेळ आम्ही थांबलो आणि मन भरून सूर्य पाहून घरी परत आलो.
- मयूर तायडे
निमंत्रक: मंगेश ढेंगे
  . एकता गट, सासवड, पुणे
कुमार निर्माणचा एकता गट सासवड यांच्या झालेल्या बैठकीत अनेक प्रश्नांबद्दल चर्चा झाली होती. त्यातील एक प्रश्न निवडून त्याबद्दल काहीतरी करायचं असं मुलांनी ठरवलं होतं.
या मुलाच्या कॉलनी मध्ये लोक कचरा एका मोकळ्या जागेवर टाकत होते. गटातील बऱ्याच मुलांच्या घरातील कचरा देखील तेथेच टाकल्या जात होता. मुलांनी हा प्रश्न निवडून त्यावर कृती करायची ठरवलं. लोक कचरा टाकतात त्या ठिकाणी पाटी लावायची असं मुलांनी ठरवलं. पण साध्या पाट्या असलेल्या ठिकाणी लोक अजून जास्त कचरा टाकतात हे मुलांना माहिती होतं. मग मुलांनी तेथे पुणेरी पाटी लावायची असं ठरवलं. ठरल्या प्रमाणे मुलांनी पुणेरी पाट्या बनवल्या. “येथे फक्त अतिहुशार लोक कचरा टाकतात” ‘येथे मूर्ख लोक कचरा टाकतात” अशा या पाट्या होत्या. मुलांनी या पाट्या लोक कचरा टाकतात तेथे लावल्या. मुलं परत परत जाऊन पाट्या योग्य ठिकाणी आहेत का हे बघत होते. एके दिवशी गटातील लहान मुलांना या पाट्या गायब असलेल्या दिसल्या. मुलांनी लगेच नवीन पाट्या आणून तेथे लावल्या.हळूहळू लोकांनी तेथे कचरा टाकणं बंद केलं. जिथे लोक कचरा टाकत ती जागा ज्या माणसाची होती त्यांना हे बघून खूप आनंद झाला. त्यांनी मुलां-मुलींना शाबासकी दिली. आता पर्यंत जो कचरा तिथे जमा झाला होता तो त्यांनी जाळून टाकला.
या मुलांच्या कॉलनी मध्ये कचऱ्याची घंटा गाडी येते पण ती थोडी उशिरा येथे आणि तो पर्यंत सगळे लोक आपल्या कामावर निघून गेलेले असतात. त्यामुळे या घंटागाडीची वेळ बदलावी आणि एक कचराकुंडी बसवून द्यावी ही विनंती नगर पालिकेला करायची असं या मुलांनी ठरवलं. त्यानुसार एक अर्ज तयार करून ही मुलं त्यांच्या पालकांना घेऊन नगर पालिकेत पोहचली. पण त्या दिवशी संबंधीत अधिकारी उपस्थित नव्हते. मग ही मुलं-मुली नगर पालिकेतील विविध विभागांची माहिती घेऊन घरी परतली. नगर पालिकेतील अधिकाऱ्यांना गटातील मुला-मुलींनी कुमार निर्माणची माहिती देखील सांगितली. अर्ज पुन्हा नव्याने काही सुधारणा करून लिहायचा आणि परत एकदा नगर पालिकेत जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना द्यायचा असं या मुला-मुलींनी ठरवलंय.
गट निमंत्रक – चंद्रकांत घारमाळकर