Thursday 31 August 2017

मुखपृष्ठ


अनुक्रमणिका



संपादकीय मंडळ


अमृत बंग

प्रफुल्ल शशिकांत
प्रणाली सिसोदिया
शैलेश जाधव

संपर्क
प्रफुल्ल ९४२०६५०४८४
प्रणाली ९७६७४८८३३७
शैलेश  ९५०३०६०६९८
इमेल : contact.knirman@gmail.com

अंक चौथा | ऑगस्ट २०१७
हे मासिक खालील लिंक वर मूळ स्वरुपात वाचता येईल
http://kumarnirman.blogspot.in/
(खाजगी वितरणासाठी)

 

संवादकीय

प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो....

तुम्ही सर्व मजेत असाल अशी अपेक्षा करतो!

आम्हीदेखील मजेत आहोत. पुण्यात त्या मानाने पाऊस चांगला आहे. पण बाकीकडे पाऊस अगदीच कमी आहे. वातावरण प्रसन्न असलं तरी पाऊस काही पडत नाहीये. ऊन- सावलीचा खेळ मात्र सर्वत्र सुरु आहे.

असे आपण सर्वे मजेत असताना उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील बाबा राघवदास मेडिकल कॉलेजच्या दवाखान्यातील ऑक्सिजनचा पुरवठा संपल्याने ६० बालके मृत्यू पावली. या निष्पाप जीवांना आपणा सर्वांकडून आदरांजली.

नुकतीच आम्ही निमंत्रकांसाठी दोन शिबिरं आयोजित केली होती. एक शिबीर पुणे येथे झालं तर दुसरं जळगाव येथे. शिबिरांना खूप मज्जा आली. आम्ही गाणी म्हटली, चित्र काढली, गप्पा मारल्या, एक-दुसऱ्याला नवीन गोष्टी रचून सांगितल्या आणि सगळे मिळून खूप काही नवीन शिकलो.

तुमच्या शाळा सुरु होऊन एव्हाना बरेच दिवस झालेले आहेत. तुम्ही शाळेत रुळला असाल. नवीन मित्र झाले असतील. कुमार निर्माणच्या बैठका देखील तुम्ही आता नियमित सुरु केल्या असतीलच. त्या निमित्ताने तुम्ही परिसराचं निरीक्षण करून काही समस्या देखील शोधल्या असतील. अनेक संघ त्यावर कृती करताना देखील दिसताय. मुलांनो, या शिबिरांमध्ये आमची यावर बरीच चर्चा झाली आणि कृतीच्या आधी त्या समस्येचा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे यावर आम्हा सर्वांचं एकमत झालं.

कुठलीही समस्या दिसल्यानंतर लगेच कृतीच्या मागे न पडता त्या विषयीचा अभ्यास करण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यातून आपली समज वाढेल आणि समस्येचं योग्य कारण कळून आपण योग्य उपाय करू शकू. अभ्यास कसा करायचा ते तुम्हाला माहिती आहेच, त्यासाठी आपण इंटरनेट, पुस्तकं, तज्ञ व्यक्ती, माहितीपट, शिक्षक, ताई-दादा यांची मदत तर घेऊच शकता आणि आम्हाला देखील फोन करू शकता.

या दरम्यान आम्ही काही संघाना भेटीही दिल्या. मुलांसोबत खेळून गप्पा मारून खूप आनंद झाला. मुलांनी त्यांनी केलेले कृती कार्यक्रम सांगितले आणि इतर अनुभव देखील सांगितले. बाकीच्या संघांना भेट द्यायला देखील आम्ही लवकरच येऊ. सगळेच संघ उत्साहाने कृती करत आहेत हे बघून खूप आनंद होतो.

तसं बघायला गेलो तर ऑक्टोबरमध्ये तुम्हा सर्वांच्या सहामाही परीक्षा असतील तर आता आपल्याकडे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तब्बल २ महिने म्हणजे साधारणतः ८ ते १० बैठका असा मोठ्ठा काळ आहे. तर या १० बैठकींचा पुरेपूर वापर करून घ्या म्हणजे तुम्हा सर्वांचा हा उत्साह कायम टिकेल.
उत्साह अजून वाढवायला पुढे अनेक सण-उत्सव येत आहेत. लवकरच गौरी-गणपती येतील. या सणांमध्ये मज्जा मस्ती तर कराच पण त्या निमित्ताने काही समस्या दिसताय का याचा देखील शोध घ्या. या सणांच्या मागची प्रथा-परंपरा, इतिहास, पार्श्वभूमी जाणून घेण्याचा प्रयत्न करा, त्यांचं बदललेलं स्वरूप आणि पुढे बदलत जाणारं स्वरूप याची माहिती मिळवा. या सणांमुळे परिसरावर काय परिणाम होतो याचं निरीक्षण करा. जमल्यास सणांच्या निमित्ताने आपापल्या परिसरात काही चांगलं करता येईल का याचा देखील विचार करा.

येणाऱ्या सणांच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

चला तर मग लवकरच भेटू. काळजी घ्या स्वतःची आणि सोबतच परिसराची देखील!
अरे एक गोष्ट सांगायची राहिलीच. आपण सर्व नोव्हेंबर मध्ये एकत्र भेटणार आहोत. कुठे, कसं ते ठरेल पण शेअरिंग वर्कशॉप आणि कौतुक सोहळ्याच्या निमित्ताने त्या त्या विभागातील कुमार निर्माणचे संघ एकत्र येतील आणि आपापले अनुभव एकमेकांना सांगतील. तेव्हा खूप मज्जा देखील करू.

तोपर्यंत बाय बाय....
तुमचे
प्रफुल्ल, प्रणाली, शैलेश

गोष्ट

शिक्षणाचे जादुई बेट!


मित्रांनो, चला आपण एका वैज्ञानिक शिक्षणाच्या जादुई बेटाची गोष्ट ऐकुया...


तुम्ही म्हणाल, प्रत्येक शाळेतून विज्ञानाचे धडे दिले जातातच की! पण ही शाळा सर्व शाळांपेक्षा काही औरच आहे. आपल्या कुमार निर्माणचे मार्गदर्शक डॉ. अभय बंग ज्या शाळेत शिकलेत त्या शाळेची ही खरीखुरी गोष्ट आहे.
त्यांचं ९वी पर्यंतचं शिक्षण गांधीजींच्या सेवाग्राम आश्रमातील ‘नई तालीम’ (पायाभूत शिक्षण) शिक्षण पद्धतीत झालं.  निसर्गासोबत राहून समाजोपयोगी कामे करताना मुले योग्य संस्कार, बुद्धीचा विकास व कौशल्य ग्रहण करतात, यावर या गांधीजी-प्रणीत नई तालीम शिक्षण पद्धतीचा दृढ विश्वास होता. या प्रयोगात रवींद्रनाथ टागोरांनीही हातभार लावला. या शाळेने शिक्षण क्षेत्रात अनेक नवनवीन प्रयोग केले.

असं शिकलो वनस्पतीशास्त्र
वनस्पतीशास्त्र हे बहुतेक शाळांमध्ये पुस्तकातील आकृत्या किंवा काचेच्या बरणीत बंदिस्त केलेले जिवंत नमुने यांवरून शिकवतात. नई तालीम विद्यालयाभोवताली शेती व बगीच्यांमध्ये विविध प्रकारची झाडं होती. आमचे शिक्षक आम्हाला घेऊन प्रथम नुसते या आसमंतात भटकायचे. दिसणाऱ्या झाडांची नावं सांगायचे आणि त्यांची पानं, फुलं, फळं दाखवायचे. सोबत बोरं, आवळे, करवंद व कैऱ्या तोडून खाणंदेखील सुरु असायचं. ती खाताना त्या फलप्रकाराची वैशिष्ट्यं काय ते आम्ही टिपून ठेवायचो. बागेतील या रोजच्या फेरफटक्यानं आम्हाला निसर्गाच्या आणखी जवळ आणलं.
सातव्या इयत्तेत परीक्षेच्या वेळेला आम्हाला विविध (वाळवलेल्या) वनस्पतींचा, पानाफुलांचा संग्रह तयार करायला सांगितलं होतं. यासाठी आम्ही आसपासच्या जागा शोधल्या. आज ४० वर्षांनंतरही कोणत्या प्रकारच्या वनस्पती कुठे आहेत हे मला स्पष्टपणे आठवतं. या सगळ्याचा एक गमतीदार परिणाम असा झाला, की पुढे महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र शिकताना मला फार झगडावं लागलं नाही. कॉलेजच्या शेवटच्या वर्षात मी वनस्पतीशास्त्रात पहिला आलो. याब्बदल जेव्हा माझे शिक्षक वर्गात माझं कौतुक करत होते, तेव्हा मी मनात म्हणालो, हे तर मी कॉलेजात नव्हे, तर माझ्या सेवाग्राममधील शाळेत शिकलो!

जीवनाशी संबंध असलेले गणित
एका हौदाला २ तोट्या आहेत. एकाने पाणी येते, दुसरीने गळून जाते तर किती वेळात हौद रिकामा होईल? अशा प्रकारची गणितं वाचताना नेहमी प्रश्न पडतो की गणित शिकवण्याचा संबंध जीवनाशी जोडताच येणार नाही का? शहाणा माणूस हा वेळेचा हिशेब करण्याऐवजी ती गळकी तोटी बंद करेल व प्रश्न सोडवेल. नयी तालीम विद्यालयात मी ‘घन’ (व्याप)ची कल्पना व गणित कसं शिकलो याचं उदाहरण देतो.
दररोज सकाळी ३ तास उत्पादक काम हा तेथील शिक्षणाचा अविभाज्य भाग होता. गांधीजींचा स्वकष्टाची भाकरीचा आग्रह तर त्यामागे होताच पण सोबतच शिक्षणातून समाजोपयोगी कौशल्य व विज्ञान-शिक्षण प्राप्त करणे ही विनोबांची दृष्टीही त्यामागे होती. याप्रमाणे मी काही दिवस गोशाळेत काम करण्यास जात होतो. नवी गोशाळा बांधणं सुरु होतं. माझ्या शिक्षकांनी मला जबाबदारी दिली की एक गाय दररोज सरासरी किती बादल्या पाणी पिते हे मोजून गोशाळेतील गायींच्या पिण्याच्या पाण्याची एकूण गरज व तेवढे पाणी मावू शकेल अशा टाक्याचे माप ठरवावे, त्या टाक्याच्या भिंतींना किती विटा लागतील याचा हिशोब करून विटा बोलवाव्या. हे गणित व काम मला आठवडाभर पुरलं. घनतेची कल्पना व विविध आकाराचे घनमाप कसे काढावे. (बादली ही निमुळता दंडगोल, हौद हा घन तर त्यांच्या भिंती हे घनाच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ) या गणिती पद्धती मी यातून शिकलो.

स्वयंपाकातून शिक्षण
कामातून विज्ञान अशा शिक्षणाचं दुसरं उदाहरण म्हणजे आमची स्वयंपाकाची जबाबदारी. शाळेच्या रसोईघरांत जवळपास १०० माणसे जेवीत. स्वयंपाकाची जबाबदारी पाळी-पाळीने ८ जणांच्या टोळीवर येई. या टोळीला स्वयंपाकासाठी प्रतिमाणसी किती रुपयांचे बजेट उपलब्ध आहे हे सांगण्यात येई. आहारशास्त्राच्या दृष्टीने संतुलित, सर्वांना आवडणारे पण उपलब्ध बजेटमध्ये बसणाऱ्या जेवणाची आठवड्याभराची योजना बनवताना आमची धांदल उडे. बटाट्याची भाजी स्वस्त पडे पण त्यात आहाराचे तत्त्व कोणते हे पुस्तकात पाहिल्यावर फक्त स्टार्च आहे हे कळल्यावर ती बाद होई. किमान आवश्यक तैल पदार्थ किती हे आय.सी.एम.आर. च्या पोषण विषयक तक्त्यांवरून पाहून तेवढे तेल टाकले तर ते बजेटच्या बाहेर जाई. कुशल गृहिणीला अनुभवाने असलेले शहाणपण आम्हाला नसल्याने आहारशास्त्र व अर्थशास्त्राची सांगड घालून बनवलेली आमची जेवणाची योजना बरेचदा पुस्तकी होई. शिवाय डाळ शिजायला लागणारा वेळ व सरपणाचा हिशोब हमखास चुके. मग रात्रीच्या स्वयंपाकाची भांडी घासता घासता आज हरलेल्या लढाईचे जखमी सैनिक उद्याच्या स्वयंपाकाची पुनर्आखणी करत. यातून आहारशास्त्र, घरगुती अर्थशास्त्र व स्वयंपाक ही तीन शास्त्रे आम्ही शिकलो. कोथिंबीरीमध्ये १०६०० युनिट्स ‘अ’ जीवनसत्व आहे हे आजही जे माझ्या लक्षात आहे ते पुणे मेडिकल कॉलेजमध्ये १० वर्ष शिकल्यामुळे नाही तर ८वीत स्वयंपाकघरात या पद्धतीने काम केल्यामुळे आहे. शिवाय कुकरमधील उष्णतेचे व वाफेचे पदार्थ विज्ञानही आम्ही शाळेच्या स्वयंपाकघरातच शिकलो.
तर मित्रांनो, शाळेतील अभ्यासासोबतच निसर्गात जाऊन अशा नाविन्यपूर्ण वैज्ञानिक पद्धतीनेही शिक्षण घेता येतं तर!
‘शिक्षणाचे जादुई बेट’ या डॉ. अभय बंग यांच्या पुस्तकातून साभार
  

गणेशोत्सव आणि आपण

प्रिय मित्रांनो,
खूप उत्साहाचं वातावरण असेल ना घरी आणि परिसरात देखील? सध्या सणांचे दिवस आहेत. काही दिवस तरी एका मागोमाग एक सण आहेत आणि लवकरच गणपती देखील येत आहेत. गणपतीत आपण खूप मज्जा, धमाल करतो. घरी कायकाय बनवतात खायला, मोदक असतात, रोषणाई केलेली असते, गल्लीत किंवा गावात सार्वजनिक गणपती देखील असतो, मित्रांच्या घरचे गणपती आणि इतर सार्वजनिक गणपतीसमोरची आरास बघायला देखील काय धम्माल असते नाही? तर यावेळी आपण बैठकीत गणपती आणि गणेशोत्सव याबद्दल चर्चा करूया.

काय काय असतं गणपतीत त्याची एक आकृती आम्ही काढलीय. तुम्ही तुम्हाला सुचेल तशी या प्रकारची आकृती काढू शकता. त्या सोबतच आम्ही काढलेल्या आकृतीला अजून फाटे फोडू शकता जसं की मूर्तीला पुढे प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीची असे दोन फाटे फोडता येतील. तसेच तुम्ही इतर गोष्टींसाठी करू शकाल. बघा बर प्रयत्न करून! या गोष्टींचे परिसरावर होणारे परिणाम यावर देखील त्या गोष्टीला फाटे फोडता येतील. जसं डीजेला मज्जा, डान्स, त्रास, ध्वनिप्रदूषण असे फाटे फोडता येतील. हे देखील बैठकीत करून बघा.


या सोबतच या सणाचे बदलते स्वरूप यावर देखील चर्चा करा. आपल्या आज्जी-आजोबांच्या काळात गणेशोत्सव कशा प्रकारे साजरा केला जायचा मग आपल्या आई-वडिलांच्या काळापर्यंत त्यात काय बदल झाले आणि आता आपण हा गणेशोत्सव कसा साजरा करतो याविषयी माहिती जमा करा, त्यावर चर्चा करा. सार्वजनिक गणेशोत्सव का सुरु झाला. तो कुणी व का सुरु केला. सार्वजनिक गणेशोत्सव सुरु करण्यामागचा त्यांचा हेतू आत्ताच्या गणेशोत्सवातून पूर्ण होतोय का? आताच्या गणेशोत्सवातील चांगल्या गोष्टी कोण-कोणत्या आहेत ज्यात बदलाची गरज आहे.

मग या सगळ्यात कुमार निर्माणचा गट म्हणून आपली काय भूमिका असावी यावर देखील चर्चा करा. मित्र-मैत्रिणींनो येणारा प्रत्येक सण आपल्यासाठी एक संधी घेऊन येतो. काहीतरी चांगलं काम करण्याची. तर या संधीचा लाभ घेऊया. नेहमीप्रमाणे तुमचे अनुभव आम्हाला नक्की कळवा.
वाट बघत आहोत...
तुमचे
प्रफुल्ल, प्रणाली, शैलेश

कुमार गीत


डोळे उघडून बघा गड्यांनो झापड लावू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ॥धृ.॥

भवतालीचे विश्व कोणत्या सूत्राने चाले
कोण बोलतो राजा आणिक कुठले दळ हाले
प्रारंभी जे अदभूत वाटे गहनभितीदायी
त्या विश्वाचा स्वभाव कळता भय उरले नाही
या दुनियेचे मर्म न कळता जगणे केवळ फुका!
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ||  ||

वाहून गेलेल्या पाण्याचा ढग बनतो तो कसा
बीज पेरता कसे उगवतेपाऊस येई कसा
चारा चरूनी शेण होतसेशेणाचे खत पिका
पीक पेरता फिरूनी चाराचक्र कसे हे शिका
जीवचक्र हे फिरे निरंतर इतुके विसरू नका
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ||  ||

अणुरेणूंची अगाध दुनिया दृष्टीच्या पार
सूक्ष्मजीव अदृश्य किरणही भवती फिरणार
या सर्वांच्या आरपार जी मुक्तपणे विहरे
बुद्धि मानवी स्थिरचर सारे विश्व वेधुनी उरे
विज्ञानाची दृष्टी वापरास्पर्धेमध्ये टीका !
जे दिसते ते असेच का हे उलगडण्याला शिका ||  ||




कोडं


अ’ आणि ‘ब’ ही दोन भांडी रिकामी असताना समान वजनाची व समान धारकतेची आहेत. ‘अ’ भांड्यात काठोकाठ पाणी भरले आहे. ‘ब’ भांड्यातील पाण्यात एक लाकडी ठोकळा तरंगत आहे. हा लाकडी ठोकळा असताना ‘ब’ मधील पाणीदेखील अगदी काठोकाठ आहे.
ही दोन्ही भांडी तराजूच्या दोन पारड्यात ठेवली आहेत. या स्थितीत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे?
. अ’ बाजूचे पारडे खाली जाईल
. ब’ बाजूचे पारडे खाली जाईल

. दोन्ही पारडे संतुलित राहतील


खेळ

तुझी कृती माझी कृती 
सर्वांनी वर्तुळात बसायचे. एका सदस्याने कोणतीही कृती करायची (उदा. हात वर करणे, डोके खाजवणे, खोकणे, शिंकणे, उडी मारणे इ.) आपली कृती करून झाल्यावर टाळी वाजवायची आणि गटातील कोणत्यातरी दुसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवायचे. ज्याच्याकडे बोट दाखवले जाईल त्या व्यक्तीने पहिल्या व्यक्तीची कृती करायची टाळी वाजवायची आणि स्वतःची दुसरी कृती कराची. इथेही पुन्हा टाळी वाजवून तिसऱ्या व्यक्तीकडे बोट दाखवायचे. तिसऱ्या व्यक्तीने पहिल्याची कृती ...टाळी ...दुसऱ्याची कृती ...टाळी ...स्वतःची कृती ...टाळी ...आणि चौथ्याकडे बोट दाखवायचे असे कृती ...टाळी जोडत पुढे जायचे. अधिक अधिक क्रमांक वाढत गेल्यास सर्वांच्या कृती लक्षात ठेवणे, त्या करणे, स्वतःची जोड देणे ...यातून धमाल निर्माण होते!


उल्लेखनीय कृतीकार्यक्रम

उडान गट, भोटा, जळगाव
भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला झालेली आमच्या ‘उडान’ गटाची बैठक खुप संस्मरणीय झाली.
काही दिवसांपूर्वीच आमच्या भागात स्वदेशी जनजागरण मंचामार्फत चीनी मालावर बहिष्कार, चीनची भारतविरोधी भूमिका या आशयावर आधारित पत्रके वाटण्यात आली होती व त्यातील एक पत्रक मयूर व गौरी यांच्या हाती पडलं. ते पत्रक हाती घेऊनच ते गटाच्या बैठकीला आले.
माझ्या मनात तर प्लास्टिकचाच विषय होता, पण ऐनवेळी मी ते सर्व बाजूला ठेवलं आणि २५-३० मुलांच्या मताला महत्त्व द्यायचं ठरवलं. मग आमचा विषय रंगला.
मी मुलांना डोकलाम मुद्दा समजावून सांगितला. चिनी वस्तू, पाक व्याप्त काश्मीर मधील चिनी कोरीडोर, विदेशी वस्तू, स्वदेशी वस्तू अशा मुद्द्यांना स्पर्श होत गेला. मग मुलांनी ठरवलं की १५ ऑगस्टची संधी साधत आपण गावामध्ये चौकात या विषयाला अनुसरून पथनाट्य सादर करू. मुलांनी आपापल्या भूमिका वाटून घेतल्या. कथानक तयार झाले. स्वातंत्र्यदिनाला ज्या नेहमीच्या घोषणा दिल्या जातात, त्याबरोबरच चिनी व विदेशी मालाचा शक्य तेवढा कमी वापर व बंदी याला सुसंगत अशा घोषणा मुलांनी तयार केल्या. मुलांनी चिनी माल न वापरण्याची शपथ घेतली.
१५ ऑगस्टला मुलांनी गावकऱ्यांसमोर खुप चांगल्या प्रकारे पथनाट्य सदर केले आणि घोषणा पण खुप हटके बनवल्या.
मुलांनी बनवलेल्या काही घोषणा:
नको गं बाई, नको गं बाई, made in China नको गं बाई...’
मेड इन चायना, शाम तक टिकना...’
सून मेरे भाई, सून मेरी बहना, कभी न लेना मेड इन चायना...’
स्वदेशी वापरा, देश वाचवा...’
घामाचा पैसा, कष्टाचा पैसा, चीनला देऊ नका, नका...’

निमंत्रक: मंगेश ढेंगे

 मायाळू गट, सासवड, पुणे

शनिवारी संध्याकाळी कॉलेज संपल्यावर घरी गेलो. घरात शिरतानाच चेतनने आवाज दिला. “दादा, आम्ही आज झाड लावली.” मी म्हणालो, चला बघूया! पोरांनी समाज मंदिरापुढे चार झाडं लावली होती. थोड्यावेळात स्वप्निल, प्रीती, मोनिका, साहिल, आदित्य असे सगळे जमले. मी त्यांचं जरा कौतुक केलं आणि सविस्तर विचारलं.  स्वप्निल म्हणाला शाळेत रोपं पडलेली होती. मग आम्ही सरांना विचारून आणली आणि लावून टाकली. यात मला जास्त आवडलं ते हे की या तिघांनी म्हणजे स्वप्निल, आदित्य, चेतन, साहिल यांनी बाकीच्या मुलांची वाट न पाहता रोपं लावली. नुसतीच लावायची म्हणून लावली नाहीत तर मुरूम असल्यामुळे काळी माती वाहून आणून, खड्डा करून त्यात रोपं लावली. एवढ्यावरच न थांबता त्या रोपांना चांगलं काट्यांच कुंपण पण केलं. त्या रोपांना कोणी, कधी पाणी घालायचं ते पण ठरवून टाकलं.

आमच्या गटात समाज मंदिरापुढे आपण झाड लावू हा फक्त विषय झालेला, तो पण खूप महिन्यापूर्वी. तरीपण मुलांनी रोपं आणली. आता ही आणलेली रोपं ती आपआपल्या घरी पण लावू शकत होतीच की! पण तरी त्यांनी समाज मंदिरापुढेच लावली. रोपं लावण्यात हलगर्जीपणा दिसला नाही. आता हे सगळं झालं पण मला सगळं आल्यावर सांगितलं म्हणजे मुलांनी माझीपण वाट बघितली नाही.
अजून एक गंमत म्हणजे मला आधी वाटलं की आपला आधी विषय झालेला म्हणून किंवा गटात येतो म्हणून पोरांनी लावली असतील रोपं, पण नाही. मुलांनी तर गटांच नाव पण घेतलं नाही. मी स्वप्निलला विचारलं की तुम्हाला कसं काय सुचलं हे असं करावं म्हणून? त्यांनी सांगितलेलं उत्तर मजेशीर होतं. तो म्हणाला अरे शाळेत प्रत्त्येक शिक्षक येतो आणि झाडं लावा, प्रदूषण. तेच तेच सांगत असतात. मग टाकलीच लावून झाडं.
थोड्यावेळात एक आजोबा तिथं आले आणि त्यांना ओरडायला लागले रोपं लावली म्हणून नाही तर अशी कुठेपण लावली म्हणून. आता अजून एक गंमत म्हणजे या मोठ्यांनी रोपं लावली म्हणून आमच्या चिल्लर एक गॅंगने (४थी पर्यंत) यांनी पण लगेच दुसऱ्या दिवशी कुठूनतरी फुलांची रोपं आणली आणि टाकली लावून!       
 निमंत्रक: निखील जगताप
नेचर ग्रुप, एरंडोल, जळगाव
१४ ऑगस्टला आमच्या गटाची बैठक झाली आणि आम्ही त्यात आपल्याला काय करता येईल यावर खुप चर्चा केली. मग आमच्यापैकी हर्षल, प्रज्ञा आणि गुंजन यांना युक्ती सुचली. आमच्या शाळेला येताना, २ किमी अलीकडे एक भगत वाडी (झोपडपट्टी)  आहे. त्या वस्तीत आम्ही याआधीही एकदा जाऊन आलेलो आहे. त्यांना आठवड्यातून एकदा जाऊन शिकवावे अशी आमच्यात चर्चा पण झालेली आहे. तर या तिघांना कल्पना सुचली की आपण निमंत्रण पत्रिका बनवूया. आम्हाला सर्वांना ती कल्पना आवडली. मग आम्ही वस्तीतल्या मुलांसाठी निमंत्रण पत्रिका बनवल्या. मग आमच्या शिक्षकांची परवानगी घेऊन आमच्या शाळेची शिवा काकांची बस घेऊन आम्ही भगत वाडीत गेलो.
तिथल्या मुलांच्या अंगावर कपडे नव्हते व काही जणांनी अंघोळही केलेली नव्हती. आम्ही वाडीत प्रत्त्येकाच्या घरोघरी जाऊन चर्चा केली व त्यांच्या हातात निमंत्रण पत्रिका दिल्या व स्वातंत्र्य दिनाची माहिती दिली. सोबतच त्यांना निमंत्रण पत्रिका पण वाचून दाखवली. आणि त्यांना सांगितले की आमच्या शाळेत स्वातंत्र्यदिनाचा एक छानसा कार्यक्रम आहे तर तुम्ही सर्व जण या कार्यक्रमासाठी नक्की या.
आम्ही निमंत्रित केलेल्यांपैकी बरेचसे पालक व लहान मुले दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाला आले. आम्हाला त्यांना पाहून खुप आनंद झाला. मग आम्ही शिक्षकांच्या मदतीने त्यांनापण कार्यक्रमाच्या रांगेत बसवले. ते सर्वजण संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत थांबले. नंतर आम्ही त्यांना बिस्किट्स आणि चॉकलेट्स दिले, त्यांच्यासोबत गप्पा केल्या. आम्हाला खुप आनंद वाटला.
निमंत्रक: शरद पाटील
प्रगती गट, बेडूकवाडी

कुमार निर्माणच्या प्रगती गटातील मुलींना जाता येताना गावातील वाचनालय बंद असलेलं दिसत होतं. गावातील लोकांना आणि मुला-मुलींना वाचनाची आवड लागावी म्हणून हे वाचनालय सुरु असणं गरजेचं आहे असं या मुलींना वाटलं. त्यांनी हा विषय बैठकीत मांडला आणि मग आपण वाचनालय सुरु करूया असं ठरलं. मग वाचनालय जे काका चालवायचे त्यांना गट जाऊन भेटला. कुणी वाचायला येत नसल्याने वाचनालय बंद आहे असं उत्तर मिळालं. मुला-मुलींनी विनंती करून त्यांच्याकडून वाचनालयाच्या चाव्या मिळवल्या व आम्ही वाचनालय चालवू असं त्या काकांना सांगितलं. त्यांच्याकडून आवश्यक ती माहिती देखील मिळवली. पाहिले काही दिवस वाचनालयातील पुस्तकं गटाने व्यवस्थित लावली. मुलांनी सर्वांच्या मताने ठरवले की प्रत्येक रविवारी एक तासासाठी वाचनालय चालु करायचे. त्यादिवशी कुणालाही पुस्तके मिळतील. त्याची नोंदवहीमध्ये नोंद करायची. यासाठी मुलांनी एकदम मस्त कल्पना लढवली ती म्हणजे दर रविवारी गटातील दोन मुलं-मुली यासाठी वाचनालयामध्ये येतील. एकजण पुस्तक देण्याघेण्याचे काम पाहील आणि दुसरा नोंदणीचे काम पाहील.
पहिल्याच रविवारी गटातील सर्वांनी काम शिकून घेतलं. मुला-मुलींना पुस्तकं बघून खूप आनंद झाला. गटातील प्रत्त्येकाने एक-एक पुस्तक घेतले.
निमंत्रक- सदानंद चिंचकर
चोपडा गट, जळगाव
२४ जुलैला आमच्या गटाची बैठक झाली. त्यात चर्चेत चोपडा शहरात हरेश्वर येथे श्रावण मासानिमित्त होणाऱ्या दर सोमवारच्या यात्रेत खूप कचरा व अस्वच्छता असते ही समस्या मुलांच्या लक्षात आली यावर बरीच चर्चा झाली. नंतरच्या मिटींगला येताना मुले कचरा जमा होण्याच्या जागा पाहून आले त्यामुळे आम्ही कचरा गोळा करण्यासाठी काय उपाय करता येतील यावर चर्चा केली. यात काहींच्या मते चोपडा नगरपरिषदेला कळवावे, काहींच्या मते कचरा करणार्‍यांना फुले देऊ तर काहींच्या मते बॅनर लावू अशी चर्चा झाली. परंतु यावर आणखी सोपा उपाय कोणता यावर चर्चा करताना आपण कचरा कुंड्या ठेवूया असे निश्चित झाले. कचरा कुंड्या टाकाऊतून टिकाऊ असाव्यात म्हणून शाळेत पुरक आहार म्हणून मुलांनी मिळणार्‍या बिस्किटांचे खोके वापरले. ३० जुलै रोजी म्हणजे आदल्या दिवशी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता हरेश्वर मंदिराजवळ जमून १२ कचरा कुंड्या स्टिकर लावून ठेवल्या. ३१ जुलैच्या संध्याकाळी सात वाजता म्हणजे यात्रा संपल्यावर सर्व मुलांनी कुंड्यांतील कचरा गोळा करून जाळला पुन्हा पुढच्या सोमवारीही म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी सायंकाळी कचरा कुंड्या ठेवून ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता जमून कचरा गोळा करून जाळला.                                                    
निमंत्रक: जितेंद्र देवरे